विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रजा फाउंडेशनच्या वतीनं मुंबईतील आमदारांचं ‘रिपोर्ट कार्ड 2026’ हे प्रगतीपुस्तक नुकतंच प्रकाशित करण्यात आलं आहे. या अहवालानुसार, मुंबईतील सर्व आमदारांमध्ये काँग्रेसच्या आमदारांनी पहिल्या तीन क्रमांकांवर कब्जा करत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे . शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंची अठराव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.Aaditya Thackeray
मुंबादेवीचे आमदार अमीन पटेल पहिल्या स्थानावर, मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख दुसऱ्या स्थानावर, तर धारावीच्या आमदार डॉ. ज्योती गायकवाड तिसऱ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, शिवसेना (उबाठा) नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे या यादीत थेट 18व्या स्थानावर फेकले गेले आहेत. भाजपचे अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी मात्र उल्लेखनीय कामगिरी करत टॉप 10 मध्ये म्हणजेच 8व्या स्थानावर जागा मिळवली आहे. हा अहवाल आमदारांची अधिवेशनातील उपस्थिती, सभागृहात विचारलेले प्रश्न आणि त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे तयार करण्यात आला आहे.
महाराष्ट्र विधानसभेमध्ये मुंबईतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या हिवाळी अधिवेशन 2024 ते पावसाळी अधिवेशन 2025 या कालावधीतील कामगिरीचे, वस्तुनिष्ठ व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे मूल्यांकन करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. आमदारांचा विधानसभेच्या कामकाजातील सहभाग, त्यांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांची गुणवत्ता या निकषांवर या अहवालाची रचना करण्यात आली आहे. पंधराव्या महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर हा अहवाल समोर आलाय. मुंबईतील लोकप्रतिनिधी नागरिकांच्या दृष्टिकोनातून कितपत सक्रिय आहेत, तसेच विधानसभेचा प्रभावी वापर करून नागरिकांचे प्रश्न मांडण्यापासून ते सरकारकडून त्यांची उत्तरे मिळवण्यापर्यंतची आपली जबाबदारी किती ताकदीनं पार पाडतात, या मुख्य मुद्द्यांवर या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे.
नगरसेवक ते मुख्यमंत्री; ‘दबाव’ कसा हाताळतात? देवेंद्र फडणवीसांनी Gen Z ला सांगितला राजकीय प्रवासाचा किस्सा
यावेळी बोलताना, प्रजा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के म्हणाले की, आमदारांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न विधानसभेत पोहोचतात का? हा सर्वात मूलभूत मुद्दा कामगिरीचा विचार करताना आम्ही लक्षात घेतला आहे. पंधराव्या विधानसभेतील कामगिरीचा विचार करता 33 आमदारांच्या एकत्रित कामगिरीचं चित्र चिंताजनक आहे. बारावी विधानसभेच्या तुलनेत आमदारांच्या सरासरी गुणांमध्ये घट झालेली आहे. बाराव्या विधानसभेमध्ये आमदारांचे गुण सरासरी 61 होते. ते चौदाव्या विधानसभेमध्ये 54 पर्यंत घसरले आहेत. तर पंधराव्या विधानसभेमध्ये किंचित वाढून 55 झाले आहेत. या आकडेवारीला केवळ चढउतार म्हणून पाहणं चालणार नाही. आमदारांच्या कामगिरीचं मोजमाप त्यातून होत आहे. नागरिक लोकप्रतिनिधींवर जी जबाबदारी सोपवतात ती पार करण्याची कार्यक्षमता या आकडेवारीतून लक्षात येते.
प्रजा फाउंडेशनचे व्यवस्थापक असिफ खान म्हणाले की, नागरिकांच्या जिव्हाळ्याचे आणि त्यांच्या जीवनावर परिणाम करणारे प्रश्न विधानसभेत मांडले गेले पाहिजेत, विचारले गेले पाहिजेत, यावर चर्चा केली गेली पाहिजे ही आपली आपल्या आमदारांकडून अपेक्षा असते. सभागृहाचं कामकाज चालू असताना त्या वेळेचा प्रभावी वापर केला गेला पाहिजे, अशी आपली अपेक्षा असते. आमच्या आकडेवारीनुसार पंधराव्या विधानसभेमध्ये 2213 प्रश्न विचारण्यात आले (हिवाळी अधिवेशन 2024 ते 2025 पावसाळी अधिवेशन). मात्र 12व्या विधानसभेमध्ये 7955 प्रश्न विचारण्यात आले होते (हिवाळी अधिवेशन 2009 ते पावसाळी अधिवेशन 2010). तुलनात्मक विचार करता प्रश्नांच्या तुलनेत 72 टक्क्यांनी घट झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App