विशेष प्रतिनिधी
मुंबई : “जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेल्या भारताची प्रगती आता कोणीही थांबवू शकत नाही. काही परकीय शक्ती भारताची घोडदौड रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वरळी येथे आयोजित भव्य तिरंगा रॅलीत व्यक्त केला.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत वरळी येथे सोमवारी, १० ऑगस्ट रोजी तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. वरळी प्रोमेनेड आणि कोस्टल रोड परिसरात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. भाजपने १० ते १५ ऑगस्टदरम्यान राज्यभर विविध तिरंगा यात्रा आणि देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
रॅलीला संबोधित करताना फडणवीस म्हणाले, “तिरंगा यात्रेच्या निमित्ताने आज या ठिकाणी जनसागर पाहायला मिळत आहे. या तिरंग्यासाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले, सैनिकांनी सीमेवर प्राणांची आहुती दिली आणि कोट्यवधी भारतवासीयांनी संघर्ष केला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री फडकलेला हा तिरंगा चंद्र आणि सूर्य असेपर्यंत डौलाने फडकत राहील.”
‘२०४७ मध्ये विकसित भारत’
भारताच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील त्या २०४७ पर्यंत देश जगातील विकसित राष्ट्रांमध्ये अग्रस्थानी असेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. भारताची युवा शक्ती, वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांमधील प्रगती यामुळे विकसित भारताचे ध्येय साध्य होईल, असे त्यांनी सांगितले. “तिरंग्याचा सन्मान आमच्या मनात आहे. संविधान आमच्या मनात आहे. भारताचा स्वाभिमान असलेल्या तिरंग्याच्या सन्मानासाठी क्रांती दिनापासून तिरंगा यात्रेचा जागर सुरू करण्यात आला आहे,” असे फडणवीस म्हणाले.
१९४२ च्या भारत छोडो आंदोलनाचा संदर्भ देत फडणवीसांनी सध्याच्या विकसित भारताच्या संकल्पनेशी त्याची सांगड घातली. “१९४२ ची क्रांती ‘भारत छोडो’ची होती. आता विकसित भारत घडविण्यासाठी ‘करो या मरो’ची क्रांती आहे. भारतविरोधी शक्तींना ‘भारत छोडो’ सांगण्याची ही क्रांती आहे,” असे फडणवीस म्हणाले. देशाची प्रगती रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींना एकजुटीने उत्तर देण्याचे आवाहन त्यांनी केले. देशाच्या प्रगतीत तरुणांची भूमिका निर्णायक असून युवकांनी विकसित भारताच्या संकल्पनेशी जोडले जावे, असेही त्यांनी सांगितले. भाजपच्या यंदाच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत युवक आणि विशेषतः नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यावर भर देण्यात आला आहे.
“या क्रांतीच्या माध्यमातून आपल्याला उद्याचा स्वाभिमानी भारत घडवायचा आहे. या स्वाभिमानी भारतात जसा तिरंगा सर्वांत वर राहील, तसाच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रही देशात आघाडीवर राहील,” असे फडणवीस म्हणाले.
तिरंगा यात्रा ही केवळ राजकीय किंवा औपचारिक रॅली नसून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांच्या स्मरणासोबत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी चळवळ असल्याचे फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया संदेशातही म्हटले आहे.
स्वातंत्र्यदिनापूर्वी भाजपने मुंबईसह महाराष्ट्रातील विविध शहरांत तिरंगा यात्रांचे आयोजन केले असून, मुंबईतील वरळीच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीस मंगळवारी, ११ ऑगस्ट रोजी पुण्यातील तिरंगा यात्रेतही सहभागी होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App