विशेष प्रतिनिधी
मुंबई : BJP Navnath Ban पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथला जाऊन आत्मचिंतन करावे, असा सल्ला दिल्यानंतर बन यांनी त्याला तीव्र प्रत्युत्तर दिले. पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ आता पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळापेक्षाही अधिक झाला आहे. देशाच्या विकासासाठी त्यांनी गेल्या 12 वर्षांत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यामुळे मोदींनी आत्मचिंतन करण्याची गरज नसून विरोधकांनीच आपल्या राजकारणाचा विचार करावा.BJP Navnath Ban
‘संजय राऊतांनी केदारनाथ नव्हे, औरंगजेबाच्या कबरीवर जावे’
संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना बन यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली. “पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सहकारी केदारनाथचा आदर करतात. तेथे जाऊन आत्मचिंतनही करतात. पण संजय राऊतांना केदारनाथ आवडणार नाही. त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन आत्मचिंतन करावे. कारण गेल्या काही वर्षांत विरोधकांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावर जी भूमिका घेतली, त्यातून त्यांची मानसिकता दिसून येते,” असा आरोप त्यांनी केला.BJP Navnath Ban
‘मोदींनी 12 वर्षांत अशक्य वाटणारे निर्णय घेतले’
मोदी सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करताना बन म्हणाले की, कलम 370 हटवणे, तिहेरी तलाकविरोधी कायदा करणे आणि अयोध्येत राम मंदिर उभारणे हे निर्णय देशाच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे ठरले आहेत. “हजारो वर्षांपासून अनेक हिंदू नागरिक ज्या राम मंदिराचे स्वप्न पाहत होते, ते पूर्ण करण्याचे काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाले,” असे ते म्हणाले.
‘रोज पत्रकार परिषद घेऊन संजय राऊतांनी काय साध्य केले?’
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदांवरही बन यांनी टीका केली. “राऊत गेली अनेक वर्षे दररोज पत्रकार परिषद घेत आहेत. पण त्यांनी महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठी नेमके काय केले, हे जनतेला सांगावे. फक्त आरोप करणे आणि वायफळ वक्तव्ये करणे, यापलीकडे त्यांची भूमिका दिसत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
‘मोदींनी स्वतःसाठी नव्हे, देशासाठी आयुष्य दिले’
नवनाथ बन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक जीवनाचाही उल्लेख केला. “मोदींनी आपल्या कुटुंबासाठी संपत्ती जमवली नाही. त्यांनी गेली 25 वर्षे सार्वजनिक जीवनात देशसेवेलाच प्राधान्य दिले. स्वतःसाठी घर, संपत्ती किंवा राजकीय वारसा निर्माण करण्यापेक्षा त्यांनी देशाच्या विकासावर भर दिला,” असे ते म्हणाले.
‘संजय राऊतांना पाकिस्तानचा पुरस्कार द्यावा’
पत्रकार परिषदेत बन यांनी आणखी एक वादग्रस्त टिप्पणी केली. “पंतप्रधान मोदी देशाची प्रतिष्ठा जगभर उंचावण्यासाठी काम करत आहेत. मात्र संजय राऊत सातत्याने भारतविरोधी भूमिका घेणाऱ्यांचे समर्थन करतात. त्यामुळे त्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार द्यावा,” अशी टीका त्यांनी केली.
ठाकरे गटावरही निशाणा
उद्धव ठाकरे आणि शिवसेनेतील फुटीच्या मुद्द्यावर बोलताना बन म्हणाले की, “पक्ष फुटण्यासाठी भाजप जबाबदार नाही. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच पक्षात असंतोष निर्माण झाला. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम केले.”
ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवरही टीका
पश्चिम बंगालच्या राजकारणावर बोलताना बन यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही आरोप केले. “सत्ता असताना तृणमूल काँग्रेसने दबावाचे राजकारण केले. मात्र परिस्थिती बदलल्यानंतर अनेक लोकांनी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवले,” असे ते म्हणाले.
ऑपरेशन ब्लू स्टार वादावर स्पष्टीकरण
गिरीश महाजन यांच्या कथित वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावरही नवनाथ बन यांनी भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, महाजन यांचे वक्तव्य ऑपरेशन ब्लू स्टारबाबत नव्हते. “1984 च्या शीखविरोधी दंगलीत हजारो निरपराध शीख नागरिक मारले गेले. त्या घटनांचा निषेध करण्याच्या संदर्भात ते वक्तव्य होते. त्याचा विपर्यास केला जात आहे,” असा दावा त्यांनी केला.
‘आरोप करण्याऐवजी आंदोलन करा’
भाजपविरोधात घोटाळ्यांचे आरोप करणाऱ्या विरोधकांवर टीका करताना बन म्हणाले की, “जर संजय राऊतांना कोणत्याही घोटाळ्याचे पुरावे असतील, तर त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे. प्रत्येक विषयावर भाजप किंवा किरीट सोमय्या यांनीच लढाई लढावी, अशी अपेक्षा का ठेवली जाते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजप देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करत आहे. दुसरीकडे विरोधक मोदी सरकारच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. अशा परिस्थितीत भाजप आणि ठाकरे गटातील शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App