वत्तसंस्था
नवी दिल्ली : Shatrughan Sinha पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस (TMC) मधील कथित बंडखोरी आणि पक्षफुटीच्या चर्चांदरम्यान पक्षाचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण पूर्णपणे ममता बॅनर्जी यांच्यासोबत असून पक्ष सोडण्याचा कोणताही प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. Shatrughan Sinha
आसनसोलचे खासदार शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, बंडखोरांच्या यादीत त्यांचे नाव जोडले जात असल्याच्या चर्चा पूर्णपणे चुकीच्या आहेत. त्यांनी कोणत्याही पत्रावर स्वाक्षरी केलेली नाही, कोणत्याही गटाला पाठिंबा दिलेला नाही आणि कोणत्याही बंडखोर नेत्याने त्यांच्याशी संपर्कही साधलेला नाही. Shatrughan Sinha
“ममता बॅनर्जीच माझ्या नेत्या”
पक्षातील अंतर्गत वाद आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वाविषयी सुरू असलेल्या चर्चांवर बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “माझ्या दृष्टीने पक्षात एकमेव नेत्या म्हणजे ममता बॅनर्जी आहेत. त्यांच्याशिवाय मी दुसऱ्या कुणाला ओळखत नाही किंवा त्या स्वरूपात मानतही नाही.” पक्षातील सर्व आदेश आणि मार्गदर्शन मला नेहमी ममता बॅनर्जी यांच्याकडूनच मिळाले आहेत आणि जोपर्यंत मी पक्षात आहे, तोपर्यंत त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करेन, असे त्यांनी म्हटले.
कल्याण बॅनर्जी- अभिषेक वादावरही प्रतिक्रिया
TMC खासदार कल्याण बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यातील मतभेदांच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना सिन्हा म्हणाले की, कल्याण बॅनर्जी हे अनुभवी आणि सक्षम नेते आहेत. त्यांची काही वैयक्तिक किंवा व्यावसायिक नाराजी असू शकते. मात्र, याचा अर्थ पक्ष सोडण्याचा होत नाही. पक्षांमध्ये मतभेद होतात, पण त्यावरून फुट पडतेच असे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
बंडखोर खासदारांना थेट सल्ला
पक्षातून बाहेर पडणाऱ्या खासदारांबाबत शत्रुघ्न सिन्हा यांनी स्पष्ट भूमिका घेतली. ते म्हणाले की, ज्यांना TMC सोडायची आहे त्यांनी प्रथम खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि त्यानंतर दुसऱ्या पक्षात जावे. जनतेच्या मतांवर निवडून आल्यावर पक्ष बदलणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले.
युसूफ पठाण आणि सयानी घोष यांच्या नावांवर आश्चर्य
बंडखोरांच्या चर्चेत काही नव्या खासदारांची नावे आल्याबद्दलही सिन्हा यांनी आश्चर्य व्यक्त केले. विशेषतः युसूफ पठाण आणि सयानी घोष यांची नावे ऐकून धक्का बसल्याचे त्यांनी म्हटले. काही नेते दबावाखाली किंवा इतर कारणांमुळे असे निर्णय घेत असतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
भाजपशी संपर्काच्या प्रश्नावर मौन
भाजपच्या कोणत्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला का, असा प्रश्न विचारला असता शत्रुघ्न सिन्हा यांनी थेट उत्तर देणे टाळले. मात्र, भाजपमध्ये आपली राजकीय जडणघडण झाली असल्याचे सांगत त्यांनी त्या पक्षाबद्दल आदर व्यक्त केला. सर्व पक्षांमध्ये आपले मित्र असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अखेरचा संदेश
राजकीय घडामोडी आणि पक्षफुटीच्या चर्चांमध्ये कोण काय निर्णय घेतो याचा आपल्यावर परिणाम होत नाही. आपण कालही ममता बॅनर्जी यांच्यासोबत होतो आणि भविष्यातही त्यांच्यासोबतच राहणार आहोत, असे सांगत शत्रुघ्न सिन्हा यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App