सरकार पाडण्याचा पृथ्वीराज चव्हाणांनी ठपका ठेवला पवारांवर, पण राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर फेकली गेल्याचे “क्रेडिट” तटकरेंनी दिले चव्हाणांना!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे सरकार जाऊन तब्बल 9 वर्षे उलटून गेल्यानंतर ते सरकार नेमके का गेले??, यावर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये भांडण जुंपले आहे. त्यातही काँग्रेस राष्ट्रवादीचे आपले सरकार राष्ट्रवादी काँग्रेसने पाडले, असा आरोप करून पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांवर ठपका ठेवला. पण या ठपक्याचे प्रत्युत्तर मात्र सध्या शरद पवारांपासून दूर गेलेल्या सुनील तटकरे यांनी दिले. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकली गेल्याचे “क्रेडिट” तटकरे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना दिले. Prithviraj chavan targets sharad pawar for pulling down his government

पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे वादाची नवी ठिणगी पडली. कराडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी 2014 चा सर्व घटनाक्रम विशद केला. त्यावेळी आपण मुख्यमंत्री असताना राज्य सहकारी बँकेबाबत काही निर्णय घ्यावा लागला. बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करावे लागले, पण त्याची फार मोठी किंमत मला चुकवावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसने माझे सरकार पाडले, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.



राज्य सहकारी बँकेवर त्यावेळी पवारांचे वर्चस्व होते. अजित पवार यांच्यासह अनेक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते संचालक होते. त्यांनी जे कर्ज वाटप केले. त्या कर्जवाटपामुळे बँक तोट्यात आली. रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेतल्या गैरव्यवहारावर ठपका ठेवला. याची दखल घेऊन पृथ्वीराज चव्हाणांनी राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले आणि कोर्टाची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे शरद पवारांच्या आर्थिक हितसंबंधांना प्रचंड धक्का बसला. यामुळे चिडून शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे सरकार मुदतीपूर्वीच पाडले.

आपले सरकार पाडले नसते तर आपण मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यावेळी मार्गी लावला असता. 2014 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीत एकत्र लढले असते, तर भाजपचे सरकार तेव्हा आलेच नसते आणि पुढच्या सरकारमध्ये देखील आपण मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला असता, असे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या भाषणाचा सर्व रोख शरद पवारांवर होता, पण शरद पवारांऐवजी सुनील तटकरेंनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपाचे उत्तर दिले. काँग्रेस – राष्ट्रवादी सरकार मध्ये विलासराव देशमुख हे सर्वोत्तम मुख्यमंत्री होते, पण पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसच्या नेतृत्वाने त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला संपवा, अशी “सुपारी” देऊनच महाराष्ट्रात पाठविले होते. पृथ्वीराज चव्हाण त्याप्रमाणे वागले. त्यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर फेकली गेली, असा आरोप करून सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घसरलेल्या परफॉर्मन्सचे “क्रेडिट” पृथ्वीराज चव्हाण यांना दिले.

मराठा आरक्षणाच्या निमित्ताने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे हे जुने भांडण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. महाविकास आघाडीतले जागावाटप हा विषय ऐरणीवर येत असताना हे जुने भांडण चव्हाट्यावर आल्याने काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेस पासून बाजूला होऊन स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा होत आहे.

Prithviraj chavan targets sharad pawar for pulling down his government

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात