विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात सध्या सर्वच भागांत मुसळधार पावसाची स्थिती नसली तरी पुढील काही दिवसांत पावसाचा जोर (Rain In Maharashtra) पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः 13 ऑगस्टपासून राज्यातील काही भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढू शकते, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आता हवामानात पुन्हा बदल होण्याचे संकेत आहेत.
हवामान विभागाने हवामानासंबंधित एक महत्त्वपूर्ण अंदाज जाहीर केला आहे. येत्या 24 तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा इशारा दिला आहे. तसेच चालू महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत असून 13 ऑगस्टपासून राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांना याचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील काही दिवस हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
9 ते 12 ऑगस्टदरम्यानही कोकणात पावसाची शक्यता-
दरम्यान, मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने 8 ऑगस्टला जारी केलेल्या पुढील पाच दिवसांच्या अंदाजानुसार उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात विखुरलेल्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 9 ते 12 ऑगस्टदरम्यानही कोकणात पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
कोणत्या भागात अधिक पाऊस?
कोकण आणि घाट परिसर पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचा राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात पावसाच्या सरींची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट भागातही पावसाचा जोर वाढू शकतो. मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
मुसळधार पावसाचा धोका कुठे?
हवामान विभागाच्या इम्पॅक्ट-बेस्ड फोरकास्टनुसार जोरदार पावसाच्या परिस्थितीत सखल भागात पाणी साचणे, स्थानिक पूर, जुन्या किंवा कमकुवत संरचना कोसळणे, झाडे उन्मळून पडणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असते. घाट परिसरात भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोका देखील वाढू शकतो.
राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आजपर्यंत 637.1 मिमी पाऊस-
एल-निनोच्या पार्श्वभूमीवर कमी पावसाची शक्यता असतानाही राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आजपर्यंत 637.1 मिमी पाऊस पडला आहे, या काळात सरासरी 622.7 मिमी पाऊस पडतो, सरासरीपेक्षा दोन टक्के जास्त पाऊस पडला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरात पावसाने उघडीप दिली आहे. विदर्भ, मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत हिंगोली सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे.
गोंदियाच्या पुजारीटोला धरणातून पाण्याचा विसर्ग-
गोंदिया जिल्ह्यात रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत. या धरणातून सध्या नदीपात्रात 16476 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना ‘अलर्ट’ जारी केला आहे. पुजारीटोला धरणाचा पाणीसाठा सध्या 82 टक्के झाला आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून पाण्याच्या विसर्ग सुरू असल्याने नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या इशारा गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App