अजित पवारांबरोबर 2019 मध्ये 10 आमदार राजभावनावर पोहोचले होते. सकाळी 8.10 वाजता फडणवीस – पवार शपथविधी झाला. त्याने राष्ट्रवादीला प्रचंड फरक पडला. शरद पवारांनी ते बंड मोडून काढले. पण राष्ट्रवादीच्या 10 आमदार फुटण्याने राष्ट्रवादीला जो “प्रचंड” फरक पडला, तेवढा फरक 39 आमदार फुटण्याने शिवसेनेला पडणार नाही, असा दावा शरद पवारांनी आज 26 जून 2022 रोजी नवी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत केला आहे. Sharad Pawar praise Shivsena strength, but does it make a true sense??
– अजितदादांचे बंड 72 तासात मोडले पण
शिवसेनेची शिवसैनिक ही प्रचंड ऊर्जा आणि ताकद आहे. त्यामुळे हे जे काही 40-50 जण बाहेर गेलेत त्याने शिवसेनेला फरक पडणार नाही, असा दावा शरद पवारांनी केला आहे. शरद पवारांनी अजित पवारांचे बंड 72 तासांत मोडून काढले होते. अजित पवारांबरोबरच्या सर्व आमदारांनी आपल्या निष्ठा शरद पवारांशी आहेत आपल्याला कल्पना न देता राजभवनावर नेले होते, अशा प्रकारची ट्विट करवून दहाच्या दहा आमदार राष्ट्रवादीत परत आणले होते. परंतु आता शिवसेनेचे 39 आमदार गुवाहाटीत आहेत. त्यातले 9 जण मंत्री आहेत. तरी देखील शरद पवारांचे वक्तव्य “शिवसेनेला काही फरक पडणार नाही”, असेच आहे. याचा नेमका राजकीय अर्थ काय आहे??
– शिवसेनेच्या ताटात वाढली दीर्घ लढाई
शिवसेनेला सरळ सरळ ही लढाई दीर्घकालीन लढावी लागणार आहे. ती नुसती रस्त्यावरची लढाई नसून न्यायालयीन देखील आहे. त्यामुळे “शिवसेनेला अजिबातच फरक पडणार नाही”, हे शरद पवारांचे विधान सत्याच्या कसोटीवर टिकणारे नाही. शिवसेनेची लढाई जितकी दीर्घ काळ लांबेल तितकी शिवसेनेच्या नेत्यांची, आमदारांची आणि शिवसैनिकांची मने एकमेकांपासून दुरावणार आहेत. कलुषित होणार आहेत हा खऱ्या अर्थाने शिवसेनेचा सर्वात मोठा तोटा आहे!!
– आदित्य, राऊत, मराठी माध्यमे त्रिकूटे
मग भले संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि मराठी माध्यमे असे त्रिकूट शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाभोवती कितीही मोठा कोट करून उभे राहिले, तरी देखील, “शिवसेनेसाठी काही फरक पडणार नाही”, हे पवारांचे वक्तव्य खरंच सत्याच्या कसोटीवर उतरणारे नाही उलट ही पवार यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाला दिलेली हूल आहे, असे वाटते. आणि पवारांच्या राजकीय विधानाचा नेहमी उलटा अर्थ घ्यायचा असतो हा राजकीय निकष लावला, तर “शिवसेनेला काही फरक पडणार नाही”, असे जेव्हा पवार म्हणतात तेव्हा शिवसेनेला “फार मोठा फरक” पडेल, असाच त्याचा अर्थ होतो!!
– प्रत्येक जिल्हा, तालुका, गाव पातळीवर फुट
शिवसेनेतल्या आमदारांची फूट जिल्हा तालुका आणि गाव स्तरावर पडल्याशिवाय राहणार नाही. याची चिन्हे सध्याचा उद्धव ठाकरे गटाचा शिवसैनिक रस्त्यावर उतरून दाखवून देतट आहेत. बंडखोर आमदारांपैकी दोन-तीन आमदारांचे समर्थक त्यांच्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये रस्त्यावर उतरलेले दिसले आहेत. पण उद्धव ठाकरे गटाचा जसा रस्त्यावर आंदोलन करण्याचा प्रभाव वाढेल, तस तसा शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचाही आंदोलनाचा प्रभाव वाढेल आणि ही दोघांची आंदोलने एकमेकांविरोधात असतील, ही वस्तुस्थिती नाकारण्यात मतलब नाही. अर्थातच याचा अंतिम परिणाम शिवसेनेच्या दोन गटांमध्ये प्रचंड घमासान असाच असेल. या कसोटीवर देखील शरद पवारांचे “शिवसेनेला काही फरक पडत नाही” हे विधान सत्याच्या कसोटीवर उतरताना दिसत नाही.
– पवारांची तारीफ ही धोक्याची घंटा
त्यामुळे शरद पवारांनी आजच्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीची आणि शिवसैनिकांच्या जाज्वल्य पक्षनिष्ठेची कितीही तारीफ केली असली तरी ती पवारांनी केलेली “तारीफ” आहे ही राजकीय वस्तुस्थिती विसरून चालणार नाही!! किंबहुना ही “तारीफ” शिवसेना नेतृत्वासाठी सगळ्यात मोठा मोठी धोक्याची घंटा आहे हे गृहीत धरून चालले पाहिजे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App