नाशिक : म्याऊं – म्याऊं करणे, बाप काढणे, विधिमंडळाच्या पायर्यांवर नाक घासणे, मुख्यमंत्र्यांचा आजार काढणे, पत्नीला मुख्यमंत्री करणे, म्हणून मग विरोधी पक्षनेत्यांच्या पत्नीला विरोधी पक्षनेते करणे…!! हे सगळे सध्या सुरू आहे. महाराष्ट्रातील जनतेने सावधान राहावे. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे…!! Meow – to meow, to remove the father, to rub the nose on the steps of the legislature … !!; Caution Maharashtra Legislative Assembly is in session !!!
हिवाळी अधिवेशनाच्या काळात विधानसभा आणि विधान परिषदेच्या सभागृहात काय व्हायचे ते होवो, विधिमंडळाच्या पायर्यांवर हे सध्या सगळे सुरू आहे. अवघ्या 5 दिवसां मध्ये उरकण्यात येणाऱ्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कामकाजात सहभागी होण्यासाठी विधिमंडळात जात होते. त्यावेळी भाजपचे सर्व आमदार विधिमंडळाच्या पायर्यांवर बसून आंदोलन करत होते. आदित्य ठाकरे तिथून आले. पायऱ्यांवर चढून आतमध्ये गेले. त्यावेळी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले मांजराचा म्याऊं – म्याऊं आवाज काढून आदित्य ठाकरे यांचे “विशेष स्वागत” केले. त्यावेळी अचानक म्याऊं – म्याऊं कसा आवाज आला हे ऐकून भाजपचे सगळे आमदार हसले. आदित्य ठाकरे त्यांना कोणताही प्रतिसाद न देता विधानसभा सभागृहात निघून गेले.
तर काल आणि आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आजारपण गाजते आहे. उद्धव ठाकरे आजारी असतील पण मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार आपले चिरंजीव आदित्य ठाकरे किंवा पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवावा, असा टोला चंद्रकांत दादा पाटील यांनी लगावला होता. त्यावरच आज राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड चिडले. आपला बाप आजारी असताना आपण त्याविषयी चर्चा करतो का?, असा सवाल त्यांनी चंद्रकांत दादा पाटलांना केला. त्यावर चंद्रकांत दादांनी, कोणाचेही बाप काढण्याची जितेंद्र आव्हाड यांची संस्कृतीच आहे. त्यांच्यावर तसे पक्षाचे संस्कार आहेत. पण माझा बाप गिरणी कामगार होता. तो आजारी पडल्यानंतर 11 महिन्यांनी परत गिरणीत गेला तेव्हा त्याने स्वतःची नोंद कामगार अशीच केली होती, अशी आठवण चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितली. मुख्यमंत्र्यांनी आजारपण संपल्यावर विधानसभा सभागृहात यावे, असे आवाहन त्यांनी केले.
त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले. मी जे बोललो तो रेकॉर्डवर आहे. चंद्रकांत दादा पाटील यांचा बाप मी काढलेला नाही. तसे सिद्ध झाले तर विधीमंडळाच्या पायऱ्यांवर मी नाक घासून माफी मागेन, असे आव्हानच जितेंद्र आव्हाडांनी दिले.
त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या म्याऊं म्याऊं करणे, बाप काढणे विधिमंडळाच्या पायर्यांवर नाक घासून माफी मागणे वगैरे “अतिशय गंभीर” मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राच्या जनतेने गप्प बसावे. कोरोना व मायक्रोनचा “सामना” करत शांतपणे घरात बसावे घरात बसावे. उगाच लस मागत इकडे तिकडे फिरू नये. महाराष्ट्र शासनाकडे मदतीसाठी तोंड वेंगाङू नये. ते सध्या “गंभीर” चर्चेत मग्न आहेत…!! जनतेच्या “फालतू” प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी त्यांना वेळ नाहीये. हे महाराष्ट्राच्या जनतेने समजून घ्यावे. मुख्यमंत्री आजारी आहेत. ते दोन दिवसांत विधिमंडळात येतीलही पण पंतप्रधान तंदुरुस्त आहेत मग ते संसदेत का आले नाहीत?, असा सवाल संजय राऊत यांनी केलाच आहे. या सवालाचे उत्तर महाराष्ट्राच्या जनतेने स्वतःच्या मनात जुळवत आणि घोळवत घरात बसावे…!! हेच बरे… अन्यथा जनतेला कोरोना होईल बरं…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App