नाशिक : आधी पवारांच्या मागे धावले आणि आता फडणवीसांच्या मागे लागले!!, नेमका हाच राजकीय प्रकार मराठी पंतप्रधानाच्या बाबतीत घडला.
सर्वपक्षीय मराठी नेते आणि मराठी माध्यमे आधी शरद पवारांच्या मागे ते पंतप्रधान होणार म्हणून लागली होती. त्यांच्या पंतप्रधान पदाचा फुगा फार उंच हवेत उडवला होता. खुद्द पवारांनी सुद्धा पंतप्रधान पदाच्या महत्त्वाकांक्षेला सुरुवातीला हवा दिली होती. त्यामुळे मराठी माध्यमे गेली 35 वर्षे पवारांच्याच पंतप्रधान पदाच्या मागावर होती. काहीही करून, कसेही करून, कुठले तरी गणित आणि समीकरण जुळवून शरद पवारच पंतप्रधान होतीलच, अशी आस त्यांचे समर्थक आणि मराठी माध्यमे लावून बसली होती. त्यामुळे गेली 35 वर्षे पवारांच्या पंतप्रधानपदाचा फुगा राजकीय हवेत तरंगत राहिला होता.
– पवारांचे तोकडे कर्तृत्व
पण शरद पवारांना त्यांच्या स्वतःच्याच राजकीय कर्तृत्वाच्या अभावी पंतप्रधान पदाला काही गवसणी घालता आली नाही. दिल्लीतले राजकारण त्यांना स्वतःच्या मर्जीने खेळवता आले नाही. दिल्लीतली कुठलीच लॉबी त्यांना खऱ्या अर्थाने हलविता आली नाही. १० जनपथ पासून फक्त चारच घरांच्या अलीकडच्या अंतरावर राहून सुद्धा पवारांना दिल्लीत जम बसवता आला नाही. पवार दिल्लीत फार मोठे राजकारण खेळतात, असे फक्त त्यांचे समर्थक आणि मराठी माध्यमे म्हणत राहिली. त्यापलीकडे पवारांना दिल्लीत काही करणे जमले नाही. पण त्यांच्या समर्थकांनी आणि मराठी माध्यमांनी पवारांच्या पंतप्रधान पदाच्या फुग्यावरची निष्ठा कमी केली नाही. ते कायम पवारांच्या पंतप्रधान पदाच्या मागे धावत राहिले.
– आता लागले फडणवीसांच्या मागे
पण आता पवारांचे वयच एवढे उलटून गेले की आता त्यांच्या पंतप्रधान पदाची चर्चा सुद्धा नाईलाजाने इतिहासजमा करावी लागली. पण म्हणून मराठी नेत्यांनी आणि मराठी माध्यमांनी पंतप्रधान पदाची हौस आणि सोस सकाळी सोडला नाही. पवार आता पंतप्रधान बनणारच नाहीत हे लक्षात येताच त्यांनी पवारांचे नाव सोडून दिले आणि ते देवेंद्र फडणवीस यांच्या मागे लागले. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कधीच पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा जाहीर केली नाही. उलट ते भाजप आणि संघ जे सांगेल ते आपण करत राहू, असे अनेक वर्षे सांगत राहिले. स्वतः फडणवीसांनी आणि त्यांच्या समर्थकांनी सुद्धा भाजप मधले राजकीय वास्तव लक्षात घेऊन पंतप्रधान पदाचे फुगे कधी हवेत उडवले नाहीत. तरीसुद्धा मराठी नेत्यांनी आणि मराठी माध्यमांनी हार मानली नाही. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव स्वतःहून पंतप्रधानपदाच्या शर्यतीत रेटले. उद्धव ठाकरेंनी तशा मुलाखती दिल्या. महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी फडणवीस यांचे नाव यांना या ना त्या मार्गाने पुढे चालू ठेवले. त्यांना वरिष्ठ केंद्रीय मंत्रिपदावर नेऊन ठेवले. पण या सगळ्या राजकारणात त्यांचा सुप्त हेतू लपून राहिला नाही. देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले की ते महाराष्ट्राच्या राजकारणातून निघून जातील आणि आपला मार्ग मोकळा होईल, हाच त्यामागचा सगळ्यांचा होरा राहिला.
– राजकीय कर्तृत्वाचा अभाव
पण त्यापलीकडे मराठी नेत्यांना आणि मराठी माध्यमांना काही साध्य करता आले नाही. मराठी नेत्यांना आणि मराठी माध्यमांना दिल्लीत स्वतःची लॉबी निर्माण करता आली नाही. आहे ती लॉबी टिकवून ठेवता आली नाही. त्यामुळे मराठी पंतप्रधान पदाचा फुगा हवेत उडविण्याशिवाय दुसरे काही घडले नाही. आधी मराठी नेते आणि मराठी माध्यमे शरद पवारांच्या मागे लागले होते. आता ते देवेंद्र फडणवीस यांच्या मागे लागलेत, एवढाच काय तो नावातला फरक राहिला. बाकी मराठी पंतप्रधान पदाचे रडगाणे राजकीय कर्तृत्वाभावी तसेच गायला लागले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App