विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune TCS पुण्यातील एका आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याच्या आत्महत्येच्या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. 48 वर्षीय टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कर्मचाऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या कथित सुसाईड नोटमध्ये सहकारी कर्मचाऱ्यांवर मानसिक छळ, अपमान आणि करिअर उद्ध्वस्त केल्याचे गंभीर आरोप केल्यानंतर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.Pune TCS
सुसाईड नोटमध्ये तीन जणांवर आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे परिसरातील हिंजवडी कार्यालयात कार्यरत असलेले अमित ब्रह्मे यांनी 2 जून रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.Pune TCS
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या कथित पत्रात त्यांनी एका परिचित व्यक्तीसह दोन महिला सहकाऱ्यांची नावे घेतली आहेत. या सहकाऱ्यांनी वारंवार अपमान केल्याचा, आपल्या कौशल्याशी संबंध नसलेली कामे दिल्याचा आणि करिअरच्या संधींपासून दूर ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
‘सर्वांसमोर अपमान, नोकरी सोडण्याचा दबाव’
सुसाईड नोटनुसार, संबंधित महिला सहकारी वारंवार इतर कर्मचाऱ्यांसमोर त्यांच्यावर टीका करत होत्या. कामगिरीबाबत प्रश्न उपस्थित करत नोकरी सोडण्याचा दबाव टाकण्यात येत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच प्रतिकूल अभिप्राय (Negative Feedback) देण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचेही पत्रात नमूद असल्याचे वृत्त आहे.
पोलिसांकडून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) आत्महत्येस प्रवृत्त केल्यासंदर्भातील कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
TCS ची प्रतिक्रिया
दरम्यान, TCS ने या प्रकरणाची दखल घेतली असून मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला सर्वतोपरी सहकार्य केले जात असल्याचे म्हटले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांविरोधातील आरोपांची तथ्य पडताळणी सुरू असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. तसेच सर्व कर्मचाऱ्यांसाठी आदरयुक्त, सुरक्षित आणि समावेशक कार्यस्थळ निर्माण करण्यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
आयटी क्षेत्रातील कामाच्या वातावरणावर पुन्हा प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे आयटी क्षेत्रातील कामाचा ताण, मानसिक आरोग्य आणि कार्यस्थळावरील वागणूक याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी नाशिकमधील TCS कार्यालयातील कथित छळ आणि गैरवर्तनाच्या आरोपांमुळेही मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता पुण्यातील या प्रकरणाने कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी कल्याण आणि अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्न उपस्थित केले आहेत.
तपासाच्या निष्कर्षाकडे लक्ष
सध्या पोलिसांकडून सुसाईड नोट, डिजिटल पुरावे आणि संबंधित व्यक्तींचे जबाब तपासले जात आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच आरोपांमागील सत्य स्पष्ट होणार असले, तरी या घटनेमुळे आयटी क्षेत्रातील कार्यसंस्कृती आणि कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App