नाशिक : खासदार आणि आमदार टिकवण्यासाठी राष्ट्रवादीची धडपड; यशवंत मार्गाने पवार काँग्रेस पुढे शरणागत!!, हीच राजकीय वस्तुस्थिती कालच्या घडामोडींमधून समोर आली. Sharad Pawar
काँग्रेसने म्हणे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रस्ताव दिला, तर काही माध्यमांनी पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेसला विलीनीकरण करवून घेण्याचा प्रस्ताव दिला. पण प्रस्ताव कुणीही कुणाला दिला असला तरी यशवंत मार्गाने शरद पवार काँग्रेस पुढे शरणागत झाल्याचीच वस्तुस्थिती समोर आली.
– यशवंतरावांची इंदिरा गांधींपुढे शरणागती
1980 मध्ये ज्या पद्धतीने यशवंतराव चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये जाण्यासाठी धडपड केली, काँग्रेसने साधारण वर्ष दीड वर्ष त्यांना तात्काळ ठेवल्यानंतर इंदिरा गांधींनी यशवंतरावांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला, तोच काहीसा प्रकार शरद पवारांच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीने घडल्याचे दिसून आले.
– दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण करण्यात पवारांना अपयश
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर शरद पवारांच्या गोटातल्या नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासाठी जंग जंग पछाडले. रोहित पवारांनी तर प्रचंड आदळआपट केली. कसेही करून आणि काहीही करून भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जावेच यासाठी धडपडाट केला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व प्रस्थापित होण्यापूर्वीच तो पक्षच अख्खा कब्जात घ्यायचा “डाव” खेळला. पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने तो “डाव” उधळून लावला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सुनेत्रा पवारांचे नेतृत्व नीट प्रस्थापित केले. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हाती धुपाटणे आले. त्यांना काहीही मिळू शकले नाही म्हणून त्यांच्या पक्षातल्या आमदार आणि खासदारांमध्ये फुटण्याची चढाओढ लागली.
– तृणमूळ काँग्रेस फुटल्याचा पवारांना धसका
त्यातच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसचा पराभव झाला. ममता बॅनर्जींचे आमदार आणि खासदार फुटले. त्यांनी बहुसंख्येने स्वतंत्र गट स्थापन केले. पश्चिम बंगाल मधल्या राजकारणाचे हे पडसाद महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमटले. ठाकरे आणि पवारांच्या आमदार आणि खासदारांमध्ये फुटण्याची चढाओढ लागली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्यातले तीन आमदार फुटायच्या तयारीला लागले त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. शरद पवार यांना त्यामुळे हादरा बसला. राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय अस्तित्वाचा धोका निर्माण झाला.
– काँग्रेसला शरण जाण्याखेरीज पवारांपुढे पर्याय नाही
त्यामुळे शरद पवारांनी आपले उरले सुरलेले खासदार आणि आमदार पक्षातच टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसला म्हणे, विलीनीकरणाचा प्रस्ताव पाठविला. शरद पवार यांना आपल्या सुनेच्या पक्षात शिरकाव करता आला नाही. म्हणजेच अजित पवार आणि सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होता आले नाही. त्याचबरोबर स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि खासदार पक्षात टिकवून धरणे अवघड झाले म्हणूनच शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन करण्याची तयारी दाखविली. यशवंत मार्गाने पवार काँग्रेस पुढे शरणागत झाले. ज्या स्वाभिमानाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तो स्वाभिमानाचा मुद्दा 27 वर्षांमध्ये संपला. पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष चालविण्यात अपयश आले. राजकीय गुरु सारखीच शिष्याची दारुण अवस्था झाली. पवारांना काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाच्या पुढे शरणागती पत्करल्याशिवाय पर्याय राहिला नाही.
– पवारांवर विश्वास ठेवणे कठीण
संजय राऊत, सुप्रिया सुळे, अशोक गेहलोत आणि नाना पटोले यांच्या सूचक वक्तव्यांमधून शरद पवार ऑगस्टपर्यंत काँग्रेस पुढे शरणागत होणार, अशी चिन्हे काल दिसून आली. पण ते काही असले तरी काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व शरद पवारांच्या अटी शर्ती मान्य करून त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून घेण्याची शक्यता नाही. उलट पवारांनाच काँग्रेसच्या राजकीय आधाराची गरज असल्याचे ओळखून काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व उशिरात उशिर करून पवारांचा पक्ष मूळ काँग्रेस मध्ये विलीन करून घेण्याची शक्यता आहे. कारण पवारांच्या राजकीय विश्वासार्हते विषयी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला अनुभव सिद्ध दाट संशय कायम आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App