“बंगाल पॅटर्न”चे मनसूबे रचणे ठीक, पण महाराष्ट्रात ते शिवधनुष्य पेलण्याची ठाकरे – पवारांची राजकीय क्षमता आहे?


 

महाराष्ट्रात विशेषत: महापालिकांमध्ये भाजपची ताकद रोखण्यासाठी “बंगाल पॅटर्न” राबविण्याचे मनसुबे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रचत असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात जाहीरपणे बंगाल पॅटर्नची स्तुती करून तो महाराष्ट्रात राबविण्याची तयारी करा असे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील बंगाल पॅटर्न पण प्रमाणेच काम करून महाराष्ट्रात भाजपचा विजयरथ रोखला पाहिजे, असे अनेकदा राष्ट्रवादीच्या मेळाव्यांमध्ये सांगितले आहे. It is okay to plan for the “Bengal pattern”, but does Thackeray-Pawar have the political capacity to cultivate it in Maharashtra?

बंगाल कडून महाराष्ट्राचे नेते भाजपला रोखण्याची प्रेरणा घेत आहेत. पण नुसते बोलून प्रेरणा घेता येईल का? हा खरा प्रश्न आहे. कारण मूळात बंगाल पॅटर्न नेमका काय आहे?, हे समजून घेण्याची गरज आहे. तो महाराष्ट्रातल्या नेत्यांनी समजून घेतला आहे काय? आणि समजला असेल तर तो राबवण्याची त्यांची इच्छा आणि शक्ती दोन्ही आहेत का? हा पुढचा प्रश्न आहे.

बंगाल पॅटर्न म्हणजे नुसत्या बोलायच्या गप्पा नाहीत तर ममता बॅनर्जी यांनी ज्या पद्धतीने कष्ट उपसून गेली तीन दशके बंगालवर राज्य केले आहे ना… त्यातून “बंगाल पॅटर्न” तयार झाला आहे. ममता बॅनर्जी यांनी स्वतः एकटीच्या बळावर आधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि अन्य डाव्यांचे साम्राज्य मोडून काढले. ते मोडून काढण्यासाठी त्यांना दहा वर्षे राजकीय संघर्ष करावा लागला. आज स्वतः ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष जो हिंसाचार पश्चिम बंगालवर लादत आहे, तसाच हिंसाचार डाव्या कडून ममता बॅनर्जी यांना सहन करावा लागला आहे. याचा अर्थच असा आहे की ममता बॅनर्जी यांनी आधी डाव्या पक्षांचे वर्चस्व मोडून स्वतःचे वर्चस्व स्थापन केले आहे आणि त्यांना जेव्हा भाजपने खऱ्या अर्थाने आव्हान दिले त्यावेळी त्यांनी अधिक आक्रमक होत भाजपचे आव्हान पश्चिम बंगालमध्ये रोखुन दाखविले आहे. त्याला भारतातल्या राजकीय वर्तुळात सध्या “बंगाल पॅटर्न” असे नाव दिले आहे…!!



हा बंगाल पॅटर्न कोणत्याही राज्यात राबविणे नुसते खायचे काम नाही. त्यासाठी स्वतंत्र राजकीय प्रतिभा आणि स्वतंत्र राजकीय कर्तृत्वाचे नेते लागतात. संपूर्ण राज्यावर त्यांची पकड असावी लागते. ती पकड दाखविण्याची हिंमत ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल मध्ये दाखवून दिली आहे.
यातले मुख्य राजकीय कथानक ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यात रंगले असले तरी यामध्ये एक उपकथानक देखील आहे. ते म्हणजे ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्या तुंबळ लढाईत 2021च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष आणि डाव्या पक्षांचा सुपडा अक्षरश: साफ झाला आहे. विधानसभेत या दोन्ही पक्षांचे 0 आमदार निवडून आहेत. म्हणजे ममता बॅनर्जी यांचा बंगाल पॅटर्नची लढाई भाजप विरोधात जरूर होती, पण भाजपला त्या लढाईत इतरांच्या अपेक्षेनुसार यश मिळाले नाही असे असले तरी त्यांना मिळालेले यश हे 80 आमदारांचे आहे. ज्या बंगाल विधानसभेत 2021 पूर्वी भाजपचे फक्त तीन आमदार होते ते 2021 नंतर 78 आमदार निवडून आले आहेत. आता याला बंगाल पॅटर्ननुसार कोणाला पराभव म्हणायचे असेल तर ते त्यांचे मतस्वातंत्र्य आहे.

पण हा जर खरेच “बंगाल पॅटर्न” असेल तर असाच “बंगाल पॅटर्न” उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना महाराष्ट्रात राबवायचा आहे का? म्हणजे भाजपशी टक्कर घेता घेता त्यांना काँग्रेसचा सुपडा साफ करायचा आहे का? या प्रश्नाचे उत्तर मिळणे आवश्यक आहे. या प्रश्नाचे उत्तर ठाकरे किंवा पवार उघडपणे बोलून देणार नाहीत पण राजकीय कृतीतून मात्र ते देऊ शकतात. कारण पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक जिंकून देखील ममता बॅनर्जी या दररोज भाजपला भाषणांमधून ठोक ठोक ठोकतात पण प्रत्यक्षात मात्र त्या काँग्रेस पक्ष फोडताना दिसतात. काँग्रेसचे अनेक नेते त्यांनी बंगालसह इतर प्रांतांमध्ये देखील फोडून आपल्या तृणमूल काँग्रेसमध्ये घेतले आहेत. या पद्धतीचा “बंगाल पॅटर्न” शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात राहू इच्छित आहेत का? आणि तसा बंगाल पॅटर्न राबवण्याची त्यांची जरी इच्छा असेल तरी काँग्रेस बंगाल एवढी महाराष्ट्रात कमकुवत आहे का…?? की काँग्रेस देखील पवार आणि ठाकरे यांना तितकाच कडवा विरोध करत महाराष्ट्रात “बंगाल पॅटर्न” राबवायचे तर सोडाच पण पवार आणि ठाकरे यांनी तयार केलेला “महाराष्ट्र पॅटर्न”च मोडीत काढेल…याची काळजी ठाकरे – पवार यांना करावी लागण्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे “बंगाल पॅटर्न” हे भाषणातून बोलणे वेगळे आणि प्रत्यक्ष आपली राजकीय ताकद खऱ्या अर्थाने पणाला लावून तो पॅटर्न अमलात आणणे निराळे…!! जी ताकद पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी मिळवून दाखविली आहे, तेवढी ताकद ठाकरे आणि पवारांना कधी महाराष्ट्रात मिळवता आली आहे काय?, या प्रश्नाचे उत्तर कित्येकांना कितीही कटू वाटले तरी नकारार्थी आहे.

त्यामुळे भाजपला रोखण्याची भाषा कितीही आकर्षक असली तरी बंगाल पॅटर्न नुसार जर ती भाषा काँग्रेसच्याच मूळावर येणार असेल तर “बंगाल पॅटर्न” तर सोडाच उरलासुरला “महाराष्ट्र पॅटर्न” देखील मोडीत निघण्याची दाट शक्यता आहे…!!

It is okay to plan for the “Bengal pattern”, but does Thackeray-Pawar have the political capacity to cultivate it in Maharashtra?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात