विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक वेगवान घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे बडे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठे भाकीत वर्तवलं आहे. More earthquakes in Maharashtra in next 15 days
महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.
या दाव्याच्या संबंध शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या घडामोडींशी जोडला जात आहे. शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे अनेक आमदार पक्षात नाराज असून ते अजितदादांच्या गोटात येण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. त्याच बरोबर शिवसेनेतील आमदार अपात्रतेच्या विषयाचाही संबंध जोडला जात आहे.
गिरीश महाजन यांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत असताना याबाबत भाष्य केले. “बघा, लोकसभा निवडणुकीच्या आधीच मोठा राजकीय भूकंप होईल. आपल्याला कळेल कुठल्या पक्षात काय-काय घडतंय ते. पण निश्चित निवडणुकीच्या तोंडावर पुढच्या 15 ते 20 दिवसांत मोठे भूकंप झालेले बघायला मिळतील”, असे गिरीश महाजन म्हणाले.
गिरीश महाजन यांचं वक्तव्य महत्त्वाचं का?
गिरीश महाजन हे भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. भाजपचे संकटमोचक नेते अशीदेखील त्यांची ख्याती आहे. याशिवाय ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे आणि विश्वासू नेते मानले जातात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला महत्त्व आहे. राज्यात आगामी काळात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडणार आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर येत्या 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल जाहीर करणार आहेत. हा निकाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा झटका बसणार आहे. तसा निकाल लागला तर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे 16 आमदार अपात्र ठरतील. तसेच हे शिंदे सरकारही कोसळू शकते. पण निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर सध्याचं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. आमदार अपात्रतेच्या प्रकरणाआधी गिरीश महाजन यांनी हे वक्तव्य केल्याने त्यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
विशेष म्हणजे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वातील एक मोठा गट काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपात येईल, अशा चर्चा सातत्याने होत असतात. पण अशोक चव्हाण यांनी या चर्चांचे सातत्याने खंडन केले आहे. असे असताना आता गिरीश महाजन यांनी येत्या 15 ते 20 दिवसांत महाराष्ट्रात तिसरा राजकीय भूकंप घडेल, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App