विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय संघटनेत मोठे फेरबदल करत नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. या नियुक्त्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत. नव्या टीममध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते विनोद तावडे, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांना राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.Nitin Nabin
केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांची राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांच्यासह विविध राज्यांतील नेत्यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
वसुंधरा राजेंसह १३ नेते राष्ट्रीय उपाध्यक्ष
भाजपच्या नव्या संघटनात्मक टीममध्ये वसुंधरा राजे सिंधिया, तीरथ सिंह रावत, राम माधव, बैजयंत जय पांडा, पुरंदेश्वरी, रेखा वर्मा, वर्षाबेन नरेंद्रभाई दोशी, डॉ. भारती प्रवीण पवार, सरदार मनप्रीत सिंह बादल, लाल सिंह आर्य, प्रो. एम. नागराज, प्रो. तारिक मन्सूर आणि डॉ. मधुचंद्रा कार यांचा राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातून डॉ. भारती प्रवीण पवार यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे.
विनोद तावडे, स्मृती इराणींची राष्ट्रीय सरचिटणीसपदी वर्णी
राष्ट्रीय संघटनात्मक टीममध्ये विनोद तावडे, बिप्लब कुमार देब, स्मृती इराणी, डॉ. सतीश पूनिया, गजेंद्र पटेल, हरीश द्विवेदी आणि संजय भाटिया यांच्यासह अनेक नेत्यांना राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) म्हणून बी. एल. संतोष यांच्याकडे जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. तर शिवप्रकाश आणि सौदान सिंह यांच्यासह विनोद तावडे आणि सुनील बंसल यांना राष्ट्रीय सहसरचिटणीस (संघटन) म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
२०२७ च्या उत्तर प्रदेश निवडणुकीवर भाजपचा फोकस?
नव्या संघटनात्मक रचनेत उत्तर प्रदेशला विशेष महत्त्व देण्यात आल्याचे दिसून येत आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजपने संघटनात्मक पातळीवर मोठी तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे.
नव्या टीममध्ये उत्तर प्रदेशातील सहा पदाधिकाऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. राजस्थान आणि दिल्लीतील नेत्यांनाही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातून चार नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. उत्तराखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, केरळ आणि बिहारमधूनही नेत्यांना राष्ट्रीय संघटनेत स्थान देण्यात आले आहे.
नितीन नबीन यांनी जानेवारी २०२६ मध्ये भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय संघटनेतील हा पहिलाच मोठा फेरबदल मानला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुका आणि २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नव्या टीमकडून पक्ष संघटन मजबूत करण्याची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App