काकांच्या बेरजेच्या राजकारणात वजाबाकी कुणाची?? भाजप – सेनेची की पुतण्याची??

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकलूजचा दौरा करून “लंच डिप्लोमसी” करत विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे या आपल्या जुन्या समर्थकांना आपल्या बाजूने वळवून घेतले. 2004 चाच डाव ते 2024 मध्ये माढ्यामध्ये खेळले. Sharad pawar’s politics of plus will not be able to affect BJP or shivsena, but will affect ajit pawar’s NCP

खरंतर पवारांना रणजीत सिंह नाईक निंबाळकरांविरुद्ध माढ्यात “तगडा” उमेदवारच मिळत नव्हता. तो मोहिते पाटलांच्या घरात मिळाला. पवारांनी माढ्याची उमेदवारी विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटलांच्या गळ्यात घातली. त्याला पवारांचे बेरजेचे राजकारण म्हटले गेले. आता त्या पुढे जाऊन पवार होळकर घराण्यातील भूषण सिंह होळकर यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांच्या हाती तुतारी सोपवणार असल्याच्या बातम्या आहेत. या बातम्या देखील पवारांच्या बेरजेच्या राजकारणासाठी अनुकूल असल्याचा मराठी माध्यमांचा होरा आहे. पवारांचे हे बेरजेचे राजकारण भाजपच्या 45 + च्या घोषणेला तडा देऊ शकते, असा माध्यमांचा दावा आहे. प्रत्यक्षात तो दावा खरा की खोटा??, हे 4 जून 2024 रोजी सिद्ध होईल.

पण मूळात पवारांचे हे बेरजेचे राजकारण आहे की आपल्याच समर्थकांची फेर जुळवाजुळवा आहे??, हा खरा सवाल आहे आणि त्याचे उत्तर होकारार्थी आहे. कारण पवारांच्या पक्षात तरुण + महिला + शेतकरी + दलित किंवा ओबीसी हे आत्तापर्यंतच्या प्रस्थापित राजकारणाने नाकारलेले समाज घटक येत नसून फक्त प्रस्थापित मराठा किंवा भूषण सिंह होळकरांच्या रूपाने प्रस्थापित धनगर समाज घटकच पवारांच्या पक्षात आला आहे. याचा अर्थ पवारांचे बेरजेचे राजकारण हे प्रस्थापितांचीच फेर जुळवाजवळ करणारे ठरत आहे. मग अशा स्थितीत पवारांचे हे बेरजेचे राजकारण भाजप सारख्या नवमतदारांना आणि नवसमाज घटकांना टॅप करणाऱ्या पक्षाला धक्का देणारे किंवा त्याची वजाबाकी करणारे ठरेल की त्यांचाच पुतण्या अजित पवारांच्या प्रस्थापित राष्ट्रवादीला धक्का देणारे ठरेल??, हा कळीचा सवाल आहे.

वास्तविक शरद पवार आता आपली सगळी जुनी जुळवाजुळवा यासाठी करत आहेत, कारण पवारांजवळची सगळी “निवडणूकक्षम” माणसे अजित पवार आपल्या बरोबर घेऊन गेलेत. पवारांकडे “निवडणूकक्षम” म्हणजे निवडून येण्याची क्षमता असणारी माणसेच फारशी शिल्लक उरलेली नाहीत. त्यामुळे पवारांना उपलब्ध मनुष्यबळच्या साधनांमधूनच आपल्या पक्षाच्या बेरजेच्या राजकारणाची बेगमी करावी लागत आहे.

वास्तविक पवारांच्या पक्षाला मनोज जरांगेंच्या आंदोलनातून मनुष्यबळाचे इंधन मिळणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. कारण मनोज जरांगेंचे आंदोलन हे “गरजवंत” मराठ्यांचे आंदोलन होते, पण प्रत्यक्षात पवारांचे राजकारण तर “प्रस्थापित” मराठ्यांचे राजकारण आहे. त्यामुळे मनोज जरांगेंचे आंदोलन आणि पवारांचे राजकारण यातला विरोधाभास उघड्यावर आला आहे. अर्थातच मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून पवारांच्या पक्षाला बेरजेचे राजकारण करण्याइतपत मनुष्यबळाचे इंधनच अद्याप उपलब्ध झाले नाही. त्यामुळे आपल्याच कधी काळच्या समर्थकांच्या उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाच्या इंधनातूनच बेरजेचे राजकारण साधायची वेळ पवारांवर आली आहे.

मग आता पवारांची ही “खेळी”, “चाल”, “डाव” किंवा बेरजेचे राजकारण हे भाजप सारख्या प्रस्थापित नसलेल्या समाज घटकांचे राजकारण करणाऱ्या पक्षाला धक्का देणारे कसे काय ठरू शकेल?? किंवा अगदी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वेगळ्याच धाटणीच्या राजकारणाला तरी धक्का देणारे कसे ठरेल??, हा सवाल आहे आणि त्याचे उत्तर नकारार्थी आहे!!

भाजपचा सगळा व्होटर बेस नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जात विरहित करण्याचा डाव भाजपने खेळला आहे. मोदींनी 15 ते 17 % टक्क्यांची नवीच लाभार्थी समाज घटकाची मतांची बेगमी भाजपसाठी करून ठेवली आहे. तिच्यात कुठलाही एकच एक समाज नसून ती सर्व घटकांना सामावून घेणारी मतांची बेगमी आहे. याखेरीज भाजपचा मूळ भर हा ओबीसी समाजातले छोटे-मोठे घटक एकत्र करून त्यांच्या मतांच्या गुणाकाराचा आहे, जो 54 ते 62 % पर्यंतचा आहे. अशावेळी पवार आपल्या मर्यादित बेरजेच्या राजकारणातून भाजपच्या ओबीसी गुणाकाराला छेद देणारी कुठली खेळी करू शकतील, असे मानणे देखील चूक ठरेल!!

कारण पवारांचा तो “घास” नाही. आत्तापर्यंत पवारांनी प्रादेशिक किंवा उपप्रादेशिक मर्यादा ओलांडल्याचा इतिहास नाही. आता तर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस एवढी मर्यादित झाली आहे की, ती महाविकास आघाडीतला तिसऱ्या क्रमांकाचा घटक पक्ष ठरून महाराष्ट्रातल्या 48 पैकी फक्त 10 जागा वाट्याला आलेला पक्ष ठरला आहे. याचा अर्थ पवारांच्या सर्व खेळ्यांची मर्यादा सिंगल + 1 डिजिट स्वरूपात शिल्लक राहणार आहे, मग भले पवारांनी आज अकलूजच्या पत्रकार परिषदेत विजय धैर्यशील मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश हा संपूर्ण महाराष्ट्रात संदेश देईल, असा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात पवारांचा “महाराष्ट्र” म्हणजे “पश्चिम” किंवा “दक्षिण महाराष्ट्र” एवढ्यापुरताच मर्यादित राहिला आहे. त्यामुळे पवारांनी कितीही मोठ्या आकडेमोडीचे बेरजेचे राजकारण केले, तरी ते त्यांच्या फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या वजाबाकीची भरपाई करण्याचा तो प्रकार असेल. त्या पलीकडे त्यांच्या बेरजेच्या राजकारणातून बिलकुल काहीही साधले जाणार नाही, ही पवार समर्थकांना किंवा पवारनिष्ठ मराठी माध्यमांना कटू वाटली, तरी तीच वस्तुस्थिती आहे.

Sharad pawar’s politics of plus will not be able to affect BJP or shivsena, but will affect ajit pawar’s NCP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात