नाशिक : राष्ट्रवादीच्या ऐक्याची तापवत राहा हवा; तिचा राजकीय सौदेबाजीसाठी वापर करत राहा!!, असला प्रकार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐक्याच्या बातम्यांमधून समोर येत आहे. पण त्यातही खरी game वेगळीच आहे. पवारांना आपल्या राष्ट्रवादीतली गळती थांबविण्यासाठी त्या चर्चेचा वापर करायचा दिसतो आहे.
ठाकरे बंधूंच्या ऐक्याच्या चर्चेची महाराष्ट्राला भुरळ पडली असताना पवार नावाचा ब्रँड हळूहळू धुसर होत जाईल याची धास्ती वाटायला लागल्यानंतर राष्ट्रवादीच्या ऐक्याची हवा तापवायला सुरुवात झाली. त्याला “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांनी इंधन पुरवायला सुरुवात केली. पवार काका – पुतणे एक होणार, भाजपच्या सत्तेमध्ये त्यांना वाटा मिळणार, सुप्रिया सुळे केंद्रात ऍडजेस्ट होणार, अजितदादा महाराष्ट्रात सेटल होणार वगैरे बातम्यांची राळ मराठी माध्यमांनी उडवली. सुप्रिया सुळे यांनी देखील त्याला हवा दिली. जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी बोलून घेऊ. सगळ्या महाराष्ट्राला शरद पवारांची कार्यशैली माहिती आहे. ते लोकशाही पद्धतीने नुसार निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पण खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या ऐक्यातल्या धोका ओळखून त्याला खोडा घातला. राष्ट्रवादीचे ऐक्य झाले, तर पवारांची मुलगी आणि पुतण्या यांचे भले होईल आणि मधल्या मध्ये भाजप आपले पत्ते कट करेल याची धास्ती तटकरे आणि पटेल यांना वाटली म्हणून त्यांनी ऐतिहासिक चर्चाच कापून टाकली.
मावळचे आमदार सुनील शेळके यांनी देखील ऐक्य प्रयत्नांविषयी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. अजित पवार भाजपबरोबर गेले म्हणून त्यांना तुम्ही व्हिलन केले होते आणि आता अजितदादांची सत्ता स्थिर होताना त्या सत्तेत वाटा मिळावा म्हणून त्यांचे नेतृत्व मान्य करत आहात, याचा अर्थ संशयाची पाल कुठेतरी चुकते, अशा शब्दांमध्ये सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीतल्या ऐक्याचा धोका बोलून दाखवला.
– सौदेबाजीसाठी ऐक्याची चर्चा
पण असे असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पवार काका – पुतण्या एकत्र असतील तरच आपला निभाव लागेल याची जाणीव झाल्यामुळेच कार्यकर्त्यांचा ऐक्यासाठी रेटा वाढतो आहे. दोन्ही राष्ट्रवादींचे ऐक्य झाले, तर भाजप – शिवसेना महायुतीत अजित पवारांची राजकीय सौदेबाजी करायची ताकद वाढेल. ते महापालिका + जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा खेचून आणू शकतील, असा दावा ऐक्याचच्या समर्थकांनी केला.
– पवारांची game
त्याचबरोबर तशीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून गळती सुरू आहे आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे ओढा सुरू आहे. तो रोखायचा असेल तर ऐक्याची चर्चा तापवत ठेवणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी आवश्यक ठरते आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकच होणार आहेत, तर उगाच इकडून तिकडे कशाला उडी मारायची अशा संभ्रमावस्थेत आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना ठेवण्याचा पवारांचा इरादा दिसतो आहे.
पण राष्ट्रवादीचे ऐक्य होवो किंवा न होवो त्यांच्या एकूण ताकदीची मर्यादा किंवा पवार ब्रँडच्या ताकदीची मर्यादा ठाकरे ब्रँड पेक्षा कमीच राहणार आहे. कारण “पवार बुद्धीच्या” माध्यमांनी पवार काका पुतण्या यांच्या ऐक्याची चर्चा कितीही रंगवत ठेवली तरी भाजप सारख्या महाबलाढ्य संघटनेच्या शक्तीवर मात करणे आणि ठाकरे बंधूंच्या ऐक्याच्या चर्चा झाकून ठेवणे हे पवार काका – पुतण्यांना जमण्यासारखे नाही हे उघड सत्य आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App