विशेष प्रतिनिधी
पुणे : चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची दुरवस्था, प्रचंड वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांच्या मुद्द्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी शनिवारी प्रत्यक्ष परिसराची पाहणी करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. Aaditya Thackeray
दौऱ्यादरम्यान स्थानिक नागरिकांनी खराब रस्ते, खड्डे, वाहतूक कोंडी आणि अन्य समस्यांचा पाढा त्यांच्यासमोर वाचला.“सामान्य माणसाने आणखी किती त्रास सहन करायचा? रस्त्यांवर खड्डे आहेत, त्याला जबाबदार कोणाला धरणार?” असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.
चाकणसारख्या राज्यातील महत्त्वाच्या औद्योगिक पट्ट्यातील परिस्थितीमुळे उद्योजकांनाही व्यवसाय करणे कठीण झाल्याचा आरोप त्यांनी केला.चाकणमधील रस्त्यांची पाहणी करताना आदित्य ठाकरे यांनी आपला ताफा थांबवून पीएमपीएमएल बसचालकाशी थेट संवाद साधला. बसचालकाने रस्त्यांवरील खड्डे आणि सततच्या वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या अडचणी ठाकरे यांच्यासमोर मांडल्या आणि या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली.
नागरिकांनीही अनेक ठिकाणी रस्त्यांची झालेली दुरवस्था, वाहतुकीसाठी लागणारा अतिरिक्त वेळ आणि अपुऱ्या नागरी सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली.
‘एमआयडीसीत उद्योगांचा नव्हे, कचऱ्याचा वास’
चाकणच्या परिस्थितीवर टीका करताना ठाकरे म्हणाले की, एमआयडीसीमध्ये उद्योगांचा वास यायला हवा, मात्र आता कचऱ्याचा वास येत आहे. रस्ते, वाहतूक कोंडी, कचरा आणि वीजपुरवठ्याशी संबंधित प्रश्न गंभीर बनल्याचा आरोप त्यांनी केला.
चाकण एमआयडीसीतील सुमारे २० लघुउद्योग स्थलांतराचा विचार करत असल्याच्या वृत्तामुळे हा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. काही उद्योगांनी वाहतूक कोंडी, रस्ते, वीज, पाणी आणि प्रदूषणाच्या समस्यांकडे बोट दाखवले आहे.
‘रविवारी नको, कामाच्या दिवशी चाकणमध्ये या’
उद्योगमंत्री उदय सामंत रविवारी चाकणमधील औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत जिल्हाधिकारी आणि अन्य संबंधित यंत्रणांनाही सहभागी करून उद्योगांच्या अडचणींवर चर्चा करण्याची तयारी सामंत यांनी दर्शवली आहे.
मात्र आदित्य ठाकरे यांनी सामंत यांच्या रविवारच्या दौऱ्यावर निशाणा साधला.
“रविवारी परिस्थिती पाहून वास्तव समजणार नाही. उद्योगमंत्र्यांनी कामाच्या दिवशी, कोणताही मोठा ताफा न घेता या रस्त्यांवरून प्रवास करावा. मग त्यांना नागरिक आणि उद्योजकांना काय सहन करावे लागते ते समजेल,” असे आवाहन त्यांनी केले.
सरकारकडून हालचालींना वेग
चाकणमधील समस्यांवरून राजकीय दबाव वाढल्यानंतर राज्य सरकार आणि प्रशासनानेही हालचाली सुरू केल्या आहेत.\उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रस्ते, वाहतूक आणि इतर पायाभूत सुविधांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले असून, एमआयडीसी, पीएमआरडीए, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना आवश्यक उपाययोजनांच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पुणे जिल्हा प्रशासनाने ३१ ऑगस्टपर्यंत रस्ते खड्डेमुक्त करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
चाकणमधील वाढती नाराजी, कंपन्यांच्या संभाव्य स्थलांतराची चर्चा आणि विरोधकांच्या पाहणी दौऱ्यांमुळे आता औद्योगिक पट्ट्यातील रस्ते आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न थेट राजकीय केंद्रस्थानी आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App