नाशिक : अजित पवारांचा घातपात ते बारामती पवार विरुद्ध पवार; रोहित पवारांचा एक राजकीय प्रवास!!, असेच वर्णन करणारी राजकीय घडामोड आज बारामतीतून समोर आली.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत आज मतदान सुरू असताना पवार कुटुंबीयांनी सुनेत्रा पवार यांना विक्रमी मतांनी निवडून आणायचा दावा केला, पण त्या दाव्या बरोबरच २०२९ च्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना होईल, याचीही कबुली देऊन टाकली.
– जय पवारांनी फोडली वाचा
सुनेत्रा पवारांच्या पोट निवडणुकीचे मतदान सुरू असतानाच आज सकाळी जय पवार यांनी २०२९ च्या निवडणुकीच्या विषयाला वाचा फोडली. जय पवार यांच्या वक्तव्याला रोहित पवारांनी दुजोरा दिला. त्यामुळे रोहित पवार यांच्या वक्तव्यांचा राजकीय प्रवास अजित पवारांच्या घातपातापासून सुरू होऊन तो आता बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत कोणी अपरिहार्य आहे, असे वक्तव्य करण्यापर्यंत येऊन ठेपला.
बारामतीतून २०२९ च्या निवडणुकीत मीच उमेदवार असावा, अशी कार्यकर्त्यांची आणि लोकांची भावना आहे. त्यांची तशी मागणी आहे, पण मी स्वतःच कार्यकर्ता म्हणून काम करायचे ठरविले आहे. कार्यकर्ता म्हणून मला लोकांना मदत करायची आहे, पण जनतेची भावना मीच उमेदवार असावा अशी आहे, असे वक्तव्य जय पवार यांनी केले. सुनेत्रा पवार यांच्या विक्रमी मताधिक्याची चर्चा सुरू असतानाच जय पवार यांनी पुढच्या निवडणुकीच्या रिंगणात आपली हॅट टाकून ठेवली.
– रोहित पवारांचे सुरवातीचे narrative
जय पवार यांच्या या वक्तव्याला रोहित पवारांनी दुजोरा दिला. अजित पवारांचा विमान अपघात नसून तो घातपात आहे, असा दावा करणाऱ्या अनेक पत्रकार परिषदा त्यांनी घेतल्या. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासाठी आणि त्या विलीनीकरणातून एखादी मंत्री पदाची खुर्ची खेचून घेण्यासाठी त्यांनी भरपूर राजकीय आदळआपट केली. पण त्यामध्ये त्यांना यश आले नाही. दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण तर झाले नाहीच. शिवाय अजित पवारांच्या कुटुंबीयांनी रोहित पवारांना सुद्धा सत्तेत सामील करून घेतले नाही. त्यामुळे रोहित पवारांना शेवटी वास्तवाचे भान स्वतःमध्ये आणावे लागेल. या राजकीय वास्तवातूनच रोहित पवारांनी आज बारामतीतील पुढची निवडणूक पवार विरुद्ध पवार होईल याची कबुली देऊन टाकली.
– रोहित पवारांची कबुली
दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण आता होणार नाही. कारण त्या विलीनीकरणासाठी पुढाकार घेणारे अजितदादा आज आपल्यात नाहीत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ नये यासाठी काही नेते काम करत आहेत. त्यांना दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण नको आहे. सत्तेमधून बाहेर पडायचा निर्णय घेणे खूप अवघड आहे. कारण कार्यकर्ते आणि नेत्यांचा विचार करावा लागतो. बारामतीची पुढची निवडणूक कदाचित पवार विरुद्ध पवार व्हावी अशी सुद्धा अनेक नेत्यांची इच्छा आहे. त्यामुळे पवार कुटुंबीय एक असले तरी आता दोन पक्ष वेगळे आहेत. राजकीय दृष्ट्या काही त्याग करावा लागतो. काही कठोर निर्णय घ्यावे लागतात, असे वक्तव्य रोहित पवारांनी केले.
– पवार कुटुंबीयांचा प्रभाव ओसरला
रोहित पवारांच्या या वक्तव्यातून ते राजकीय दृष्ट्या बरेच भानावर आल्याचे राजकीय वास्तव समोर आले. दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण करायचा विषय आता फक्त पवार कुटुंबीयांचा उरला नाही. दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण करून सत्तेत शिरकाव करणे, हा फक्त पवार कुटुंबीयांचा घास उरलेला नाही. पवार कुटुंबीयांनी कितीही राजकीय आदळआपट केली, तरी त्यांना हवे तसे राजकारण वळविता येणार नाही. त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या इतर नेत्यांचा आणि महत्त्वाचे म्हणजे भाजपच्या नेत्यांचा विचार घ्यावाच लागेल किंबहुना पवार सोडून इतर नेत्यांचा विचार आणि प्रभाव राष्ट्रवादीवर ठेवावा लागेल, याच राजकीय वास्तवाची कबुली रोहित पवारांच्या वक्तव्यातून अप्रत्यक्षपणे समोर आली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App