मोदींची तुलना नेहरूंबरोबर नकोच; पण पवारांची तुलना कुणाबरोबर करता येईल??

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडून आलेले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरूंचा विक्रम मोडला. त्या पाठोपाठ भाजप मधल्या नेत्यांनी पंडित नेहरू आणि नरेंद्र मोदी यांची तुलना सुरू केली. मात्र त्यावर चिडून जाऊन शरद पवारांनी नेहरूंची मोदींशी तुलना होऊ शकत नाही. नेहरूंनी केलेला त्याग मोठा आहे. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. नेहरू – गांधी कुटुंबीयांनी देशासाठी बलिदान दिले, असे वक्तव्य करून भाजपच्या नेत्यांना फटकारले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहरू आणि मोदी यांच्यात कुठलीही स्पर्धा लावली नाही. पण जे झाले तो रेकॉर्डचा भाग आहे. मोदींनी नेहरूंचा पंतप्रधान पदाचा रेकॉर्ड मोडला एवढेच सत्य आहे, असे सांगितले. पण भाजपचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मात्र नेहरूंपेक्षा मोदी श्रेष्ठ असल्याचे सांगितले. नेहरूंनी चुका केल्या मोदींनी भारताचे नाव जगभर नेले, असा दावा चंद्रकांतदादा पाटलांनी केला.

– नेहरू स्तुतीचे “पॉलिटिकल टायमिंग”

भाजपच्या नेत्यांनी नेहरूंची तुलना मोदींशी केल्यामुळे पवार चिडले पण त्या चिडण्यातले “पॉलिटिकल टाइमिंग” महत्त्वाचे होते. पवारांनी नेहरूंची स्तुती करून आणि नेहरू गांधी परिवाराच्या बलिदानाचे महत्त्व सांगून काँग्रेसवर लाईन मारली. कारण त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस आधीच अडचणीत सापडली. त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी शरद पवारांनी काँग्रेसची वाट धरायची म्हणून नेहरूंची स्तुती केली आणि गांधी नेहरू परिवाराच्या बलिदानाचे महत्त्व सांगितले.

– पवारांची तुलना कुणाशी??

पण त्या पलीकडे जाऊन नेहरू आणि मोदी यांच्यातल्या तुलनेचा विषय बाजूला ठेवून खुद्द शरद पवारांच्या गेल्या ६० वर्षांच्या राजकारणाची तुलना म्हणजेच शरद पवारांची तुलना देशातल्या कुठल्या नेतृत्वाशी करता येईल??, असा सवाल जर केला, तर कुणाशीही नाही, असेच त्याचे उत्तर मिळू शकेल. कारण शरद पवारांनी गेली ६० वर्षे राजकारण करून त्यांच्या राजकारणाच्या अखेरच्या टप्प्यात जे “मिळवले.” ते कुणीच “मिळवू” शकले नाही. एकतर पवारांच्या राजकारणाशी समकालीन असणारे राजकारणी यशस्वी होऊन अस्तंगत तरी झाले किंवा ते राजकारणातून बाजूला तरी झाले. पण शरद पवार मात्र गेली ६० वर्षे राजकारणामध्ये जसेच्या तसे “तरंगत” राहिले. ते राष्ट्रीय राजकारणाच्या समुद्रात बुडले नाहीत, कारण त्यांना प्रत्येक सत्ताधारी गोटाने आपापल्या राजकीय स्वार्थासाठी “लाईफ बेल्ट” दिला. त्या “लाईफ बेल्टच्या” आधारेच शरद पवार महाराष्ट्राच्या राजकीय नदीत तरंगत राहिले.

यशवंतराव चव्हाण पवारांना गुरुस्थानी होते. वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील पवारांना सीनियर होते. शरद पवारांना राजकारणात समकालीन असलेले सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख मुख्यमंत्री पदाची यशस्वी कारकीर्द गाजवून गेले. या मुख्यमंत्र्यांनी पवारांचे कधी ऐकले नाही. पवारांना ज्युनियर असलेले सुशीलकुमार शिंदे केंद्रात गृहमंत्री झाले. त्याआधी शरद पवारांनी ज्यांच्याशी अनाठायी स्पर्धा केली, ते नरसिंह राव देशाचे पंतप्रधान होऊन गेले. सोनिया गांधी, सीताराम केसरी यांच्याशी दोन हात करताना शरद पवार हरले. शेवटी सोनिया गांधींना शरण गेल्यानंतर शरद पवारांचे केंद्रातले राजकारण साधारण १० वर्षे तगले. म्हणजे ते १० वर्षे केंद्रीय मंत्री राहिले.



– पवारांना मोदींचा “लाईफ बेल्ट”

2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना विरोधकांमध्ये काड्या घालण्यासाठी “लाईफ बेल्ट” दिला. त्या “लाईफ बेल्टच्या” आधारे शरद पवार महाराष्ट्राच्या राजकीय नदीत तरंगत राहिले. मध्यंतरीच्या अडीच वर्षाच्या काळात त्यांनी ठाकरे – पवार प्रयोग करून बघितला. पण त्याचीच शिक्षा म्हणून भाजपने अप्रत्यक्षपणे कारवाया करून त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून त्यांना धडा शिकविला. भाजपने पवार कुटुंबीयांना सत्तेचा लाभ दिला, पण त्यांच्या राजकारणातल्या वर्चस्वाला कायमचा सुरुंग लावून ठेवला.

– काँग्रेसने विलीनीकरण झिडकारले

या सगळ्यामुळे शरद पवारांना अखेरच्या काळात काँग्रेसमध्ये विलीन होण्याची उबळ आली, पण काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने झिडकारल्यामुळे विलीनीकरण सुद्धा शक्य झाले नाही. याच दरम्यानच्या काळात अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर शरद पवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर कब्जा करायचा “डाव” खेळला. पण भाजपने सुनेत्रा पवारांना सत्ता पदांवर बसवून शरद पवारांचा “डाव” उधळाला. शरद पवारांना सुप्रिया सुळेंची राजकीय बेगमी करता आली नाही.

– “अविश्वासार्ह” शब्द ही पवारांची “कमाई”

गेल्या ६० वर्षांच्या राजकारणामध्ये शरद पवारांनी जी “कमाई” केली, ती एकाच शब्दाची होती, तो शब्द म्हणजे “अविश्वासार्ह”!! शरद पवार यांचे राजकारण विश्वास ठेवण्याच्या दर्जाचे नाही, ही गांधी परिवाराने अनुभवातून खुणगाठ बांधून ठेवली. त्यामुळे गांधी परिवाराने मर्यादेपलीकडे शरद पवारांवर कधी विश्वास ठेवला नाही. त्यांना कधी जवळ येऊ दिले नाही. त्यांच्यापासून जास्तीत जास्त लांब अंतर ठेवले. जेवढ्यास तेवढे राजकीय संबंध ठेवले. त्यामुळे शरद पवार स्वतःच्या आणि काँग्रेसच्या अडचणीच्या काळात सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ते विश्वास निर्माण करू शकले नाहीत. त्यामुळेच ते सुप्रिया सुळे यांची काँग्रेसमध्ये जाऊन राजकीय बेगमी करू शकले नाहीत.

– “इथे” पवारांची तुलनाच नाही

“अविश्वासार्ह नेता” किंवा “विश्वासघातकी नेता” म्हणून शरद पवारांनी जे नाव “कमावले”, ते देशातल्या कुठल्याही नेत्याला “कमावता” आले नाही. याबाबतीत शरद पवारांची तुलना देशातल्या कुठल्याही नेत्याशी होऊ शकत नाही. म्हणूनच पवारांचे राजकारण फक्त आणि फक्त “तरंगत” राहिले आणि त्यासाठी त्यांना कुठल्याही सत्ताधारी गोटातल्या “लाईफ बेल्टची” गरज राहिली. त्यापलीकडे शरद पवारांची कुठल्याही नेत्याशी तुलना होऊ शकली नाही.

Sharad Pawar’s Unreliable politics states his uncomparable stretcher

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात