विशेष प्रतिनिधी
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडली. या बैठकीत राज्यातील जनतेसाठी, विशेषतः बळीराजा आणि क्रीडा क्षेत्रासाठी काही मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीतूनच राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी खूशखबर देण्यात आली. शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता आज जाहीर करण्यात आला असून, राज्यातील ६ लाख ३६ हजार ३६ शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये थेट वितरीत करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा निधी हस्तांतरित करण्यात आला.
मंत्रिमंडळ बैठकीतील ४ प्रमुख निर्णय:
क्रीडापटूंसाठी बक्षीस धोरणात सुधारणा (क्रीडा विभाग): राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना आणि त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांना (कोच) दिल्या जाणाऱ्या रोख बक्षीस धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन नवीन विद्यापीठांची घोषणा (उच्च व तंत्रशिक्षण विभाग): नागपूर येथे ‘लता मंगेशकर विद्यापीठ’ स्थापन करण्यात येणार आहे. याशिवाय, अहिल्यानगर येथे ‘डॉ. बाळासाहेब विखे पाटील खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठ’ स्थापनेस मंजुरी देण्यात आली आहे. या आरोग्य विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग विद्याशाखांमधील पदवी, पदव्युत्तर व सुपर स्पेशॅलिटी अभ्यासक्रम सुरू होतील.
जत नगरपरिषदेला प्रशासकीय इमारतीसाठी जागा (महसूल व वन विभाग): सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारत उभारणीसाठी मौजे जत येथील २,५८५ चौरस मीटर शासकीय जमीन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
पिंपळगाव बसवंत येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय (विधि व न्याय विभाग): नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत (तालुका निफाड) येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच या न्यायालयासाठी आवश्यक नवीन पदे आणि अनुषंगिक खर्चाच्या तरतुदीसही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App