राम नवमीच्या दिवशी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मांसाहाराचा आग्रह धरणे, त्याच दिवशी पुण्यात नास्तिक परिषद भरवण्याचा आग्रह धरणे या दोन्ही घटना वरवर पाहता वेगवेगळ्या असल्या तरी त्यातला अंतर्गत धागा अथवा त्यातली मानसिकता समान आहे. रसातळाला चाललेल्या काँग्रेसचे उपद्रवमूल्य दाखवणाराच प्रकार आहे. किंबहुना जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पोसलेल्या जाणाऱ्या बृहत डाव्या विचारसरणीच्या मूळातून आलेल्या राजकीय विषवल्लीचे हे नवे परिमाण आहे.congress Attempts to pull the Indian Union in the opposite direction
जवाहरलाल नेहरु विद्यापीठ इंदिराजींनी डाव्या विचारसरणीच्या लोकांना आंदण देऊन टाकले होते. या देशाचे वैचारिक भरण-पोषण तुम्ही डाव्या विचारसरणीने करत राहा. पण माझ्या सत्तेला कोणताही हात लावता कामा नये, अशी अलिखित अट त्यांनी डाव्यांना घालूनच आपल्या वडिलांच्या नावाचे असणारे विद्यापीठ कम्युनिस्टांना आंदण देऊन टाकले होते. सध्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सुरू असलेल्या डाव्यांच्या विविध कारवाया हा इंदिराजींच्या विचारसरणीचा फुगवटा आहे. आणि नेमका हाच “वैचारिक फुगवटा” काँग्रेसला रसातळाला घेऊन गेला आहेत.
– “डावे गारुड” उध्वस्त
अर्थात काँग्रेस वेगाने रसातळाला गेली असली तरी तिचे तरी उपद्रवमूल्य संपलेले नसल्याचेही नेहरु विद्यापीठातल्या कारवाया आणि नास्तिक परिषदांसारखे प्रकार हे निदर्शक आहेत. वैचारिक दृष्ट्या आता हिंदुत्ववाद्यांशी संघर्ष सोपा राहिलेला नाही. कारण मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय समाज यावरचे “डावे गारुड” केव्हाच उध्वस्त झाले आहे. संघटनात्मक पातळीवर तर डावे संपलेच आहेत आणि त्यानंतर काँग्रेस ही संघटनात्मक पातळीवर विस्कळीत झाली आहे. अशा स्थितीत संघटन तर पुन्हा उभे करता येत नाही आणि संघटन उभे करून भाजपशी मुकाबला करण्याची खात्री देता येत नाही… मग निदान आपल्या उरलेल्या वैचारिक धांदोट्यांमधून तरी त्याला विरोध करून पहावा म्हणून एल्गार परिषद, राम नवमीच्या दिवशी मांसाहाराचा आग्रह धरणे, नास्तिक परिषदा भरवणे असले खुसपटी चाळे करावे लागतात. तेच काँग्रेसी आणि डाव्या विचारसरणीचे म्होरके करताना दिसत आहेत…!!
– चक्र उलटे फिरवण्याचा डाव
पण काँग्रेसच्या वैचारिक उपद्रवमूल्यचे उदाहरण आणखी पुढे येऊ घातले आहे, ते म्हणजे आपल्या देशाच्या फेडरल सिस्टीमला अर्थात संघराज्य व्यवस्थेला आव्हान उभे करण्याचे आहे. काँग्रेस आता तामिळनाडूच्या सत्ताधारी द्रमुक पक्षाबरोबर देशात “युनियन ऑफ इंडिया” मागू लागली आहे. याचा अर्थ काँग्रेसला हा देश केंद्र सरकारच्या अनुषंगाने चालवायचा नाही, तर राज्यांच्या अनुषंगाने केंद्र सरकारने चालावे, असे काँग्रेसचे कारस्थान आहे.
– इंग्रजांचा मूळ डाव
या कारस्थानी मागणीचा बारकाईने विचार केला पाहिजे. त्या मागच्या विचारसरणीचा नीट धांडोळा घेतला पाहिजे म्हणजे काँग्रेसी आणि डाव्या कारस्थानाचा उलगडा होईल. भारत कधीही एक नव्हता हा इंग्रजांचा सिद्धांत होता. भारताला आम्ही राजकीय ऐक्य सूत्रात बांधले, हा इंग्रजांचा दावा होता. तो दावा नेहरू प्रणित काँग्रेसने केव्हाच मान्य केला होता आणि त्यानंतर “इंडिया दॅट इज भारत युनियन ऑफ स्टेट्स” अशा पद्धतीने राज्यघटनेचे आणि प्रत्यक्ष राजकीय व्यवहाराचे अर्थात भारतीय संघराज्य व्यवस्थेचे स्वरूप विकसित झाले.
– काँग्रेसच्या एकमुखी सत्तेला सुरुंग
पण जोपर्यंत केंद्रात काँग्रेसची एकमुखी सत्ता होती तोपर्यंत वरून खाली चालणाऱ्या संघराज्य व्यवस्थेला काँग्रेसचा विरोध नव्हता. पण आता काँग्रेसची निरंकुश सत्ता तर संपलीच आहे. साधी सत्ता येणे देखील आता शक्य नाही. म्हणून मग भारतीय संघराज्य व्यवस्थेलाच उलट्या दिशेने खेचण्यासाठी काँग्रेस अधिक प्रयत्नशील झाली आहे. केंद्र सरकार जर भाजपसारख्या पक्षाच्या हातात मजबूत असेल तर संघराज्य व्यवस्थेलाच सुरुंग लावला आणि राज्यांना थेट स्वातंत्र्याच्या मर्यादेपर्यंत स्वायत्तता मागितली तर भाजपच्या राजकीय वर्चस्वाला टक्कर देता येईल, असा काँग्रेसचा आणि द्रमुक सारख्या प्रादेशिक पक्षांचा होरा दिसतो आहे. आपली सत्ता केंद्रात येण्याची शक्यता नसेल तर आपण संघराज्य व्यवस्थाच मोडू शकतो. त्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरू शकतो हे काँग्रेस दाखवून देण्याचा प्रयत्न करते आहे.
– संघराज्य व्यवस्थेवर कुठाराघात
काँग्रेसचे हे प्रयत्न संघराज्य व्यवस्थेच्या मूळावर आघात करणारे असतानाच द्रमुक आणि ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस वेगळाच राजकीय डाव मांडून बसले आहेत. द्रमुक आणि ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस यांच्या राजकीय चालीचे एक वैशिष्ट्य राहिले आहे, केंद्राकडे मदत तर मागायची. पैसा केंद्राकडून घ्यायचा. पण केंद्र सरकारची वैध अशी कुठलीच बाब राज्याने स्वीकारायची नाही हे धोरण द्रमुक आणि तृणमूल काँग्रेसचे राहिले आहे. त्याचा विस्तार काँग्रेस आता समाजवादी पक्ष आणि अन्य प्रादेशिक पक्षांमध्ये करून संघराज्य व्यवस्थेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करते आहे.
– हिंदुत्ववादी विचारसरणी समोर पराभव
रसातळाला गेलेल्या असलेल्या काँग्रेसचे हे खरे उपद्रवमूल्य आहे. हे खऱ्या अर्थाने आव्हान केवळ भाजपपुढे नव्हे, तर देशापुढे उभे करण्याचा डाव काँग्रेसचे आणि प्रादेशिक पक्षांचे नेते आखत आहेत. भाजपने किंबहुना हिंदुत्ववादी विचारसरणीने काँग्रेसच्या मुस्लिम लांगूलचालनाच्या विचाराशी यशस्वी मुकाबला केला आहे. भाजपचे हे यश पाहूनच काँग्रेसने भारतीय संघराज्य व्यवस्था उलट्या दिशेने खेचण्याचा डाव मांडण्याचा प्रयत्न चालवला आहे.
– चिनी माओवाद्यांशी टक्कर
काँग्रेसच्या या कारस्थानाशी भविष्यकाळात हिंदुत्ववादी विचारसरणीला टक्कर द्यावी लागणार आहे. त्यासाठी भाजपला आणि हिंदुत्ववादी विचारसरणीला भरपूर तयारी करावी लागणार आहे. कारण यामध्ये चीन सारख्या माओवादी विचारसरणीच्या देशाचा देखील काँग्रेस आणि डाव्या शक्तींना संपूर्ण पाठिंबा असणार आहे. खरे म्हणजे फूस असणार आहे. भारतीय संघराज्य व्यवस्था टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने हिंदुत्ववादी विचारसरणी आणि सत्ताधारी भाजप पुढले भविष्य काळातले हे सगळ्यात मोठे आव्हान असणार आहे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App