विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केलेल्या विमानप्रवासावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री नीतेश राणे यांनी जयंत पाटील यांच्यावर मिश्कील टोला लगावला आहे. या विमानप्रवासानंतर पाटील यांच्या मनात योग्य आणि सकारात्मक विचार येतील, असे राणे यांनी म्हटले. Nitesh Rane
शिवसेना (ठाकरे गट)चे नेते अंबादास दानवे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याबाबत बोलताना राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतच्या विमानप्रवासाचाही उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांच्या गाडीत किंवा विमानात बसण्याची इच्छा अनेकांची असते. ‘देवाभाऊं’चा संवाद लाभणे म्हणजे आपले भविष्य घडवण्यासारखे आहे, असे राणे म्हणाले.
“विमानातील या प्रवासानंतर निश्चितच जयंत पाटील यांच्या मनात योग्य आणि सकारात्मक विचार येतील,” असा टोला त्यांनी लगावला.
अंबादास दानवे यांच्या संघाच्या कार्यक्रमातील उपस्थितीवरही राणे यांनी भाष्य केले. दानवे हे मूळचे स्वयंसेवक असून ते संघाच्या शाखेतही जात होते. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वविरोधी भूमिका घेतल्यानंतर दानवे यांना झालेल्या वेदना त्यांनी वैयक्तिकरीत्या सांगितल्याचा दावा राणे यांनी केला. दानवे पुन्हा हिंदुत्व आणि संघाच्या विचारांकडे येत असतील, तर त्यांचे स्वागतच आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधानांच्या भेटीवरही राणेंचे भाष्य
दरम्यान, पंतप्रधानांना भेटणे किंवा मतदारसंघातील कामे घेऊन जाणे यात काहीही गैर नसल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. आदित्य ठाकरे यांनीही विधानसभेच्या काळात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मतदारसंघातील कामे मांडली होती, असा दावा त्यांनी केला.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, असे राणे यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही भूमिका
शासकीय प्रक्रियेत अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असेल, तर मनोज जरांगे यांच्याआधीच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भूमिका आपण घेऊ, असे राणे म्हणाले.
मनोज जरांगे हे समाजाच्या हितासाठी लढत असले तरी भाजपच्या प्रमुख नेत्यांविरोधात त्यांनी केलेली वक्तव्ये आणि वापरलेली भाषा चुकीची असल्याचे राणे यांनी म्हटले. जरांगे यांनी वक्तव्य करताना भाषेचे भान ठेवावे. मराठा समाजाच्या न्यायासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यास आपण तयार असल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App