टोमण्यांचे हिंदुत्व शेंडी जानव्यापलिकडे गेले; ब्रिगेडच्या कुशीत जाऊन हिजाब मध्ये शिरले, पण नेमाडेंवर मूग गिळून गप्प बसले!!, असे घडले आहे. Uddhav thackeray targets BJP with hijab hindutva concept, but keeps silent on bhalchandra nemade’s false claim on shivaji maharaj and gyanwapi
शिवसेना उबाठा आणि संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल हिंदुत्वाची नवी व्याख्या करत त्याला “हिजाब” जोडला. आतापर्यंत शिवसेनेचे हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे नाही, असे ते वारंवार भाजपला हिणवत होते. पण राष्ट्रवादी काँग्रेस साथ सोडणार या भीतीने संभाजी ब्रिगेड बरोबर खुर्ची शेअर करताना त्यांनी भाजपच्या हिंदुत्वात “हिजाब” शोधला आणि आमचे खरे हिंदुत्व आहे, आम्ही हिंदुत्वाचा “हिजाब” पांघरलेला नाही. आमचा चेहरा खरा हिंदुत्वाचा आहे. तुमचे हिंदुत्व हिजाब मध्ये शिरलेले आहे, असा भाजपच्या नेत्यांना टोमणा हाणला.
इतकेच काय पण उद्धव ठाकरे यांनी पुढचे टोमणे हाणत विकासाची स्वनिर्मित नवी व्याख्याही करून टाकली. विकास इंग्रजांनी पण केला पण तरीदेखील आम्ही इंग्रजांना “चले जाव” म्हणालो, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी स्वतःची तुलना महात्मा गांधींची करून टाकली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेतून “चले जाव” म्हणाले.
पण या टोमण्यात नरेंद्र मोदींनीच विकास केला, याची कबुली आपणच दिल्याचे ते विसरून गेले.
मुंबईत गेटवे ऑफ इंडिया व्हिक्टोरिया टर्मिनस मुंबई महापालिकेची बिल्डिंग इंग्रजांनी बांधली. आपण बांधली नाही. नेहरूंची सगळी वर्षे विसरून जा. पण वाजपेयी नंतर तुम्ही काय केले??, मुंबईत काय बांधले??, ते सांगा असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला मारला. त्याचवेळी मुंबईत सुरू असलेल्या विविध विकास कामांकडे उद्धव ठाकरेंनी सोयीस्कर दुर्लक्ष केले, पण या भाषणात त्यांचे हिंदुत्व शेंडी जानव्यापलीकडे जाऊन “हिजाब” मध्ये शिरले हेच त्यांच्या टोमणे भाषणाचे वैशिष्ट्य ठरले!!
– राजकीय औरंगजेब
या वेळेला उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख “राजकीय औरंगजेब” आणि “राजकीय अफजलखान” असा केला. संभाजी भिडे गुरुजींवर त्यांनी टीका केली. त्यावेळी उपस्थित असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला, पण याच उद्धव ठाकरेंनी कालच्या भालचंद्र नेमाडे यांच्या भाषणाकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा मुख्य सरदार मुसलमान होता आणि औरंगजेबाचा मुख्य सरदार हिंदू होता, अशी लोणकढी थाप नेमाडेंनी काल शरद पवारांसमोर मुंबई मराठी संग्रहालयात मारली. तशा त्यांनी अनेक थापा मारल्या. पण शरद पवारांनी परवा आणि उद्धव ठाकरे यांनी काल नेमाडेंच्या भाषणावर चकार शब्द उच्चारला नाही.
संभाजी भिडेंनी महात्मा गांधींवर शरसंधान साधताना निदान कोणा घोष नावाच्या एका लेखकाच्या पुस्तकाचे वाचन करायला त्यांच्या धारकऱ्याला सांगितले. पण नेमाडेंनी विद्यार्थ्यांना वाचनाचा उपदेश करून स्वतः मात्र छत्रपतींच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख सरदार मुसलमान होता, हे नेमके कुठल्या पुस्तकात वाचले??, हे सांगितले नाही.
इतकेच काय पण भालचंद्र नेमाडेंनी ज्ञानवापीचा स्वनिर्मित इतिहास सांगताना काशीतल्या पंड्यांनी औरंगजेबाच्या दोन राण्या भ्रष्ट केल्या म्हणून औरंगजेबाने ज्ञानवापीची तोडफोड केली, असा अजब दावा केला. पण तो देखील त्यांनी कुठल्या पुस्तकात वाचला होता, हे सांगितले नाही.
– नेमाडेंवर अवाक्षरही उच्चारले नाही
त्या पलीकडे जाऊन भालचंद्र नेमाडेंनी दुसऱ्या बाजीरावाचा इतिहास सांगताना इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांची, ते आपल्यावर रागावल्याची आठवण सांगितली. दुसऱ्या बाजीरावाच्या वर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात पुस्तक वाचताना आपल्याला “सत्य” समजले. त्याविषयी वा. सी. बेंद्रे यांना सांगितल्यावर ते रागावले आणि तुम्ही तरुण लोक असा उलटा विचार कसा करता??, असे ते म्हणाल्याचा दावा नेमाडेंनी केला. पण आपण दिवंगत व्यक्तीचा हवाला देताना औचित्यभंग करून त्या व्यक्तीवर अन्याय करतो आहोत, हे सत्य मात्र ते सोयीस्करित्या विसरले.
ज्ञानवापी ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर प्रच्छन्न बोलणाऱ्या नेमाडेंवर उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात चकार शब्दही काढला नाही. शेंडी जानव्यापलिकडे जाऊन ब्रिगेडच्या कुशीत शिरलेले त्यांचे हिंदुत्व नेमाडेंवर मात्र मूग गिळून गप्प बसले!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App