प्रतिनिधी
कोल्हापूर : देशातील शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणारे, माजी राज्यपाल आणि शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. (ज्ञानदेव यशवंतराव) पाटील यांचे मंगळवारी कोल्हापूर येथील कसबा बावडा येथील निवासस्थानी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी महाराष्ट्रासह देशभरात शिक्षणाचा मोठा विस्तार घडवून आणला. वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, दंतवैद्यक, कृषी, नर्सिंग आणि इतर उच्च शिक्षण क्षेत्रातील अनेक दर्जेदार संस्था त्यांनी उभारल्या. त्यांच्या शैक्षणिक संस्थांमधून लाखो विद्यार्थी घडले असून, शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन बनविण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
राजकीय कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली. सार्वजनिक जीवनातील योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविले होते.
त्यांच्या पश्चात माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सतेज (बंटी) पाटील, संजय पाटील आणि अजिंक्य पाटील असा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर विविध राजकीय पक्षांचे नेते, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि हजारो माजी विद्यार्थ्यांनी शोक व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App