नाशिक : काँग्रेस पासून भाजप पर्यंतच्या सगळ्या सरकारांमध्ये उपमुख्यमंत्री होणारे अजित पवार यांना भाजपच्या सत्तेची वळचण हवी, पण संघ मुख्यालयातला बौद्धिक कार्यक्रम नको!!, असे चित्र आज दिसले. Ajit Dada wants change of power to BJP; But don’t want an intellectual program at the Sangh headquarters!!
देवेंद्र फडणवीस सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातले विधिमंडळाचे पहिले हिवाळी अधिवेशन नागपूरला होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महायुतीच्या सर्व आमदारांना संघ मुख्यालयाला भेट देऊन एका बौद्धिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. या निमंत्रणानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सगळे मंत्रिमंडळ आणि महायुतीतले आणि शिवसेनेचे सगळे आमदार संघ मुख्यालयात पोहोचले होते. तिथे त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधी स्थानी जाऊन आदरांजली वाहिली.
मात्र भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संघ मुख्यालयात जाणे टाळले. पण त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार राजू कारेमोरे आणि राजकुमार बडोले हे मात्र संघाच्या कार्यक्रमाला मुख्यालयात गेले होते. आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस कडून कोणतीही सूचना आली नव्हती. आम्ही स्वयंप्रेरणेने कार्यक्रमाला आलो, असे या दोन आमदारांनी नंतर पत्रकारांना सांगितले.
पण अजित पवारांनी केवळ आजच संघाच्या कार्यक्रमाला जाणे टाळले असे नव्हे, तर भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आले, तरी सलग दोन वर्षे अजित पवारांनी संघ मुख्यालयात जाणे टाळले होते. संघाचे पदाधिकारी 2015 पासून महायुतीच्या सगळ्या आमदारांना हिवाळी अधिवेशनादरम्यान आपल्या मुख्यालयात बोलवत आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीत देखील महायुतीचे आमदार संघ मुख्यालयात नियमितपणे भेटी देत आले आहेत.
2022 मध्ये अजित पवार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आले. त्यानंतर दोन हिवाळी अधिवेशने झाली त्या दोन्ही अधिवेशनादरम्यान महायुतीचे आमदार संघ मुख्यालयात पोहोचले होते. परंतु अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संघ मुख्यालयात गेले नव्हते. अजित पवारांना भाजपच्या सत्तेची वळचण चालते. किंबहुना त्यांना ती हवी आहे. भाजपच्या सत्तेच्या वळचणीशिवाय अजित पवारांचे राजकारण पुढे चालणे देखील कठीण आहे, पण तरीही त्यांना संघ मुख्यालयात भेट देणे नको आहे. कारण त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने संघ आणि संघाची विचारसरणी “राजकीय अस्पृश्य” आहेत. म्हणून अजितदादांनी संघ मुख्यालयात जाणे टाळले.
– संघाच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जी
या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संघ मुख्यालयातल्या कार्यक्रमाला लावलेली हजेरी ठळकपणे नजरेसमोर आली. संपूर्णपणे राजकीय कारकीर्द काँग्रेसमध्ये घालवलेल्या प्रणव मुखर्जींनी संघाच्या कार्यक्रमाला हजेरी तर लावलीच, पण त्यांनी हेडगेवार जन्मभूमीला भेट देऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. यात प्रणव मुखर्जींची कोणतीही काँग्रेसी विचारसरणी आड आली नव्हती. कारण प्रणव मुखर्जी तेवढे प्रगल्भ राजकारणी होते. संघाच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जींनी आपल्या काँग्रेसी विचारसरणीला अनुसरूनच भाषण केले होते. त्यांनी आपल्या भाषणातले मुद्दे संघावर लादले नव्हते. त्याचबरोबर त्यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देखील भाषण केले होते. त्यांनी देखील आपले विचार काँग्रेसवर लादले नव्हते. उभयपक्षी एकमेकांचे विचार समजून घेण्याचा तो कार्यक्रम ठरला होता.
पण अजित पवारांनी मात्र संघ मुख्यालयात येण्याचे टाळून आपल्याकडे तेवढी राजकीय प्रगल्भता नसल्याचे दाखवून दिले.
– पंच परिवर्तन सूत्राची माहिती
संघाच्या आजच्या कार्यक्रमात विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार यांनी संघ कार्याची माहिती दिली संघशताब्दी वर्षानिमित्त संघाने पंच परिवर्तनाची घोषणा केली त्या संदर्भात सर्व लोकप्रतिनिधींनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधरराव गाडगे आणि नागपूर महानगर संघचालक राजेश लोया हे हजर होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App