वृत्तसंस्था
उज्जैन : राजकारणाचा मार्ग नेहमी निसरडा असतो, त्यावरून वारंवार घसरण्याची शक्यता असते. पण संतांची शिकवण आम्हाला त्यापासून सावरते, असे सूचक उद्गार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काढले. महाकाल कॉरिडोरच्या फेज 2 चे उद्घाटन, मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन आणि अन्य काही विकास कामासंदर्भात मोठा कार्यक्रम झाला. त्यामध्ये शिवराज सिंह चौहान बोलत होते. Political roads filled with turmoil, guide me: Madhya Pradesh cm shivraj chouhan
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका व्यक्तीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पुढे न करता संघटनेच्या बळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. भाजपने 3 केंद्रीय मंत्री आणि 7 खासदार यांना मध्य प्रदेश विधानसभेचे तिकीट देऊन निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. या पार्श्वभूमीवर शिवराज सिंह चौहान यांचे सूचक उद्गार महत्त्वाचे मानले जात आहेत.
शिवराज सिंह चौहान म्हणाले, राजकारणाचा मार्ग नेहमीच निसरडा असतो. त्यावरून आपण घसरण्याची शक्यता असते पण संतांची शिकवण आम्हाला सावरते. हिंदुत्व अद्भुत आहे. भारताबरोबरच संपूर्ण जगाला संकटांपासून वाचविण्याचे सामर्थ्य आमच्या सनातन धर्मात आहे. संत समाजाने नेहमीच संपूर्ण समाजाचे मार्गदर्शन केले आहे. राजकारणाच्या निसरड्या मार्गावरून चालण्याचे आणि सावरण्याचे सामर्थ्य संत समाजाने आम्हाला द्यावे, असे आवाहन शिवराज सिंह यांनी केले. मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या आवाहनाला विशेष महत्त्व आहे.
आज सनातन धर्म संपविण्याची भाषा केली जाते पण सनातन धर्माला कोणी संपवू शकत नाही. कारण सनातन धर्म आदि आणि अनंत आहे. धर्माला संपविण्याची भाषा करणारे संपतील, पण सनातन धर्म कधीही संपणार नाही, असा आत्मविश्वासही शिवराज सिंह यांनी व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून शिवराज सिंह वेगवेगळ्या माध्यमांमधून निरोपाची भाषा बोलत आहेत महिला शक्ती सन्मान मेळाव्यात त्यांनी आप मामा को याद रखेंगे असे सूचक उद्गार काढले होते. आता देखील राजकारणाची निसरडी वाट आणि त्यावरून सावरण्याचे सामर्थ्य असे सूचक उद्गार काढून त्यांनी मध्य प्रदेशातून निरोप घेण्याची वेळ जवळ आल्याचे सूचित केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App