राजकारणात तर लढाया होतच राहतात, पण जेव्हा एकमेकांविरूद्ध त्वेषाने लढणारे एकाच नेत्याचा वारसा सांगतात ना, तेव्हाच त्याचे मोठेपण अधोरेखित होत असते. बाळासाहेबांनी ते मोठेपण हयातीत मिळवले होतेच, पण मृत्यूनंतर तर त्यांचे हे मोठेपण अधिक विशाल भासते आहे. याचे कारण मुंबईत आणि महाराष्ट्रात लढत होणार आहे, बाळासाहेबांचा पुत्र विरुद्ध बाळासाहेबांचे पठ्ठे यांच्यात. यात कुठे 10 जनपथचे अनुयायी आणि सिल्वर ओकचे अनुयायी खिजगणतीतही दिसत नाहीत…!!mumbai corporation elections, true fight is among Balasaheb`s son and Balasaheb`s dispiles
महाराष्ट्राच्या विशेषतः मुंबईच्या “राजकीय नियती”नेच आता अशी रचना केली आहे की इथे सत्तेवर यावेत ते बाळासाहेबांचेच अनुयायी…!! आणि म्हणूनच मुंबई महापालिकेत आता लढत होणार आहे बाळासाहेबांचा पुत्र विरुद्ध बाळासाहेबांचे पठ्ठे यांच्यात. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेत तशी घोषणाच केली आहे.बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला त्यांनी अभिवादन केले. तिथे शिवसैनिक त्यांना येऊ देणार नव्हते. परंतु तसे घडले नाही. त्यांनी शांततेत तिथे दर्शन घेतले आणि तिथूनच त्यांनी सध्याच्या शिवसेनेवर म्हणजे बाळासाहेबांच्या पुत्रावर राजकीय हल्लाबोल केला. इथूनच खऱ्या अर्थाने मुंबई महापालिकेसाठी राजकीय संघर्षाची ठिणगी पाडली, बाळासाहेबांचा पुत्र विरुद्ध बाळासाहेबांच्या पठ्ठा यांच्यात…!!
या लढाईत बाळासाहेबांच्या पुत्राबरोबर सध्या सत्तेच्या वळचणीला असलेले पक्ष आणि नेते आहेत कुठे…?? त्यापैकी एका नानांनी तर लोणावळ्यातून स्वबळाची राणा भीमदेवी थाटात घोषणा केली. त्यांच्या मुंबईतल्या भाईंनी आंदोलन करताना बैलगाडीवर चढून मोठमोठ्या घोषणा दिल्या, पण दुर्दैव असे की त्यांच्यासकट बैलगाडीच कोसळली. आता हे नाना आणि भाई बाळासाहेबांच्या पुत्राच्या बाजूने उभे राहिले काय किंवा विरोधात लढले काय काय फरक पडतो…!! जिथे बैलगाडीच कोसळली तिथे हे काय स्वतंत्रपणे, स्वबळावर लढणार आणि कोणा – कोणाला आव्हान देणार…??
बाकी मुंबई पुरता बाळासाहेबांच्या पुत्राच्या वळचणीला आलेला पक्ष म्हणजे “सिल्वर ओक”करांचा. म्हटलं तर ते बाळासाहेबांच्या पुत्राबरोबर आहेत. नाही म्हटलं तर विरोधात आहेत. बाळासाहेबांचा पुत्र विरुद्ध बाळासाहेबांचा पठ्ठा यांच्यात नेमके कोण जिंकावे?, असे “सिल्वर ओक”करांना वाटत असेल, तर याचे उत्तर बाळासाहेबांचा पठ्ठा जिंकावा, असे असेल. कारण बाळासाहेबांचा पुत्र जिंकला तर पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या पुत्राच्या वर्चस्वाखाली राज्यशकट हकावा लागेल. पण बाळासाहेबांचा पुत्र हरला तर मात्र आपले घोडे दोन घरे तरी पुढे दामटत येईल, असा सिल्वर ओक करांचा राजकीय होरा आहे. पण एकूण काय लढाई बाळासाहेबांच्या पुत्रामध्ये आणि पठ्ठ्यांमध्येच आहे.
बाळासाहेबांच्या पुत्राबरोबर सध्या “सिल्वर ओक करां”च्या पक्षात असलेले दोन पठ्ठे आहेत. ते पूर्वी बाळासाहेबांचे पठ्ठे होते. पण त्यांनी पण मध्यंतरी वस्ताद बदलला आणि आता पुन्हा एकदा ते बाळासाहेबांच्या पुत्राबरोबर लढतीत उतरू इच्छितात. बाळासाहेबांच्या पुतण्या पठ्ठ्याचा तिसरा पक्ष मुंबई महापालिका निवडणूकीत हिरीरीने उतरणार आहेच. त्याला तर ठाकरेंचा रक्ताचा वारसा आहे. हा पठ्ठाही बाळासाहेबांनीच घडवलेला आहे. म्हणजे मुंबई महापालिकेत त्रिकोणी-चौकोनी-पंचकोनी अशी कितीही कोनांमधली लढत होवो, तरी अंतिम लढत बाळासाहेबांचा पुत्र आणि बाळासाहेबांचा पठ्ठा यांच्यातच होणार आहे.
यात बाळासाहेबांच्या पुत्राबरोबर त्यांचे तीन नातूही लढतीत उतरतील ते थोडीफार कोणा कोणाशी कुस्ती खेळतील पण एकूण अख्ख्या मुंबईची लढत “बाळासाहेब” याच नावाभोवती फिरत राहील. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर दहा वर्षांनी ही स्थिती आली आहे. हा बाळासाहेबांचा खरा राजकीय प्रभाव आहे. बाळासाहेबांनी कधी, “माझी संसदीय कारकिर्द 50 वर्षांची आहे. मी अमुक केले आहे, तमुक केले आहे,” अशा गप्पा मारल्या नाहीत किंवा एकदा हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर हिंदुत्व विरोधकांशी “पाट लावला” नाही. त्यांनी रोखठोक कोणालाही शिव्या दिल्या असतील, पण पाठीत खंजीर खुपसले नाहीत. म्हणून असा बडा वारसा त्यांना निर्माण करता आला.
राजकारणात तर लढाया होतच राहतात पण जेव्हा एकमेकांविरूद्ध त्वेषाने लढणारे एकाच नेत्याचा वारसा सांगतात ना, तेव्हाच त्याचे मोठेपण अधोरेखित होत असते. बाळासाहेबांनी ते मोठेपण हयातीत मिळवले होतेच, पण मृत्यूनंतर तर त्यांचे हे मोठेपण अधिक विशाल भासते आहे. याचे कारण मुंबईत आणि महाराष्ट्रात लढत होणार आहे बाळासाहेबांचा पुत्र विरुद्ध बाळासाहेबांचे पठ्ठे यांच्यात. यात कुठे 10 जनपथचे अनुयायी आणि सिल्वर ओकचे अनुयायी खिजगणतीतही दिसत नाहीत…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App