विशेष प्रतिनिधी
पुणे : गणेशोत्सव तोंडावर आला असताना पुणे शहरातील रस्ते, वाहतूक आणि नागरी सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गणेशोत्सवापूर्वी शहर खड्डेमुक्त आणि अतिक्रमणमुक्त करावे, तसेच वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन केली.
सोमवारी झालेल्या या भेटीत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज, ड्रेनेज, स्वच्छता आणि प्रलंबित विकासकामांबाबत आयुक्तांना सविस्तर निवेदन दिले. गणेशोत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने त्यापूर्वी आवश्यक नागरी कामे पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी
शहरातील सर्व खड्ड्यांची शास्त्रीय पद्धतीने आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी काँग्रेसने केली. फुटपाथ अतिक्रमणमुक्त करून ते पादचाऱ्यांसाठी सुरक्षित करावेत, तसेच वाढत्या वाहतूक कोंडीवर तातडीने कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
सिंहगड रस्त्यासह पूरप्रवण भागांसाठी कायमस्वरूपी पूरनियंत्रण आराखडा तयार करण्याची मागणीही करण्यात आली.
पाणी आणि ड्रेनेज व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह
पुणे शहरातील सर्व भागांना समान आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी शास्त्रीय पाणी नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली. टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्याची मागणीही शिष्टमंडळाने केली.
याशिवाय ड्रेनेज, नाले आणि पावसाळी पाण्याचा निचरा व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावीत, असेही काँग्रेसने म्हटले आहे.
होर्डिंग्जपासून निविदांपर्यंत चौकशीची मागणी
शहरातील अनधिकृत जाहिरात फलक आणि होर्डिंग्ज तातडीने हटवून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. संशयास्पद किंवा तक्रारी असलेल्या महापालिका निविदांची स्वतंत्र चौकशी करून निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणि खुली स्पर्धा सुनिश्चित करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
विकासकामांची स्वतंत्र गुणवत्ता तपासणी करून निकृष्ट कामे करणारे ठेकेदार, संबंधित अधिकारी आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणीही शिष्टमंडळाने केली.
‘नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळणे हा अधिकार’
“पुणेकरांना दर्जेदार आणि वेळेत नागरी सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. विकासकामांमध्ये दिरंगाई किंवा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. प्रशासनाने नागरिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून तातडीने कार्यवाही करावी,” अशी भूमिका विश्वजित कदम यांनी मांडली.
पुण्याचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेऊन भविष्यातील गरजांचा विचार करून विकासकामांचे नियोजन करण्याची गरज असल्याचेही कदम यांनी सांगितले.
या शिष्टमंडळात काँग्रेसचे गटनेते ॲड. रामचंद्र ऊर्फ चंदूशेठ कदम, शहराध्यक्ष (पूर्व) दीप्ती चवधरी, शहराध्यक्ष (पश्चिम) प्रशांत जगताप यांच्यासह काँग्रेसचे माजी सभासद, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App