वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Cyber Fraud कंबोडियातून चालवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटचा मोठा पर्दाफाश करत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजस्थान आणि पंजाबमध्ये धडक कारवाई केली आहे. तपासात तब्बल 36 हजार भारतीय सिम कार्ड कंबोडियामध्ये सक्रिय असल्याचे उघड झाले असून, त्यापैकी सुमारे 5,300 सिम कार्डांचा वापर भारतातील सायबर फसवणुकीसाठी करण्यात आल्याचे समोर आले आहे. या माध्यमातून देशभरातील नागरिकांची शेकडो कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.Cyber Fraud
2.3 लाख मोबाईल क्रमांकांची तपासणी, धक्कादायक माहिती उघड
सायबर फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर ईडीने सुमारे 2.3 लाख संशयास्पद मोबाईल क्रमांकांचे विश्लेषण केले. या तपासादरम्यान हजारो भारतीय सिम कार्ड परदेशात वापरात असल्याचे आढळले. विशेष म्हणजे, 36 हजार सिम कार्ड थेट कंबोडियामध्ये कार्यरत असल्याची माहिती समोर आली.Cyber Fraud
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या सिम कार्डांचा वापर करून बनावट कॉल, ऑनलाइन गुंतवणूक फसवणूक, डिजिटल अटक, बँकिंग फसवणूक आणि इतर सायबर गुन्हे घडवून आणले जात होते.
राजस्थान-पंजाबमध्ये सात ठिकाणी छापे
ही कारवाई मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) करण्यात आली. जोधपूर सायबर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने तपास सुरू केला होता.
५ जूनपासून सुरू झालेल्या कारवाईत राजस्थानमधील किशनगड, नागौर आणि जोधपूर, तसेच पंजाबमधील लुधियाना येथे एकूण सात ठिकाणी छापे टाकण्यात आले.
या छापेमारीत ईडीने मोठ्या प्रमाणात महत्त्वाची कागदपत्रे, डिजिटल पुरावे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि 14 मोबाईल फोन जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या उपकरणांमधून आणखी अनेक धागेदोरे मिळण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
लोकांच्या नावावर गुपचूप अतिरिक्त सिम कार्ड
ईडीच्या तपासात या रॅकेटची कार्यपद्धतीही उघड झाली आहे. सिम विक्रेते आणि एजंट टेलिकॉम कंपन्यांच्या पॉइंट ऑफ सेल (पीओएस) आयडीचा वापर करून ग्राहकांना नवीन सिम किंवा मोबाईल क्रमांक पोर्ट करण्यासाठी बोलवत होते.
यावेळी ग्राहकांकडून घेतलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून त्यांच्या नावावर अतिरिक्त सिम कार्ड सक्रिय केले जात होते. अनेकदा कमी शिक्षित किंवा डिजिटल प्रक्रियेबाबत कमी माहिती असलेल्या नागरिकांना याची कल्पनाही नसत.
मलेशियन नागरिकांमार्फत कंबोडियात पाठवली जात होती सिम कार्ड
तपासात आणखी एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे. भारतात सक्रिय करण्यात आलेली ही सिम कार्ड थेट कंबोडियात पाठवली जात नव्हती. त्यासाठी मलेशियातील काही नागरिकांची मदत घेतली जात होती.
भारतातून सिम कार्ड बाहेर पाठवून ती कंबोडियातील सायबर गुन्हेगारी केंद्रांपर्यंत पोहोचवली जात होती. तेथून भारतीय नागरिकांना लक्ष्य करून फसवणुकीचे कॉल, संदेश आणि ऑनलाइन जाळे रचले जात होते.
सायबर फसवणुकीचे मोठे आंतरराष्ट्रीय जाळे
तपास यंत्रणांच्या मते, हे केवळ काही सिम कार्डांचे प्रकरण नसून भारत, मलेशिया आणि कंबोडिया यांना जोडणारे एक मोठे आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी नेटवर्क आहे. या नेटवर्कमधील आर्थिक व्यवहार, संबंधित एजंट आणि परदेशी कनेक्शन यांचा आता सखोल तपास सुरू आहे.
सायबर गुन्हे रोखण्यासाठी सिम कार्ड पडताळणी प्रक्रिया अधिक कठोर करण्यासह दूरसंचार कंपन्यांच्या भूमिकेचाही तपास केला जात आहे. या प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता ईडीच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App