नाशिक : पार्थचे वक्तव्य पडले पवार गटाच्या पथ्यावर; विलीनीकरण फिस्कटल्यावर निघाले लाईन मारायला काँग्रेसवर!!, हीच राजकीय घडामोड काल आणि आज दिसून आली.
पार्थ पवारने काँग्रेसवर टीकास्त्र सोडल्यानंतर शरद पवार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी ज्या प्रकारची स्तुतिसुमाने काँग्रेसवर उधळली, ते पाहता पवार गटाची अवस्था “राजापेक्षाही राजनिष्ठ” झाल्याचेच उघड्यावर आले. कारण खुद्द काँग्रेसचे नेते करणार नाहीत, एवढी काँग्रेस पक्षाची स्तुती सुप्रिया सुळे यांनी केली.
काँग्रेसने बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्याविरुद्ध उमेदवार दिल्यानंतर पार्थ पवारने चिडून काँग्रेसला किंमत मोजावी लागण्याचे वक्तव्य केले. काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाल्याचे सुद्धा त्याने सांगितले. त्यावरून राजकीय वर्तुळात मोठ्या प्रतिक्रिया उमटल्या. काँग्रेसने पार्थला तोडीस तोड उत्तर दिले.
– पार्थवर शरद पवारांचा जुना राग
पण त्या पलीकडे जाऊन शरद पवारांनी पार्थ पवार वरचा आपला जुना राग पुन्हा काढून घेतला. पार्थच्या वक्तव्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही असे ते म्हणाले होतेच त्या पाठोपाठ काल त्यांनी पार्थ-परिपक्व नसल्याचे सांगितले.
सुप्रिया सुळे यांनी तर पार्थला सगळा काँग्रेसचा इतिहासच जाहीरपणे सांगितला. देशात जो मोकळा श्वास घेतोय तो काँग्रेस मुळे घेतोय अशी स्तुतिसुमने सुप्रिया सुळे यांनी उधळली. सुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ रोहित पवारांनी सुद्धा पार्थ चुकल्याचे जाहीरपणे सांगितले. कुठलाही पक्ष संपत नसतो. प्रत्येक पक्ष आपापली ताकद लावत असतो. पार्थ जे बोलला ते चुकीचेच होते, असे रोहित पवार म्हणाले.
राजकीय इंगित काय??
पार्थने काँग्रेसवर टीकास्त्र सोडल्यानंतर बाकीचे सगळे पवार कुटुंब एका सुरात बोलले. त्यांनी पार्थचे टीकास्त्र खोडून काढले. किंबहुना पार्थच्या टीकेचा वापर त्यांनी काँग्रेसवर लाईन मारण्यासाठी केला. कारण शरद पवार आणि त्यांच्या गटातल्या नेत्यांना आता स्वतःच्याच पक्षाचे वजन झेपेनासे झाले आहे. सत्तेबाहेर राहिलेल्या पवारांच्या पक्षाला सावरणे त्यांना कठीण होत चालले आहे. त्यातच अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर भाजप आणि अजित पवारांच्या जवळच्या नेत्यांनी ज्या वेगवान हालचाली करून सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केले त्यामुळे पवारांच्या हातातले विलीनीकरणाचे अस्त्र निसटून गेले.
– काँग्रेसच्या आश्रयाला जाण्याची तयारी
अशा स्थितीत पवारांना आता दुसरा राजकीय आश्रय शोधण्यावाचून पर्याय उरलेला नाही. कारण शरद पवारांच्या नंतर त्यांचा स्वतंत्र पक्ष चालविण्याची त्यांच्या गटातल्या कुठल्याच नेत्याची क्षमता उरलेली नाही. त्यामुळे पवारांना आपल्या अनुयायांना काँग्रेसच्या आश्रयाला पाठविणे भाग आहे म्हणून तर काँग्रेसची अफाट स्तुती करायची वेळ सुप्रिया सुळे यांच्यावर आली. पार्थचे काँग्रेसवरचे टीकास्त्र केवळ निमित्त ठरले. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचे अस्त्र हातातून निसटल्यानंतर काँग्रेसवर लाईन मारण्याखेरीज दुसरा पर्याय राहिला नाही, म्हणून पवार गटातल्या नेत्यांनी केवळ पार्थच्या वक्तव्याचा राजकीय वापर करून घेतला. त्यापलीकडे पवारांच्या काँग्रेस स्तुती मागे दुसरा कुठलाही राजकीय अर्थ नाही!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App