विशेष प्रतिनिधी
मुंबई : गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर त्याचा परिणाम होत आहे. किरकोळ बाजारात साखरेचा दर ७० ते ७५ रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांना महागाईचा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवून दर नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने यंदाचा ऊस गाळप हंगाम लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरपासून साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होणार आहे. sugar prices
या संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि आमदार उपस्थित होते.
दिवाळीपूर्वी साखरेचा पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न
दिवाळीच्या काळात साखरेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे बाजारात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध राहावा आणि संभाव्य तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी गाळप हंगाम लवकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र हे देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्य आहे. केंद्र सरकारकडूनही यंदा ऊस गाळप हंगाम नेहमीपेक्षा सुमारे महिनाभर आधी सुरू करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मागील हंगामात विविध कारणांमुळे साखरेच्या उत्पादनात घट झाली होती. परिणामी ऑगस्ट महिन्यात साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
कारखानदार आणि शेतकऱ्यांचा निर्णयाला विरोध
दरवर्षी राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम साधारणपणे नोव्हेंबरमध्ये सुरू होतो. मात्र, यंदा दिवाळीच्या काळात साखरेचा तुटवडा निर्माण होऊ नये आणि बाजारातील दर नियंत्रणात राहावेत, यासाठी १५ ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
मात्र, सरकारच्या या निर्णयाला काही साखर कारखानदार आणि शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. नोव्हेंबरपूर्वी गाळप सुरू केल्यास उसातील साखरेचा उतारा म्हणजेच रिकव्हरी कमी मिळण्याची शक्यता असून, त्याचा आर्थिक फटका शेतकरी आणि साखर कारखान्यांना बसू शकतो, अशी त्यांची भूमिका आहे.
एकीकडे शेतकरी आणि कारखानदारांच्या आर्थिक हिताचा प्रश्न, तर दुसरीकडे सणासुदीच्या काळात ग्राहकांना साखरेच्या वाढत्या दरापासून दिलासा देण्याचे आव्हान, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबरपासून सुरू होणारा गाळप हंगाम साखरेच्या बाजारभावावर कितपत परिणाम करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App