राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 2014 पासून 2024 पर्यंत घेतलेल्या राजकीय भूमिकेचा स्पष्ट खुलासा केला. या मुलाखतीत पवार म्हणाले, आम्हाला भाजप नको, पण अजित पवारांसकट बाकी सगळे चालतील. जे आज भाजपबरोबर सत्तेत गेलेत, ते परत आले तर “इंडिया” आघाडीत त्यांचे स्वागतच करू. कारण आम्हाला भाजपबरोबर जाणे मान्य नाही. 2014 आणि 2017 मध्ये भाजपबरोबर जाण्याची आपली स्वतःची तयारी नव्हती, पण आपल्या सहकाऱ्यांना तसे वाटत होते. पण पक्षप्रमुख म्हणून अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला असल्याने आपण उद्धव ठाकरेंसमवेत जाण्याचा निर्णय घेतला कारण शिवसेनेला भाजपपासून बाजूला काढण्याचा आमचा तो डाव होता, असा स्पष्ट असा खुलासा पवारांनी केला.Why sharad pawar afraid of national parties like BJP or Congress??
शरद पवारांच्या या खुलाशामुळे अजित पवारांनी तसेच प्रफुल्ल पटेल यांनी आत्तापर्यंत केलेल्या वेगवेगळ्या दाव्यांचे शरद पवारांचे वेगळे “व्हर्जन” समोर आले. पवारांना कोणत्याही स्थितीत भाजप नको, हे “राजकीय सत्य” प्रस्थापित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण “ते” “शरद पवार” आहेत आणि शरद पवारांचे वाक्य सरळ अर्थाने घेणे महाराष्ट्राच्या अनुभवसिद्ध राजकारणात कठीण आहे. पवार म्हणतात त्याप्रमाणे खरंच त्यांना भाजप नको आहे का??, नको असल्यास कोणत्या कारणासाठी नको आहे??, पवार भाजपला घाबरतात का?? आणि घाबरत असतील तर ते का घाबरतात??, ते फक्त भाजपलाच घाबरतात, की अन्य कुठल्या पक्षालाही घाबरतात??, तसे ते अन्य पक्षाला घाबरत असतील, तर त्या पक्षाला देखील ते का घाबरतात??, अशा एकापाठोपाठ एक सवालांची मालिका शरद पवारांच्या “भाजप नको, पण बाकीचे सगळे चालतील” या एका वक्तव्यातून तयार झाली आहे.
…आणि थोडा पवारांच्या राजकारणाचा बारकाईने विचार केला, तर त्याची उत्तरेही उघडपणे देता येऊ शकतील इतकी सुस्पष्ट आहेत. पवारांना भाजप नको आहे. तो त्यांच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वप्रणालीत बसत नाही, हे खरेच. पण मग 1978 साली वसंतदादांचे सरकार पाडून पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार बनवताना पवारांना त्यामध्ये त्यावेळचा जनसंघ कसा काय चालला?? जनसंघाच्या उत्तमराव पाटलांना आणि हशु अडवाणी यांना पवारांनी आपल्या मंत्रिमंडळात का मंत्री केले??, असे सवाल एबीपी माझाच्या प्रतिनिधीने त्यांना विचारले नाहीत. त्यामुळे त्यांना त्याचे उत्तर देणे भाग पडले नाही. पण म्हणून हा सवाल गैरलागू होतो, असे अजिबात नाही. पवारांना या सवालाचे उत्तर द्यावेच लागेल. कारण त्यावेळी शरद पवारांना यशवंतराव चव्हाण यांचा पाठिंबा होता, असे सांगितले गेले, तरी खुद्द यशवंतरावांनी त्याचा इन्कार केला होता. शरद पवारांच्या मंत्रिमंडळात जनसंघ होता म्हणून आपण त्याला पाठिंबा दिला नाही, असे यशवंतरावांनी म्हटल्याचे इतिहासात नमूद आहे.
पण हा झाला एक मुद्दा. या खेरीज असे अनेक मुद्दे आहेत, की जे पवार आणि भाजप यांच्या संबंधांवर विशिष्ट प्रकाश टाकतात.
मग पवारांना भाजप का नको आहे??, त्याचे खरे राजकीय इंगित काय आहे?? आणि त्यांना खरंच फक्त भाजप नको आहे की अन्य कोणी नको आहे??, हे पवारांच्या आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीतून स्पष्ट होते.
खरं म्हणजे पवारांना राष्ट्रीय पातळीवरचा कुठलाच प्रबळ पक्ष नको आहे. कारण त्या प्रबळ पक्षाशी पवारांना खऱ्या अर्थाने स्वतःच्या “टर्म्स अँड कंडिशन्स”वर डील करताच येत नाही. हे फक्त भाजपच्या बाबतीत लागू नाही, तर खुद्द काँग्रेसच्याही बाबतीत हेच लागू आहे. ज्यावेळी काँग्रेस प्रबळ होती आणि खुद्द पवार काँग्रेसमध्ये होते, त्यावेळी काँग्रेसच्या दिल्लीतल्या वर्तुळाशी शरद पवारांचे कधीच पटू शकले नाही. पवारांच्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव, सीताराम केसरी आणि सोनिया गांधी हे काँग्रेस अध्यक्ष झाले. पवार काँग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांपैकी एक नेते म्हणून काँग्रेसमध्ये वावरले, पण ज्यावेळी पवारांनी काँग्रेस श्रेष्ठींना आव्हान देण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी प्रत्येक काँग्रेस श्रेष्ठीने म्हणजेच नरसिंह राव, सीताराम केसरी आणि सोनिया गांधी यांनी पवारांना निर्णायकरित्या पराभूत केले. त्यांची डाळ दिल्लीच्या राजकारणात शिजू दिली नाही. म्हणून पवारांना दिल्लीच्या राजकारणात प्रबळ असलेला कुठलाही राजकीय पक्ष नको आहे!! कारण त्या पक्षाबरोबर स्वतःच्या “टर्म्स अँड कंडिशन्स” नुसार डील करण्याची पवारांची क्षमता आणि कुवत नाही.
आज भाजप मोदी आणि शहांच्या नेतृत्वाखाली इतका जबरदस्त प्रबळ आहे की पवारांसारखे किती नेते आले आणि किती नेते गेले, तरी भाजपला त्यामुळे किंचितही फरक पडणार नाही. पवारांच्या ज्येष्ठतेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा जे. पी. नड्डा हे त्यांचा वैयक्तिक मानसन्मान राखत असतील, पण त्यांची “राजकीय पत्रास” ठेवण्याची मोदी शाह किंवा नड्डा यांना बिलकुलच गरज नाही. किंबहुना सध्याच्या भाजपला महाराष्ट्राचे आणि देशाचे राजकारण स्वतःच्या पद्धतीने साध्य करण्यासाठी पवारांसारख्या उपप्रादेशिक नेत्याची अजिबात आवश्यकता नाही… आणि किरकोळ स्वरूपात आवश्यकता असलीच किंबहुना किरकोळ स्वरूपाचा वापर करायचा असेल, तर सावरकर वगैरे मुद्द्यावर राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या बाकीच्या नेत्यांना झापण्यापुरता मर्यादित किंवा काँग्रेसच्या मार्गात किरकोळ थोडेफार अडथळे निर्माण करण्याकरता पवारांचा उपयोग करता आला, तर करण्याएवढेच पवारांचे राजकीय महत्त्व भाजपसाठी शिल्लक आहे.
– पवारांच्या मागे इतर नेते जातील का??
त्यामुळे पवारांना कितीही “भाजप नको, बाकी कोणीही आले तरी चालतील”, असे वाटत असले, तरी मूळात भाजप आता महाराष्ट्रातला क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. इतकेच नाही, तर महाराष्ट्रातली भाजपची “पॉलिटिकल पोझिशन” क्रमांक एकचा पक्ष म्हणून एवढी कन्सॉलिडेट झाली आहे, की बाकी कुठलेही उपप्रादेशिक किंबहुना काँग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष देखील भाजपच्या पासंगालाही पुरेल एवढा शिल्लक राहिलेले नाहीत. त्यामुळे पवारांनी, “भाजप नको, इतर कोणीही आले तर चालतील”, असे म्हणून फार तर महाराष्ट्रात इतर पक्षांच्या नेत्यांमध्ये “काडी” घातली किंवा टाकली असेल, पण त्यामुळे महाराष्ट्रातल्या भाजपच्या राजकीय परफॉर्मन्सवर त्याचा परिणाम होण्याची सुतराम शक्यता नाही. …आणि आज भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसलेले बाकीचे नेतेही पवारांच्या वक्तव्यामुळे “राजकीय हूल” बसून ते पवारांच्या मागे जाण्याची सुतराम शक्यता नाही. पवारांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीच्या निमित्ताने ही वस्तुस्थिती समोर आणावी लागली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App