विशेष प्रतिनिधी
मुंबई : Maharashtra Weather Alert सध्या राज्यात पश्चिम विक्षोभाची (वादळ) स्थिती आहे. त्यातच अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. परिणामी, राज्यात उन्हाळ्यातच पावसाळी वातावरण तयार झाले आहे. हवामान खात्याने आज मंगळवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यात मेघगर्जनेसह ताशी 30-40 किमी वेगाने सोसाट्याचा वारा, गारपीट व हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.Maharashtra Weather Alert
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) जाहीर केलेल्या 5 दिवसांच्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत 20 ते 24 एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट व पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.Maharashtra Weather Alert
नागरिकांसाठी सूचना
विजेचा कडकडाट ऐकू आला किंवा विज चमकताना दिसताच तात्काळ घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली, मोकळ्या शेतात, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभे राहणे टाळावे. मोकळ्या जागेत मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करू नये. निवाऱ्यापासून दूर असल्यास जमिनीवर आडवे न पडता पाय एकत्र करून खाली बसून राहावे.
प्रशासनासाठी उपाययोजना
ग्रामपंचायत, पोलिस व आरोग्य विभागांनी तातडीने जनजागृती करावी. रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके सज्ज ठेवावीत. शाळा, सभागृह व सार्वजनिक इमारती सुरक्षित निवाऱ्यासाठी खुल्या ठेवाव्यात. हवामान खात्याचे अद्ययावत इशारे गावपातळीपर्यंत त्वरित पोहोचवावेत.
शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना
शेतकरी बांधवांनी विजांच्या इशाऱ्याच्या कालावधीत शेतातील कामे टाळावीत. बांधकाम स्थळांवरील कामकाज तात्पुरते थांबवावे. तसेच यात्रा, धार्मिक कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणावरील गर्दीचे आयोजन तातडीने स्थगित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
आज राज्यातील बहुतांश भागांना यलो अलर्ट
आज कोकण पट्ट्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गसह सातारा व सातारा घाट विभाग, पुणे आणि पुणे घाट विभाग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, सांगली, सोलापूर, नाशिक व नाशिक घाट विभाग, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर आदी भागांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने या सर्व भागाला मंगळवारी यलो अलर्ट दिला आहे. राज्यातील काही भागांत पुढील 2 दिवसांत तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घसरण होईल. यामुळे नागरिकांना उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App