विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीचे कौतुक करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली.Eknath Shinde
“मोदींनी भारताला चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवले”
एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीही सुट्टी न घेता देशासाठी काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक स्तरावर मोठी झेप घेतली असून देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत झाली आहे.Eknath Shinde
“2014 पूर्वी देशात विविध घोटाळ्यांच्या चर्चा होत होत्या. मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही ठपका ठेवता आलेला नाही. अनेक देश आर्थिक अडचणीत असताना भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. देशाला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचे काम मोदींनी केले,” असे शिंदे म्हणाले.
राहुल गांधींना थेट आव्हान
राहुल गांधी यांनी अलीकडेच देशातील परिस्थितीबाबत टीका करत नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले की, राहुल गांधी देशात असले तरी सरकारवर आरोप करतात आणि परदेशात गेले तरी भारताबाबत नकारात्मक भूमिका मांडतात.
“राहुल गांधी सातत्याने देशाच्या विरोधात बोलत असतात. ऑपरेशन सिंदूरमध्ये शौर्य गाजवणाऱ्या सैनिकांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी दावा केला की नरेंद्र मोदी एक वर्षानंतर पंतप्रधान राहणार नाहीत. पण माझा विश्वास आहे की मोदी पुढील अनेक वर्षे देशाचे नेतृत्व करतील. राहुल गांधींनी आधी एक वर्ष तरी सातत्याने देशात राहून दाखवावे,” असे आव्हान शिंदे यांनी दिले.
इंडिया आघाडीवरून उद्धव ठाकरेंना टोला
दिल्लीत नुकत्याच झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली होती. या मुद्द्यावरूनही शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली.
“राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे नरेंद्र मोदींसारखा स्पष्ट आणि स्वीकारार्ह चेहरा आहे. पण इंडिया आघाडीकडे कोणता चेहरा आहे? त्यांच्यातच इतके मतभेद आहेत की नेतृत्वावर एकमत होत नाही. इंडिया आघाडीत गेलेले अनेक पक्ष पराभूत झाले आहेत आणि काही पक्ष तर बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत,” असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांचा नाव न घेता उल्लेख करत शिंदे म्हणाले, “आता कुणीतरी ऑनलाइन येतं, फेसबुक लाईव्ह करतं आणि मोठमोठ्या घोषणा करतं. पण जनतेसमोर विश्वासार्ह नेतृत्व उभं करण्यात त्यांना यश आलेलं नाही.”
“मुख्यमंत्रीपदाचा प्रश्नच नाही, आम्ही टीम म्हणून काम करतो”
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
“आता मुख्यमंत्रीपदाचा विषयच नाही. सध्या कोणतीही जागा रिक्त नाही. मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सर्वजण एक टीम म्हणून काम करत होतो. आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत टीम म्हणून काम करत आहोत. आमच्यातील समन्वय आणि बंध कायम आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“आमचा अजेंडा खुर्ची नव्हे, जनसेवा”
महायुतीतील संबंधांबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, आमचा उद्देश सत्तेची खुर्ची मिळवणे नाही, तर महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणे हा आहे.
“कार्यकर्ते भावनेतून काही वक्तव्ये करतात. मात्र आमचा अजेंडा मुख्यमंत्रीपद किंवा सत्तेची स्पर्धा नाही. जनतेचे प्रश्न सोडवणे आणि राज्याचा विकास करणे हेच आमचे ध्येय आहे. आमच्या आमदार-खासदारांना कुठेही अडचण आली तर आम्ही आणि मुख्यमंत्री एकत्र बसून त्यावर मार्ग काढू,” असे शिंदे यांनी सांगितले.
महायुतीत एकजूट असल्याचा दावा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मतभेद असल्याच्या चर्चांना उत्तर देताना शिंदे यांनी महायुतीतील तीनही पक्षांमध्ये चांगला समन्वय असल्याचा दावा केला. आगामी निवडणुकांमध्ये महायुती एकत्रितपणे मैदानात उतरणार असून राज्यातील जनतेचा पाठिंबा पुन्हा मिळवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App