विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या ७४व्या वर्षी निधन झाले. ‘लगान’ आणि ‘गजनी’सारख्या गाजलेल्या चित्रपटांमधील त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
प्रदीप रावत यांच्या निधनाची माहिती अभिनेते यशपाल शर्मा यांनी सोशल मीडियावर दिली. त्यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर श्रद्धांजली वाहताना, “‘गजनी’ आणि ‘लगान’मधील देवा आता आपल्यात नाही. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो,” असे म्हटले आहे.
अभिनेत्री रोशनी अचरेजा यांनीही त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, प्रदीप रावत हे गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. सुरुवातीला त्यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
‘महाभारत’पासून ‘गजनी’पर्यंतचा संस्मरणीय प्रवास
प्रदीप रावत यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बी. आर. चोप्रा यांच्या लोकप्रिय ‘महाभारत’ मालिकेत अश्वत्थामा ही भूमिका साकारून केली. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडसह दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही प्रभावी भूमिका साकारत आपली वेगळी छाप पाडली.
राज बब्बर यांच्या ‘ऐतबार’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे ‘अग्निपथ’, ‘पत्थर के फूल’, ‘संगदिल सनम’, ‘कोयला’, ‘सरफरोश’ आणि ‘लगान’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या.
मात्र, २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या आमिर खान अभिनीत ‘गजनी’ चित्रपटातील मुख्य खलनायकाच्या भूमिकेमुळे त्यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. त्यांच्या प्रभावी अभिनयाचे प्रेक्षक आणि समीक्षकांनी भरभरून कौतुक केले असून, ही भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय भूमिकांपैकी एक मानली जाते.
प्रदीप रावत यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक दमदार आणि अष्टपैलू कलाकार गमावला असून, त्यांच्या अभिनयाची छाप चाहत्यांच्या स्मरणात कायम राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App