विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा प्रवाशांना १ सप्टेंबरपासून अधिक भाडे मोजावे लागणार आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) रिक्षा भाडेवाढीला अधिकृत मंजुरी दिली असून, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
नवीन दरांनुसार, पहिल्या दीड किलोमीटरसाठीचे किमान भाडे २५ रुपयांवरून ३० रुपये करण्यात आले आहे. तसेच त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठीचे भाडे १७ रुपयांवरून २० रुपये करण्यात आले आहे. हे नवीन दर १ सप्टेंबरपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात लागू होणार आहेत.
सीएनजीसह इतर इंधनांच्या वाढत्या किमतींमुळे रिक्षा चालकांचा खर्च वाढल्याचे सांगत रिक्षा संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रस्ताव तयार करून तो आरटीएसमोर मांडला. अखेर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
या निर्णयामुळे वाढत्या खर्चाचा सामना करणाऱ्या रिक्षा चालकांना काहीसा दिलासा मिळणार असला, तरी रोज रिक्षाने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. प्रशासनाने प्रवाशांना नवीन भाडेदरांची माहिती घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App