विशेष प्रतिनिधी
मुंबई : Aditya Thackeray राज्यातील शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्ती करण्याच्या निर्णयावरून वाद चिघळला असून, या निर्णयाला मराठी अस्मिता विरोधात राबवला जाणारा कट ठरवत शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.Aditya Thackeray
आदित्य ठाकरे म्हणाले, “हिंदी भाषा ही कोणाचीही शत्रू नाही, पण तिची सक्ती करून मराठी भाषेवर अन्याय करणं हा एक छुपा अजेंडा आहे.” त्यांनी भाजपवर थेट मराठी विरोधी धोरणे राबवण्याचा आरोप करत लिहिलं की, “मराठी माणूस पेटून उठला असताना भाजप मागच्या दाराने मराठी द्वेष्टे अजेंडा राबवत आहे. हे वेळेत ओळखणे आवश्यक आहे.”
हा वाद प्रथम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. त्यांनी या निर्णयाचा विरोध करत, शाळांमध्ये हिंदीची सक्ती होणे हे राज्यघटनेच्या तत्त्वांशी विसंगत असल्याचे म्हटले होते. आता शिवसेना ठाकरे गटही या विरोधात समोर आल्याने यामागील राजकीय वळण अधिकच गहिरं होतं आहे.
आदित्य ठाकरे यांनी गिरगाव चौपाटीवरील ‘मराठी रंगभूमी दालन’ रद्द करण्याचा निर्णय, मराठी भाषा भवनात इतर कार्यालयांना जागा देणे, तसेच भाषा भवनाच्या कामात जाणीवपूर्वक उशीर घालणे यांसारख्या मुद्द्यांवर भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. “हे सगळे निर्णय स्थानिक विरोधाशिवाय घेतले गेलेत. मग कोणाचा विरोध होता? स्थानिक भाजप आमदारांचा का? की एखाद्या बिल्डर मित्रासाठी ही जागा मोकळी करून दिली जात आहे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, “मराठी रंगभूमी, भाषा, आणि संस्कृतीचं जाणीवपूर्वक अवमूल्यन केलं जात आहे. ही केवळ भाषेची नव्हे तर अस्मितेची लढाई आहे.”
आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात मराठी जनतेला जागृत होण्याचे आवाहन करत लिहिलं, “भाजपचे हे महाराष्ट्र विरोधी खेळ आपण वेळेत ओळखणार आहोत का? महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान सहन केला जाणार नाही.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App