– नराधमाला फाशी झाल्याबद्दल आनंदोत्सव; गृहमंत्र्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कृतज्ञता निवेदन Nasrapur rape case
विशेष प्रतिनिधी
पुणे : नसरापूर येथील चिमुकलीवरील अमानवी अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल पुण्यात ‘महिला शक्ती समूह’ आणि ‘संघटित नारी शक्ती’ तर्फे आनंद व्यक्त करण्यात आला. या ऐतिहासिक आणि न्याय्य निकालाचे स्वागत करण्यासाठी सोमवारी संध्याकाळी ‘कलाकार कट्टा’ येथे जाहीर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
पीडितेला जलद गतीने न्याय मिळवून दिल्याबद्दल या वेळी तपासयंत्रणा आणि न्यायव्यवस्थेचे जाहीर अभिनंदन करण्यात आले. सभेनंतर संस्थेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या गृहमंत्र्यांना कृतज्ञता निवेदन पाठवण्यात आले. कलाकार कट्टा आणि गुडलक चौक परिसरात झालेल्या या अभिवादन सभेत शहरातील महिला शक्ती समूह उत्स्फूर्तपणे एकत्र आला होता. सभेचे सूत्रसंचालन उमा गाडगीळ यांनी केले, तर प्रिया रसाळ यांनी प्रास्ताविकातून सभेची भूमिका मांडली. निशा सिधये यांनी या वेळी गृहमंत्र्यांना पाठवलेल्या मुख्य निवेदनाचे जाहीर वाचन केले. मनोगत व्यक्त करताना राज्य महिला व बालकल्याण सल्लागार समितीच्या सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्या नलिनी वायाळ आणि ॲड. अनिशा फणसळकर म्हणाल्या, तपास यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेने दाखवलेली तत्परता महिलांच्या सुरक्षेसाठी आशादायी पाऊल आहे. अशा प्रकारच्या कठोर आणि तात्काळ शिक्षेमुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल आणि अत्याचारांना आळा बसेल.
ॲड. वर्षा डहाळे यांनी सभेचा समारोप केला.काही बदल कायद्यात आवश्यक आहे याची जाणीव आहे परंतु हा संयुक्त, सामूहिक प्रयत्नांचा विषय आहे त्यासाठी जाणकार, अभ्यासू, विचारवंत यांनी एकत्र येऊन कायद्यात बदल घडवून आणावे लागतील. सामूहिक प्रयत्नातून हे शक्य होऊ शकेल असे सांगितले. तर जागृती अयाचित यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
– कायद्याचे राज्य सर्वोच्च
सभेनंतर जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात ‘संघटित नारी शक्ती’ने प्रशासनाचे आभार मानले आहेत. १ मे रोजी घडलेल्या या निर्घुण घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता. मात्र, पोलिसांनी दाखवलेली कायदेशीर तत्परता आणि न्यायालयाने अवघ्या काही दिवसांत दिलेला हा निकाल महिला व बालकांच्या सन्मानासाठी एक कणखर कवच ठरला आहे, अशी भावना निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. हा ऐतिहासिक निकाल गुन्हेगारांना सज्जड इशारा देणारा असून यामुळे अत्याचारग्रस्तांना न्याय मागण्यासाठी धीर मिळेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. सुरक्षा हे संपूर्ण समाजाचे दायित्व केवळ कायदे करून महिला आणि मुले सुरक्षित होणार नाहीत. त्यांची सुरक्षा ही केवळ शासन किंवा पोलिसांची जबाबदारी नसून, ती प्रत्येक कुटुंबाची आणि नागरिकाची जबाबदारी आहे. अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायद्यासोबतच समाजात संवेदनशीलता वाढवणे हे सुसंस्कृत समाजाचे सर्वोच्च दायित्व आहे, असे आवाहनही या निवेदनातून करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App