विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशात सामाजिक भेदभाव आणि विषमता अस्तित्वात असेपर्यंत आरक्षणाची व्यवस्था कायम राहिली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मांडली. मात्र आरक्षणाचा लाभ घेऊन सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या व्यक्तींनी औदार्य दाखवत स्वतःहून त्याचा लाभ सोडावा, जेणेकरून समाजातील इतर गरजू घटकांना संधी मिळेल, असे आवाहनही त्यांनी केले. Mohan Bhagwat
मुंबईतील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात आयोजित इंडिया इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनाइट नेशन्स, अर्थात आयआयएमयूएनच्या १५ व्या वर्धापन दिन सोहळ्यात भागवत यांनी देशभरातून आलेल्या जेन-झी आणि जेन-अल्फा पिढीतील तरुणांशी संवाद साधला. या कार्यक्रमात १०० हून अधिक शहरांतील दोन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाची संकल्पना ‘द रोल ऑफ यूथ इन युनायटिंग द वर्ल्ड, द इंडियन वे’ अशी होती.
शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण कमी करण्याची वेळ आली आहे का, असा प्रश्न आयआयएमयूएनचे संस्थापक ऋषभ शाह यांनी विचारला. त्यावर थेट हो किंवा नाही असे उत्तर न देता भागवत यांनी आरक्षणाच्या सामाजिक उद्देशावर भर दिला.
आरक्षणाकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. सामाजिक भेदभावामुळेच आरक्षणाची गरज निर्माण झाली असून, समाजातील विषमता संपत नाही तोपर्यंत ही व्यवस्था आवश्यक राहील, असे भागवत यांनी सांगितले.
आरक्षणामुळे ज्यांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारली आहे, त्यांनी स्वतःहून त्याचा लाभ सोडण्याचा विचार करावा, असे भागवत म्हणाले.
अशा निर्णयामुळे आरक्षणाच्या कक्षेतील अधिक गरजू कुटुंबांपर्यंत शिक्षण आणि रोजगाराच्या संधी पोहोचू शकतील. लाभार्थी समाजातील काही घटकांमध्ये हा विचार हळूहळू निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भागवत यांनी आरक्षणाभोवती होणाऱ्या राजकीय वादांवरही नाराजी व्यक्त केली. आरक्षण ही सामाजिक एकता आणि ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी निर्माण झालेली व्यवस्था आहे. मात्र राजकीय फायद्यासाठी तिचा जाणीवपूर्वक चुकीचा वापर केला जात असल्याची टीका त्यांनी केली.
आरक्षणाची संकल्पना चुकीची नसून, ती राबविणाऱ्यांची दृष्टी आणि हेतू बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कल्याणकारी योजनांची प्रामाणिक आणि प्रभावी अंमलबजावणी झाल्यास सामाजिक विषमता वेगाने कमी होईल आणि भविष्यात आरक्षणाची गरजही आपोआप कमी होऊ शकते, असे ते म्हणाले.
भागवत यांच्या संवादाने आयआयएमयूएनच्या वार्षिक चॅम्पियनशिप परिषदेची सुरुवात झाली. आयआयएमयूएन ही युवकांच्या नेतृत्वाखाली चालणारी संस्था असून ती देशातील २७५ शहरांसह ४० देशांमध्ये कार्यरत असल्याचे संस्थेने म्हटले आहे. संस्थेच्या विविध कार्यक्रमांनी आतापर्यंत साडेसात कोटी तरुणांपर्यंत पोहोच साधल्याचा दावा करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App