नाशिक : “तुम रूठे रहो हम मनाते रहे” अर्थात ठाकरे – शिंदे गटाचे संयुक्त मानापमान”, हे शीर्षक थोडे विचित्र वाटेल कारण काकासाहेब खाडिलकर यांनी लिहिलेल्या मानापमानात “तुम रूठी रहो हम मनाते रहे हे”, गीत नाही. तरी शिवसेनेत सध्या सुरू असलेल्या संयुक्त मानापमानात हेच पद गायले जात आहे. कारण दोन्ही गट एकमेकांना आपल्याकडे येण्यासाठी समजावत आहेत. Uddhav Thackeray and eknath shinde counciling each other to accept their own formula
एकीकडे एकनाथ शिंदे गटाने आपली भूमिका पहिल्या दिवसापासूनच आठव्या दिवसापर्यंत एकच आणि ठाम ठेवली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याबरोबरची आघाडी तोडा. महाविकास आघाडीतून बाहेर पडा आणि भाजपबरोबर सत्ता स्थापन करा, ही एकनाथ शिंदे गटाची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आता दररोज गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर मांडत आहेत.
शिवसेनेच्या भूमिकेत मात्र दररोज खालीवर होताना दिसत आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्ह सारखी शिवसेनेची भूमिका बदलत आहे.
दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे गटाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या नावाने अल्टीमेटम जारी केला. कदाचित आजचे आवाहन शेवटचे असेल. उद्धव साहेब निर्णय घ्या. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या बरोबरचे संबंध तोडून भाजपबरोबर सरकार बनवा. आम्ही शिवसेनेतच आहोत. तुमचे नेतृत्व आम्हाला मान्य आहे. आम्ही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मागितलेला नाही, अशी भूमिका मांडली आहे.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील स्वतःची भूमिका लवचिक करत शिंदे गटातल्या आमदारांना तुम्ही परत या. तुम्ही गुवाहाटीत अडकून पडला आहात. परत येऊन समोरासमोर बसून बोला. तोडगा निघेल, असे आवाहन केले आहे. अर्थात मुख्यमंत्र्यांच्या या सूर्यापेक्षा संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांचे सूर आजही वेगळे आहेत किंबहुना शिंदे गटातल्या आमदारांना हिणवण्याचे आहेत. ठाकरे आणि शिंदे गटातल्या भांडणात संजय राऊत हे मुख्य व्हिलन ठरले आहेत.
दीपक केसरकर यांनी कालच मुख्यमंत्र्यांना खुले पत्र लिहून पहिल्यापासून भूमिका मांडलेलेच आवाहन केले होते. आज मुख्यमंत्र्यांनी पत्रक काढून आपली लवचिक भूमिका जाहीर केली आहे. एवढेच नाही तर एकनाथ शिंदे यांनी रायगडच्या विमानतळाला दिलेले नाव दि. बा. पाटील हे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी कायम केले आहे.
शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट यांचे हेच सध्या “तुम रूठे रहो हम मनाते रहे” असे संयुक्त मानापमानाचे नाटक आज तरी पुढे चालू राहिलेले दिसले आहे. अर्थात या नाटकाची भैरवी कशी होणार आहे हे मात्र या दोन्ही गटांनी अद्याप तरी अंतिम ठरवलेले दिसत नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App