डीलिमिटेशन किंवा परिसीमनाच्या मुद्द्यावर देशातले प्रादेशिक पक्ष प्रचंड अस्वस्थ झाले आहेत लोकसभेतल्या राज्यसभेतल्या खासदारांची विधानसभेतले आणि विधान परिषदेतल्या आमदारांची संख्या वाढली आणि राजकीय विस्तार झाला तर आपले भवितव्य काय??, याची चिंता प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना जास्त भेडसावते आहे. त्यामुळेच सध्या दिल्लीपासून राज्यांच्या राजधान्यांपर्यंत नुसती धावपळ सुरू आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या सत्तालोलूप पक्षातल्या नेत्यांची भेटीगाठींची झुंबड उडाली आहे. त्यातून रुसवे फुगवे होत आहेत. दोन राष्ट्रवादींच्या नेत्यांमध्ये प्रचंड खेचाखेच सुरू आहे, पण खरंतर ती फारच संकुचित आणि छोटी बाब आहे.Delimitation: Signs of the expanding political landscape and shifting political culture
– देशाच्या राजकीय क्षितिजाचा विस्तार
कारण डीलिमिटेशन मधून देशात सर्व पातळ्यांवर लोकप्रतिनिधींची संख्या वाढणार याचा अर्थ संपूर्ण देशाचे राजकीय क्षितिज विस्तारणार, त्यामुळे खरंतर कुठल्याच राजकीय पक्षाचे भवितव्य अंधारले जाणार नाही, तर ते वेगळ्या परिप्रेक्ष्यात प्रकाशमान होणार फक्त ते संबंधित राजकीय पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना उमगले पाहिजे आणि त्यांनी त्यानुसार राजकीय वर्तणूक बदलली पाहिजे.
– देशाच्या राजकीय संस्कृतीत बदल
लोकप्रतिनिधींची संख्या वाढणार आणि संपूर्ण देशाचे राजकीय क्षितिज विस्तारणार यातून बराच राजकीय सांस्कृतिक बदल होणार. आत्तापर्यंत देशात काँग्रेसी विचारसरणीच्या पक्षांनी देशाची राजकीय संस्कृती (political culture) व्यापली होती. तिच्यात कम्युनिस्टांनी शिरकाव केला होता, पण 2014 पासून राजकीय संस्कृतीत सुद्धा बदल व्हायला सुरुवात झाली. तो बदल लोकप्रतिनिधींची संख्या वाढण्याबरोबरच अधिक विस्तारत जाणार आणि तो हिंदुत्ववादी पक्षांना अनुकूल करून घेण्यासाठी त्यांचे नेते अधिक प्रयत्न करणार आणि त्यातून देशाची राजकीय संस्कृतीच हिंदुत्ववादी वळणावर आणून ठेवणार, हा महत्त्वपूर्ण बदल येत्या दशकामध्ये म्हणजेच 2026 ते 2036 यामध्ये अपेक्षित आहे. त्यात चढ – उतार जरूर येतील, पण देशातली काँग्रेसी राजकीय संस्कृती (Congress culture) बदलली असेल, तिचा राजकीय अक्ष (political axis) बदललेला असेल आणि तो भाजपाई संस्कृतीच्या (BJP – RSS culture) दिशेने आला असेल, याची पूर्ण “व्यवस्था” मोदी आणि शाह आणि त्याचबरोबर योगी आणि फडणवीस यांच्या राजवटींच्या काळात केली जाईल. त्यामध्ये जे काँग्रेसी राजकीय संस्कृतीतले पक्ष राजकीय चतुराई साधून भाजपच्या बाजूने सहभागी होतील, ते टिकून राहतील, विरोधकांचे राजकीय अवकाश (political space) संकुचित होत जाईल. पण ते अवकाश पूर्णपणे संपुष्टात येणार नाही. किंबहुना ते संपुष्टात आणले जाणार नाही. ते संकुचित करवून ठेवले जाईल.
– प्रादेशिक पक्षांची बदलाची तयारीच नाही
त्यामुळे सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूळ काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेना उबाठा, द्रविड मुन्नेत्र कळघम, अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अन्य प्रादेशिक पक्षांची जी “राजकीय फडफड” सुरू आहे, ती फार छोटी किंवा तोकडी आहे. देशाच्या व्यापक राजकीय पटलाच्या बदलासाठी ते तयारच नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रमुख नेत्यांना स्वतःचे राजकीय भवितव्य अंधारलेले दिसते. ते असुरक्षित राजकीय मानसिकतेने पछाडलेले दिसतात. त्यामुळे ते जुन्या पठडीत राहून कुठल्यातरी राजकीय तडजोडीच्या मोडमध्ये येऊन फसलेले दिसतात. म्हणून मग त्यांना दररोज कुठल्या ना कुठल्या भेटीगाठी घेऊन माध्यमांमधल्या चर्चेत राहावे लागते, पण त्याचा राजकीय भवितव्याच्या दृष्टीने काहीही उपयोग नाही. कारण असल्या भेटीगाठी घेऊन त्यांचे राजकीय भवितव्य सुनिश्चित होणार नाही. उलट ते धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.
– वजाबाकीच्या राजकारणाला वावच नाही, पण…
लोकप्रतिनिधींच्या संख्येत वाढ झाली, की प्रत्येक नेत्याला कुठले ना कुठले काम मिळेलच, फक्त ते त्याच्या आवडीचे असेल की नाही हे सांगता येत नाही, पण एखाद्या नेत्याला केवळ बाजूला करण्यासाठी कुठले डावपेच खेळले जातील आणि त्या नेत्याचे राजकीय भवितव्य पूर्णपणे संपुष्टात आणले जाईल, असले जुने डावपेच भाजपा खेळणार नाही. कारण राजकीय क्षितिज विस्तारत असताना असले जुन्या पठडीतले डावपेच उपयोगी पडणार नाहीत, हे मोदी – शाह यांना पक्के माहिती आहे. त्यामुळे ते कुठलेच वजाबाकीचे राजकारण स्वतःहून करणार नाहीत. ज्या राजकीय नेत्यांना त्यांच्याशी जुळवून घेता येईल, त्यांना ते बरोबर घेतील. ज्यांना त्यांच्याशी जुळवून घ्यायचेच नाही, त्यांच्या राजकीय भवितव्याची ते काळजी करत राहणार नाहीत. देशाच्या राजकीय क्षितिजाच्या विस्ताराबरोबर भाजप आणि संघाच्या विचारसरणीचा विस्तार, हेच खरे मोदी – शाह यांचे राजकीय ध्येय आहे आणि ते ते कोणत्याही स्थितीत पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. यात त्यांच्याबरोबर जी येतील, त्यांना ते बरोबर घेतील. जे येणार नाहीत, त्यांना बाजूला सोडून देतील आणि जे विरोध करतील त्यांना ते मोडून काढतील, इतके हे सोपे गणित आहे!! हा थोडा सावरकरी बाण्याचा प्रकार असेल. त्यात किरकोळ यश अपयश किंवा चढ उतार मायने राखणार नाहीत. मोदी – शाह, योगी – फडणवीस आपले ध्येय साध्य करून घेतल्याखेरीज शांत बसणार नाहीत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App