वृत्तसंस्था
कोची : Indian Navy अरबी समुद्रात मोठ्या सागरी दुर्घटनेची शक्यता भारतीय नौदलाने वेळेवर हाणून पाडली आहे. संयुक्त अरब अमिरातीतील फुजैराहहून कोचीकडे येणाऱ्या एका तेलवाहू जहाजात जिवंत क्षेपणास्त्र अडकलेले असल्याचे समोर आल्यानंतर नौदलाने धाडसी मोहीम राबवत ते सुरक्षितपणे बाहेर काढले. तब्बल 2 हजार किलोमीटरचा प्रवास हे जहाज क्षेपणास्त्रासह करत भारतात पोहोचले होते.Indian Navy
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 26 मे रोजी ओमानच्या किनाऱ्याजवळ ‘एमटी ऑलिम्पिक’ या तेलवाहू जहाजावर हल्ला झाला होता. मार्शल बेटांचा ध्वज असलेल्या या टँकरला अज्ञात क्षेपणास्त्राची धडक बसली. मात्र सुदैवाने क्षेपणास्त्राचा वॉरहेड स्फोट झाला नाही. ते जहाजाच्या बाहेरील भागाला भेदून थेट इंधन साठवणूक टाकीमध्ये अडकून राहिले.Indian Navy
हल्ल्यानंतरही जहाजाचा प्रवास सुरूच
हल्ल्यानंतर जहाजातून काही प्रमाणात तेलगळती झाली होती. तरीही जहाजाने आपला प्रवास थांबवला नाही आणि अरबी समुद्रातून सुमारे 2 हजार किलोमीटर अंतर पार करत कोची बंदर गाठले. दरम्यान, जहाज व्यवस्थापनाने भारतीय अधिकाऱ्यांना जहाजात जिवंत क्षेपणास्त्र अडकल्याची माहिती दिली.
याआधी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, मस्कट किनाऱ्याजवळ जहाजाच्या डाव्या बाजूला मोठा स्फोट झाला होता. सुरुवातीला जहाजाला अज्ञात वस्तूची धडक बसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र नंतर तपासात क्षेपणास्त्र अडकल्याचे स्पष्ट झाले.
भारतीय नौदलाची उच्च-जोखमीची मोहीम
कोची येथे पोहोचल्यानंतर भारतीय नौदलाच्या दक्षिण नौदल कमांडने तातडीने एक्सप्लोसिव्ह ऑर्डनन्स डिस्पोजल (EOD) पथकाला घटनास्थळी पाठवले. गुरुग्राममधील इन्फॉर्मेशन फ्युजन सेंटर-इंडियन ओशन रिजन (IFC-IOR) या संपूर्ण मोहिमेचे समन्वयन करत होते.
तपासात असे आढळले की, क्षेपणास्त्राने जहाजाच्या बाहेरील संरचनेला भेदून अनेक भागांचे नुकसान केले होते आणि शेवटी ते इंधन टाकीत अडकले होते. अशा परिस्थितीत अगदी किरकोळ चूक झाली असती तरी भीषण स्फोट होण्याची शक्यता होती.
टप्प्याटप्प्याने निष्क्रिय केले वॉरहेड
नौदलाच्या तज्ज्ञांनी सर्वप्रथम सुरक्षा उपाययोजना राबवल्या. त्यानंतर आधुनिक उपकरणांच्या मदतीने क्षेपणास्त्रातील स्फोटक यंत्रणा शोधून ती निष्क्रिय करण्यात आली. पुढील टप्प्यात वॉरहेड आणि संबंधित धातूचा ढिगारा अत्यंत काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आला.
सध्या हे वॉरहेड सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले असून त्याची सखोल तपासणी केली जाणार आहे.
नौदलाच्या क्षमतेचे पुन्हा दर्शन
संरक्षण मंत्रालयाने या मोहिमेला अत्यंत आव्हानात्मक आणि उच्च-जोखमीचे ऑपरेशन म्हटले आहे. भारतीय नौदलाने दाखवलेली तत्परता आणि कौशल्य यामुळे मोठे सागरी संकट टळल्याचे मंत्रालयाने नमूद केले.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जहाज कोणत्या देशाचे आहे किंवा त्यावर कोणते कर्मचारी होते, याची पर्वा न करता भारतीय नौदलाने ही कारवाई केली. यामुळे हिंद महासागर क्षेत्रातील सागरी सुरक्षेसाठी भारताची बांधिलकी आणि नेतृत्वक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
2 हजार किमीचा ‘टिक-टिक’ करणारा धोका!
ओमान किनाऱ्याजवळ झालेल्या हल्ल्यानंतर जिवंत क्षेपणास्त्र इंधन टाकीत अडकलेल्या अवस्थेतच तेलवाहू जहाज भारतात पोहोचले. कोचीत भारतीय नौदलाने राबवलेल्या धाडसी ऑपरेशनमुळे संभाव्य स्फोट, पर्यावरणीय संकट आणि मोठी जीवितहानी टळली. ही मोहीम भारतीय नौदलाच्या सज्जतेचे आणि तांत्रिक कौशल्याचे आणखी एक मोठे उदाहरण ठरली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App