विशेष प्रतिनिधी
मुंबई : काशी येथील ऐतिहासिक मनिकर्णिका घाटाचे संवर्धनाचे काम सुरू असताना तेथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या मंदिरांच्या कथित तोडकामावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना काही मुद्दे उपस्थित केले होते. आता अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटलांच्या खोट्या narrative ला परखड प्रत्युत्तर दिले. जयंत पाटलांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यांसह उत्तर दिले. आरोप जयंत पाटलांनी खोट्या नरेटीव्हच्या भानगडीत पडू नये, असा टोला देखील त्यांनी हाणला.
अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना जयंत पाटील यांनी उत्तर प्रदेशातील काशी येथील मनिकर्णिका घाटाचा मुद्दा उपस्थित केला. तिथल्या सरकारने मनिकर्णिका घाट पाडला असून अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा आणि त्यांनी जिर्णोद्धार केलेली मंदिरे बुलडोझर लावून पाडण्यात आली आहेत. अहिल्यादेवींच्या पुतळ्याची झालेली ही विटंबना आम्ही कशी सहन करायची?, असा संतप्त सवाल जयंत पाटील यांनी केला होता.
अहिल्यानगरच्या नामांतरावरून टोला
जयंत पाटील यांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व दावे फोल असल्याचे सांगितले. फडणवीस म्हणाले, आमचे जयंतराव थेट मनिकर्णिका घाटावर पोहोचले. जयंतराव यांनी मंदिरांचे, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा या ठिकाणी उल्लेख केला, याचा मला अतिशय आनंद आहे. शेवटी आपण धार्मिक लोक आहोत. संपूर्ण देशात परकीय आक्रमकांनी धार्मिक स्थळे उद्धवस्त केली होती, तेव्हा सगळी स्थळे निर्माण करण्याचे काम अहिल्यामाता यांनी केले. तुमच्याही सरकारला अहिल्यादेवींचा सन्मान करण्याची संधी होती. पण ६६ वर्षांत तुम्ही अहमदनगरचे नाव अहिल्यानगर नाही केले, असा टोला फडणवीस यांनी जयंत पाटील यांना हाणला.
रायगडाप्रमाणे मनिकर्णिका घाटाचे संवर्धन
फडणवीस म्हणाले, जयंत पाटील आता थेट उत्तर प्रदेशात गेले. मनिकर्णिका घाट तोडला, अन् काय काय केले? पण काहीही खरे नाहीये. मनिकर्णिका घाटाच्या संवर्धनाचे काम चाललेले आहे. हा घाट एएसआय संरक्षित आहे. त्यामुळे याच्या प्रत्येक गोष्टीची परवानगी एएसआयकडून घ्यावी लागते. जसे आपण रायगडाचे संवर्धन करत आहोत, तसेच मनिकर्णिका घाटाचे संवर्धन होत आहे. मनिकर्णिका घाटावरील अंत्यसंस्कार घाट, लाकूड ठेवण्याची जागा, धार्मिक विधीची जागा, मुंडन जागा, इतर बसण्याची जागा, प्रसादम गृह, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा या सगळ्या गोष्टी होत आहेत.
कुठलीही मूर्ती काढली जाणार नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मनिकर्णिका घाटावरील सगळ्या मूर्तींचे जतन करण्यात आलेले आहे. यासोबत मनिकर्णिका घाटावर असलेल्या, मसनात मंदिर, महाकाल मंदिर, तारकेश्वर महादेव मंदिर आणि अन्य मंदिरांचे एएसआयच्या मार्गदर्शनाखाली जसे आपण आपल्या ज्योतिर्लिंगांचे करतोय, तसे संवर्धन केले जात आहे. कुठलेही मंदीर तोडले जाणार नाही, कुठलीही मूर्ती काढली जाणार नाही. उलट हा घाट वापरणे अधिक सुविधाजनक व्हावा, यासंदर्भात हे काम चाललेले आहे. तसेच आज या घाटाची काय परिस्थिती आहे आणि नंतर काय होणार आहे? यासंदर्भातील सगळे फोटो मी घेऊन आलेलो आहे. ते मी तुम्हाला नंतर पाठवतो.
खोट्या नरेटीव्हच्या भानगडीत पडू नका
मनिकर्णिका घाटाच्या संवर्धनासाठी एएसआयने सर्व मान्यता दिलेल्या आहेत. त्यामुळे जयंतराव तुमच्यासारख्या माणसाने तरी अशा खोट्या नरेटीव्हच्या भानगडीत पडू नये. हुशार माणसांनी आकड्यातून, तर्कातून आपला नरेटीव्ह तयार केला पाहिजे, असो टोला देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना लगावला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App