नाशिक : देवेंद्र फडणवीस सरकारला Problem of plenty ने ग्रासले आहे. महायुतीला मोठे बहुमत मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने सरकार चालायला हवे होते, तसे ते चालत नसल्याचा नॅरेटिव्ह मराठी माध्यमांनी चालवला आहेच, पण महाराष्ट्राच्या ज्या मतदारांनी भाजपच्या बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है नॅरेटिव्हनुसार पुढाकार घेऊन मतदान केले, त्या मतदारांच्या मनातही आता शंकांची पाली चुकचुकायला लागल्या आहेत. कारण सरकार वेगाने चालत असल्याच्या बातम्या येण्यापेक्षा त्यातल्या अडथळ्यांच्या बातम्या जास्त येत आहेत आणि त्यात तथ्य देखील असल्याचे मान्य करावे लागत आहे. Fadnavis
भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्ण क्षमतेने प्रशासकीय कामकाज करत आहेत, पण मोठ्या बहुमताचे सरकार पूर्ण क्षमतेने चालताना दिसत नाही. महाराष्ट्राचे प्रशासन आणि राजकारण यावर भाजपची पूर्णपणे पकड बसविण्याचा जनतेने कौल दिला असताना तो फडणवीस बसवताना दिसत नाहीत. कारण राजकीय दृष्ट्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना लगाम घालायला त्यांना अडचणी येत आहेत.
पालकमंत्री पदांच्या वाटपात मुंबई + ठाणे येऊनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या आल्या. ते नेहमीप्रमाणे दरे गावाच्या कोपगृहात निघून गेले. आता त्यांच्या नाकदुऱ्या काढायला चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन हे मंत्री दरे गावाला जाणार असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत.
पण त्यापेक्षाही गंभीर बातमी म्हणजे दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांच्या घोषणा अंमलबजावणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थगिती द्यावी लागली आहे. कारण भरत गोगावले आणि दादा भुसे नाराज आहेत. मुंबई + ठाणे पालकमंत्री पदांच्या बक्षीसीनंतरही एकनाथ शिंदेंचे समाधान झालेले नाही. त्याउलट मुख्यमंत्री फडणवीस अजितदादांच्या राष्ट्रवादीवर अधिक मेहेरबान झाल्याने खुद्द अजितदादांना पुणे आणि बीडचे पालकमंत्री पद आदिती तटकरे यांना रायगड पालकमंत्री पद बहाल झाले आहेत. अजितदादा प्रॅक्टिकल म्हणून फडणवीस त्यांच्याबरोबर जास्त कम्फर्टेबल आहेत पण याचा अर्थ असा नव्हे की सतत एकनाथ शिंदेंना दुखावत ठेवून ते राज्याचा कारभार नीट हाकू शकतील.
वास्तविक पुण्याचे पालकमंत्री पद भाजपला स्वतःकडे ठेवता आले असते आणि अजित पवार दबावही आणू शकले नसते, पण फडणवीस यांनी तसे न करता अजितदादांच्या सतत पुणे जिल्हा सोपविला, जो आधीच त्यांच्याकडे होता. भाजपने तो अजितदादांच्या कब्जातून सोडवून घ्यायला हवा होता. ते देवेंद्र फडणवीस यांनी केले नाही. त्या उलट त्यांनी एकनाथ शिंदे यांना दुखावून ठेवले.
– भाजपच्या मंत्र्याचा राजीनामा घेतला असता
त्याही पलीकडे जाऊन मस्साजोग संतोष देशमुख प्रकरणाची हाताळणी अजितदादांना अतिशय “फेव्हरेबल” राहिली, पण त्यामुळे फडणवीस सरकारची प्रतिमा हानी झाली. अजितदादा सुरुवातीपासून नामानिराळे राहात होते. उत्तरे फडणवीसांना द्यावी लागत होती. आता बीड प्रकरणातली हाताळणी पालकमंत्री म्हणून अजितदादा करणार आहेत. धनंजय मुंडेंचे मंत्रीपद ते केवळ राष्ट्रवादीचे म्हणून वाचवायचा प्रयत्न सुरू आहे पण हेच प्रकरण कुठल्या एका भाजपच्या मंत्र्याच्या बाबतीत झाले असते, तर भाजपने त्यांचा राजीनामा घेतला असता. पक्षाची प्रतिमा हानी होत आहे ती टाळण्यासाठी राजीनाम्याचे पाऊल आवश्यक होते असे समर्थन केले गेले असते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App