ममता – पवारांच्या महत्त्वाकांक्षा उफाळू शकतात, तर मायावती – बादलांच्या का नाही उफाळणार…??; पण त्या मूळावर येणार मोदींच्या की काँग्रेसच्या…??


मोदी विरोधी आवाजांचा खेळ perception चा आहे. सर्व विरोधक आवाज मोदींच्या दिशेने टाकत असले, तरी विरोधकांच्या राजकीय कृतीचा वार मात्र काँग्रेसवर होतोय. राज्यांमधल्या काँग्रेसच्या सत्ता उखडत आहेत. यातून काँग्रेसच्या जनाधाराला मोठ्या प्रमाणावर सुरूंग लावला जातोय. याचे परिणाम राज्यांमध्ये तर दिसणार आहेतच, पण त्याच्याही पुढचे परिणाम काँग्रेसच्या केंद्रीय राजकारणावर झाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण मोदी विरोधात आवाज काढणारे कोणतेही नेते आज काँग्रेसचे नेतृत्व मानायला तयार नाहीत, ही राजकीय वस्तुस्थिती आहे. Shiromani Akali Dal patron Parkash Singh Badal speaks to BSP chief Mayawati over a phone calla congratulates her on the SAD-BSP alliance


पश्चिम बंगालच्या एका विजयानंतर जर ममता बॅनर्जी आणि शरद पवारांच्या महत्त्वाकांक्षा उफाळून येऊ शकतात, तर मग मायावती आणि प्रकाश सिंग बादलांच्या महत्त्वाकांक्षा का नाही उफाळणार…??!! त्या देखील उफाळून यायला अजिबात हरकत नाही. तशा त्या आज उफाळल्याच आहेत.

या महत्त्वाकांक्षांमधून तर पंजाबमधल्या बऱ्याच वर्षांपूर्वी यशस्वी झालेल्या राजकीय युतीचे पुनरूज्जीवन झाले आहे. अकाली दल आणि बहुजन समाज पक्षाच्या युतीने १९९६ मध्ये लोकसभेच्या निवडणूकीत १३ पैकी ११ जागा जिंकल्या होत्या. त्या वेळी त्या युतीने काँग्रेसचा तिथे दारूण पराभव केला होता. बहुजन समाज पक्षाचे नेते आणि मायावतींचे उजवे हात सतीशचंद्र मिश्रा यांनी युतीची घोषणा करताना तीच आठवण पत्रकार परिषदेत आवर्जून काढली.

त्यानंतर त्यांनी पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या समवेत फोनवरून बोलणे करून दिले. या नव्या युतीबद्दल प्रकाशसिंग बादल यांनी मायावतींचे अभिनंदन करून त्यांना लवकरच पंजाबमध्ये बोलविण्याचे आश्वासन दिले.



यानंतर मायावतींनी केलेले ट्विट पुरेसे बोलके आहेत. त्यांनी नव्या युतीचे स्वागत केलेच आहे. त्यात काही विशेष नाही. पण त्यांनी ट्विटमधून वारंवार काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचाराचा आणि दलितांवरील, शेतकऱ्यांवरील आणि युवकांवरील अत्याचाराचा उल्लेख केला आहे. पंजाबमधल्या काँग्रेस सरकारने केलेल्या अन्यायाचा जोरदार विरोध केला आहे. यात केंद्रातल्या मोदी सरकारचा पुसटसा उल्लेख देखील नाही. आणि ज्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर अकाली दलाने भाजपशी युती तोडली त्या कृषी कायद्यांचा आणि भाजप यांचाही उल्लेख नाही. याला अधिक महत्त्व आहे.

अकाली दलाचा भाजपला कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून विरोध आहे. पण पंजाबमध्ये त्यांचा लढा काँग्रेसशी आहे आणि आता त्यांना साथ बहुजन समाज पक्षाची मिळाली आहे. असा त्याचा खरा अर्थ आहे. Political paradox इथे आहे. पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणूकांमध्ये याचे प्रत्यंतर येणार आहे.

केंद्रातल्या मोदी सरकारला विरोध करणाऱ्यांचे आवाज असेच राज्यांमध्ये एकमेकांविरोधात बुलंद होताना दिसणार आहेत. पश्चिम बंगालच्या एका निवडणूकीत ममता बॅनर्जींना यश मिळाले. त्यानंतर त्यांची महत्त्वाकांक्षा उफाळली. तिच्यात शरद पवारांच्या दीर्घकालीन महत्त्वाकांक्षेची भर पडली. त्यातून प्रशांत किशोर हे दोन्ही नेत्यांमधला पूल बनल्याचे मानले जात आहे. पण मग महत्त्वाकांक्षा उफाळण्यातून ममता आणि पवारांचेच राष्ट्रीय पातळीवर महत्त्व वाढणार असेल, तर आपण का मागे राहायचे असा विचार मायावतींनी केला असेल तर त्यात गैर मानायचे काही कारण नाही.

उत्तर प्रदेशात बसप कशी – काय – कोठे कामगिरी करेल हा भाग अलहिदा. पण पंजाबमध्ये अकाली दलाशी युती करून सत्तेचा थोडा जरी वाटा मिळणार असेल, तरी आपल्या नावाची राष्ट्रीय पातळीवर पुन्हा चर्चा होत असेल आणि perception war मध्ये आपलेही नाव पुन्हा एकदा पुढे येऊ शकणार असेल, तर तो देखील एक लाभच आहे असा विचार मायावतींनी केला असेल, तर तो देखील बरोबरच म्हणावा लागेल.

हे काहीही असले, तरी मोदी विरोधकांचा आवाज देशाच्या विविध भागांमधून बुलंद होताना दिसतोय. मग भले ते आवाज वयाने जुने असोत की वारंवार घासल्याने कर्कष झालेले असोत किंवा ते अगदी परस्पर विरोधी असोत…!!

मोदी विरोधी आवाजांचा हा खेळ perception चा आहे आणि परस्पर विरोधाचा सुध्दा आहे… पण सर्व विरोधक आवाज मोदींच्या दिशेने टाकत असले, तरी विरोधकांच्या राजकीय कृतीचा वार मात्र काँग्रेसवर होतोय. राज्यांमधल्या त्यांच्या सत्ता उखडल्या जाणार आहेत. यातून काँग्रेसच्या जनाधाराला मोठ्या प्रमाणावर सुरूंग लावला जातोय. याचे परिणाम राज्यांमध्ये तर दिसणार आहेतच, पण त्याच्याही पुढचे परिणाम काँग्रेसच्या केंद्रीय राजकारणावर झाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण मोदी विरोधात आवाज काढणारे कोणतेही नेते आज काँग्रेसचे नेतृत्व मानायला तयार नाहीत, ही राजकीय वस्तुस्थिती आहे.

Shiromani Akali Dal patron Parkash Singh Badal speaks to BSP chief Mayawati over a phone calla congratulates her on the SAD-BSP alliance

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात