नाशिक : वराती मागून घोडे हेच ठाकरेंचे नेहमीचे रडगाणे!!, असं म्हणायची वेळ उद्धव ठाकरेंच्या आजच्या यवतमाळ दौऱ्यामुळे आली. उद्धव ठाकरेंची शिवसेना दुसऱ्यांदा फुटली आधी त्यांचे ४० आमदार निघून गेले, नंतर ६ खासदार निघून गेले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना राजकीय उपरती होऊन त्यांनी फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघांमधला दौरा सुरू केला. ते आधी भांडुपला गेले. आज यवतमाळला गेले. अजून ते चार मतदारसंघात जातील. पण उद्धव ठाकरेंची ही सगळी राजकीय घोडदौड वरातीमागून घोडे किंवा बैल गेला आणि झोपा केला याच दोन म्हणींना शोभण्यासारखी राहिली.
“मॅग्नेटिक फिल्ड” अपूर्ण
कारण उद्धव ठाकरे यांनी आमदार आणि खासदार फुटण्यापूर्वी कुठली राजकीय हालचाल करून त्यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यापासून रोखून धरले नाही. ते मुख्यमंत्री म्हणून सत्तेवर असताना स्वतःचे “मॅग्नेटिक फिल्ड” वाढविले नाही त्यामुळे त्यांचे आमदार आणि खासदार फुटले. ते भाजपच्या सत्तेच्या दिशेने गेले. या फुटीर आमदाराने खासदारांचे भाजपवर किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर फार मोठे प्रेम होते म्हणून ते गेले असे मानण्यात मतलब नाही, पण उद्धव ठाकरे यांच्याकडे सत्तेचे मॅग्नेटिक फिल्ड नव्हते म्हणूनच त्यांचे आमदार – खासदार फुटले, असे मानण्यास भरपूर वाव आहे.
जुने रडगाणे
पण मूळात वराती मागून घोडे हे शिवसेनेचे जुनेच रडगाणे आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकिर्दीत छगन भुजबळ आणि त्यांच्याबरोबर अठरा आमदार फुटले. त्यातले 12 आमदार काँग्रेसमध्ये गेले सहा आमदार परत आले. त्यावेळी शरद पवारांच्या काँग्रेसमधल्या अस्तित्वाने निर्माण केलेल्या मॅग्नेटिक फिल्ड ने छगन भुजबळ आणि 12 आमदार यांना आपल्याकडे ओढले. पण बाळासाहेब ठाकरे यांचे मॅग्नेटिक फिल्ड एवढे मोठे होते की त्यांनी दोन वर्षांमध्ये छगन भुजबळ आणि त्यांच्याबरोबरच्या सगळ्या फुटीर आमदारांना निवडणुकीत पाडले आणि राज्यांमध्ये शिवसेना – भाजप युतीची सत्ता आणून दाखविली.
बडबडखोर नेत्यांमुळे नुकसान
उद्धव ठाकरे यांना हा करिष्मा जमला नाही म्हणून त्यांचे आमदार – खासदार फुटले. उद्धव ठाकरे यांच्या भोवतीचे नेते फक्त बडबड करत बसले. त्यांच्याच बडबडीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा घात केला. आज उद्धव ठाकरे यवतमाळ दौऱ्यावर याच बडबडखोर नेत्यांना घेऊन गेले. तिथे त्यांनी नेहमीचेच भाषा वापरून फुटलेल्या खासदारांना ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आणखी बळ दिले. वास्तविक ठाकरी भाषेच्या नावाखाली उगाच शिवीगाळ करण्यात मतलब नव्हता. फुटलेली खासदार सत्तेच्या मोहापाई गेले हे सांगायला फार मोठ्या राजकीय ज्योतिषाची गरज नव्हती. शिवसैनिकांना आणि महाराष्ट्रातल्या मतदारांना सगळे कळते. त्यांना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चेल्यांनी समजावून जाण्याची गरज नाही.
मोदींची पवारांना असाइनमेंट
ठाकरेंना गरज आहे ती स्वतःचे “मॅग्नेटिक फिल्ड” टिकवून ठेवण्याची. शरद पवारांना आपल्या खासदारांच्या फुटीची भीती वाटत नाही कारण मूळातच त्यांचे संस्कार सत्तेच्या वळचणीला राहून बांडगुळी राजकारण करण्याचे आहेत. म्हणूनच पवारांनी मोदींनी दिलेल्या असाइनमेंट बेसवर राहून काँग्रेस आघाडीत स्वतःला टिकवून ठेवले आहे. शरद पवार काँग्रेसच्या आघाडीत आहेत, कारण मोदींनी त्यांना त्या आघाडीत ठेवले आहे. त्या आघाडीत राहून लुडबुड करायची आणि मोदी सरकारला हवा तेव्हा “अदानी नॅरेटिव्ह” चालवायचा ही शरद पवारांची असाइनमेंट आहे. ती ते पार पाडत असल्यामुळे त्यांना खासदार फुटीची भीती नाही. पवार बलाढ्य अशा मोदींशी उगाच टक्कर घ्यायला जात नाहीत. ते गांधी परिवारालाही दुखवत नाहीत. त्यामुळे पवारांचे राजकारण तरंगत राहते.
उद्धव ठाकरे आणि त्यांचे चेले नेमके उलटे वागतात. ते बलाढ्य मोदींशी पंगा घ्यायला जातात आणि फसतात. म्हणून त्यांचा पक्ष वारंवार फुटतो. ते पक्ष फुटीला फार गांभीर्याने घेतात. पण ते गांभीर्य त्यांच्या राजकीय कृतीतून दिसण्याऐवजी नुसत्या बडबडीतून व्यक्त होते. पण त्यामुळे मोदींशी पंगा घ्यायचे राजकीय गांभीर्य सुद्धा ठाकरे यांच्या हातातून निसटून जाते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App