महाराष्ट्रात महाविकास आघाडी अधिकृतरित्या तुटली नाही, तरी थेट सत्ताधारी शिवसेनेतच बंड करून एकनाथ शिंदे बाहेर आले. त्यांचे बंड यशस्वी झाले ते मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांचे बंड सोशल मीडियावर सुपरहिट ठरले. पण आता हे बंड तामिळनाडूत मोठा राजकीय चमत्कार घडवण्याच्या बेतात आहे. तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी तशी राजकीय हिंट दिली आहे.Who will be “eknath shinde” in tamil nadu DMK??
तामिळनाडूमध्ये लवकरच सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम मध्ये एक “एकनाथ शिंदे” बंड करून बाहेर येतील आणि ते पक्षातल्या घराणेशाहीला आव्हान देऊन बंड यशस्वी करतील, असा दावा अण्णामलाई यांनी केला आहे.
– शिवसेना – द्रमुक साम्य
इतकेच नाही तर त्या पुढे जाऊन शिवसेना आणि द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन प्रादेशिक पक्षांमधले विलक्षण पारिवारिक राजकीय साम्य सांगितले आहे. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र बिंदूमाधव यांना सिनेमात करिअर करायचे होते. परंतु, त्यांना ते जमले नाही. दुसरे पुत्र जयदेव ठाकरे कुटुंबापासून दूर आहेत, तर तिसरे पुत्र उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली. त्यांचे चिरंजीव आदित्य यांना राजकीय महत्त्वकांक्षा आहे.
जे शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांचे स्थान आहे, तसेच द्रविड मुन्नेत्र कळघममध्ये एम. करुणानिधी यांचे स्थान आहे. त्यांचे पहिले पुत्र एम. मुथू यांना देखील सिनेमात करिअर करायचे होते. दुसरे पुत्र अळगिरी हे सध्या कुटुंबापासून दूर आहेत. त्यांच्या तिसऱ्या पुत्राला म्हणजे एम. के स्टालिन यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली आहे. त्यांचे पुत्र उदयनिधी यांना राजकारणात रस आहे. हे दोन परिवारांमधले विलक्षण राजकीय साम्य अण्णामलाई यांनी उलगडून दाखवले आहे.
– द्रमुकमधले “एकनाथ शिंदे” कोण??
त्यामुळेच राजकीय अपरिहार्यता म्हणूनच शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी बंड करून राजधर्म पाळला तसेच द्रविड मुन्नेत्र कळघम मध्ये बंड होऊन तामिळनाडूतही परिवार वाद संपेल, असा दावा अण्णामलाई यांनी केला आहे. फक्त अण्णामलाई यांनी तामिळनाडू लगेच सत्तांतराची बात केलेली नाही, तर लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत भाजपला 25 जागा मिळतील ज्या तामिळनाडू विधानसभेतल्या 150 जागांच्या बरोबरीच्या आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.
– जयललितांचा राजकीय वारसा
पण अण्णामलाई यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम मध्ये जशी बंडाची ठिणगी पडेल, असे राजकीय भाकीत वर्तवले आहे त्यापलिकडे जाऊन तामिळनाडूच्या राजकारणातला जयललिता नावाचा राजकीय वारसा सध्या बेवारस अवस्थेत दिसतो आहे. आता जयललिता यांचा वारसा सांभाळणारे अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमचे तीन घटक एकमेकांच्या राजकीय जीवावर उठलेले दिसत आहेत. भारतीय जनता पक्षाला संघटना वाढवण्यासाठी अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम रिकामी करीत असलेली “पॉलिटिकल स्पेस” फार महत्त्वाची ठरणार आहे. जयललितांचा खरा वारसा आम्ही पुढे चालवू शकतो असा दावा भाजपने नजीकच्या काळात केल्यास आश्चर्य वाटायला नको.
– भाजपची राजकीय स्पेस वाढवण्याची संधी
यातून भाजपला द्रविड मुन्नेत्र कळघम समोर मोठे राजकीय आव्हान तर उभे करता येईलच पण त्याचबरोबर जयललितांच्या तमिळ अस्मितेच्या राजकारणाला देखील फुंकर घालून आपली तामिळनाडूतील पक्ष संघटनेची राजकीय स्पेस वाढवण्याची संधी भाजपला घेता येईल. यात आव्हानापेक्षा संधी जास्त मोठी आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App