विशेष प्रतिनिधी
पुणे : साखर आणि गुळाच्या दरवाढीनंतर आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट पुन्हा बिघडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत कांदा आणि लसणाच्या दरात मोठी वाढ झाली असून, कांद्याचे दर अवघ्या आठ दिवसांत जवळपास दुप्पट झाले आहेत. तर लसणानेही 200 रुपये किलोचा टप्पा गाठला आहे.
आठ दिवसांपूर्वी बाजारात साधारण 21 ते 25 रुपये किलो दराने मिळणारा कांदा आता 45 ते 50 रुपयांवर पोहोचला आहे. काही ठिकाणी चांगल्या दर्जाच्या कांद्याला 52 रुपये किलोपर्यंत दर मिळत असल्याची माहिती आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, सुमारे 15 दिवसांपूर्वी कांद्याचे दर 20 ते 25 रुपये किलोच्या आसपास होते. मात्र, सध्या आवक कमी झाल्याने बाजारातील दर वाढले आहेत. पूर्वी 100 रुपयांत चार ते पाच किलो कांदा मिळत होता. आता त्याच 100 रुपयांत केवळ दोन किलोच्या आसपास कांदा मिळत असल्याने ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत आहे.
दरवाढीचा परिणाम ग्राहकांच्या खरेदीवरही झाला आहे. कांद्याचे दर वाढल्याने बाजारात ग्राहकांची संख्या आणि खरेदीचे प्रमाण काहीसे कमी झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे, लसणाच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. 15 दिवसांपूर्वी 100 ते 120 रुपये किलो दराने मिळणारा लसूण आता तब्बल 180 ते 200 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. लसणाची आवक कमी झाल्यामुळे दरात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App