शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून मेघालायचे राज्यपाल सत्यपाल मलिक नियमित अंतराने केंद्र सरकारवर तोफा ङागताना दिसत आहेत. याची सुरुवात केंद्र सरकारवर तोफा डागून झाली असली तरी आता सत्यपाल मलिक हे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वैयक्तिक पातळीपर्यंत खाली घसरले आहेत. पण मालिकांच्या “सत्याची धाव” ही काँग्रेसच्या कुंपणापर्यंतच जाऊन पोहोचत आहे…!!Chidi’s one-sided innings; The “truth” of the series runs up to the Congress fence
आता हेच पहा ना, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि त्यापाठोपाठ अन्य नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शेतकरी आंदोलनादरम्यान जे आणि जेवढे म्हणून आरोप करून घेतले त्याचेच “राजकीय रिपीटेशन” सत्यपाल मलिक यांनी चालवले आहे. आज त्यांनी शेतकरी आंदोलनातले 500 लोक तुमच्यामुळे मेले, असा आरोप करून घेतला आहे. मोदी अहंकारी आहेत. माझ्याशी बोलताना ते म्हणाले, 500 शेतकरी काय माझ्यासाठी मेले का?, असा दावा सत्यपाल मलिक यांनी केला आहे.
मलिक यांचा दावा आजचा असला तरी, गेल्या दीड वर्षांपासून काँग्रेसचे नेते वेगवेगळ्या भाषेत याच आशयाचा आरोप पंतप्रधान मोदींवर करत होते. आज मलिक यांनी जेव्हा मोदींच्या तोंडी 500 शेतकरी माझ्यासाठी मेले का?, हे शब्द घातले, तेव्हा तेच शब्द ताबडतोब महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उचलले. होय शेतकरी आंदोलनातले 500 नव्हे 700 शेतकरी तुमच्याचमुळे मेले, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. मलिक आणि नानांच्या वक्तव्याताले हे साम्य लक्षात घेता यातून हे सिद्ध होते की मालिकांच्या “सत्याची धाव” ही काँग्रेसच्या कुंपणापर्यंतच पोहोचते…!!
शिवाय सत्यपाल मलिक यांची ही चिडचिड एकतर्फी सुरू आहे. आत्तापर्यंत मलिक यांनी मेघालय, दिल्ली आणि उत्तर प्रदेश अशा तीन ठिकाणांहून केंद्र सरकारवर शेतकरी आंदोलनाबाबत तोफा ङागल्या आहेत. त्या प्रत्येक तोफेमागे केंद्र सरकारने आपल्यावर काहीतरी कारवाई करावी. आपल्याला राजीनामा देण्याचा आदेश काढावा निदान केंद्रातल्या काही मंत्र्यांनी आपल्याला प्रत्युत्तर द्यावे, अशा स्वरूपाची खोडी काढण्याचा मलिक यांचा डाव होता. पण तसे काहीच घडले नाही. मलिक यांनी केंद्र सरकारवर कितीही आरोप केले, कोणत्याही भाषेत केले तरी केंद्र सरकारने किंवा केंद्रीय मंत्र्यांनी त्यांचा प्रतिवाद केला नाही. त्यांना काही उत्तरे दिली नाहीत.
आपल्याला केंद्र सरकार कोणताच प्रतिसाद देत नाही हे लक्षात आल्यामुळे सत्यपाल मलिक आणखी चिडले आहेत आणि याच आणखी चिडण्यातून त्यांनी आता केंद्र सरकारच्या पलिकडे जाऊन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहंकारी आहेत, असा आरोप वैयक्तिक पातळीवर जाऊन केला आहे. हा सत्यपाल मालिकांचा एकतर्फी चिडीचा डाव आहे. मोदींनी त्यांना अजून उत्तर दिलेले नाही. मोदींच्या एकूण राजकारणाचा बाज लक्षात घेतला तर ते मालिकांच्या पातळीपर्यंत खाली उतरून उत्तर देण्याची शक्यताही नाही. त्यामुळे सत्यपाल मलिक यांनी कितीही मोठ्या तोफा आणल्या आणि त्या केंद्र सरकारवर ङागल्या किंवा वैयक्तिक पातळीवर मोदींवर घसरले तरी त्यामुळे केंद्र सरकारचा एकही चिरा ढासळण्याची शक्यता नाही.
मालिकांच्या चिडीचे कारण मूळातच वेगळे!!
शिवाय सत्यपाल मलिक यांची चिडचिड ही मूळात शेतकरी आंदोलन या मुद्द्यावर नाहीच…!! ती मूळ चिडचिड आहे त्यांना जम्मू-काश्मीरच्या राज्यपाल पदावरून बाजूला करून मेघालयाचे राज्यपाल केले ही आहे. काश्मीर मधून 370 कलम हटविल्यानंतर केंद्र सरकारने आपल्याला हवे ते म्हणजे मनोज सिन्हा यांना जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल नेमले. मालिकांना तिथून बाजूला केले. पण त्यांना राजकीयदृष्ट्या बेरोजगार केले नाही. त्यांना मेघालयाचे राज्यपाल केले.
मलिक यांना ही नियुक्ती आवडली नाही आणि त्यामुळेच हे थेट सांगण्याऐवजी किंवा हे थेट सांगणे त्यांना गैरसोयीचे वाटल्यामुळे मलिक हे उघडपणे राजीनामा देऊन बाजूला होण्यापेक्षा स्वतःला “राजकीय हुतात्मा” करून घेऊन बाजूला होऊ इच्छितात. पण केंद्र सरकार त्यांना राजीनामा द्यायला सांगून किंवा राष्ट्रपतींकडून त्यांना काढून टाकून मलिक यांना “राजकीय हुतात्मा” करत नाही. हे त्यांचे खरे दुखणे आहे…!!
कारण सत्यपाल मलिक एकदा राज्यपाल या घटनात्मक पदावरून बाजूला झाले ते अधिक राजकीयदृष्ट्या मोकाट सुटतील हे सांगायला फार मोठ्या राजकीय तज्ञाची गरज नाही. उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी यांना असे मोकाट सोडायला भाजपचे नेते दुधखुळे नाहीत. उलट राज्यपाल पदासारख्या घटनात्मक पदावर राहून सत्यपाल मलिक जितके केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलत राहतील ती त्यांची वैयक्तिक विश्वासार्हता घटत राहील आणि ती पूर्ण घटल्यानंतर केंद्र सरकारला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची गरजही पडणार नाही. ते आपोआप राजकीयदृष्ट्या “थंड” होऊन जातील. मालिकांना नेमकी याचीच भीती वाटत आहे आणि या भीतीतून ते जोरजोरात आरोपांच्या तोफा उडवत आहेत.
सत्यपाल मालिकांच्या आरोपांमध्ये कोणतेही नावीन्य नाही. हेच आरोप गेले दीड वर्ष काँग्रेसचे नेते केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर करतच आहेत. त्या अर्थाने देखील मालिकांच्या “सत्याची धाव” काँग्रेसच्या कुंपणापर्यंतच पोहोचली आहे. त्यापलिकडे जाण्याची त्यांची क्षमता नाही. ही त्यांना मान्य नसली तरी आजची राजकीय वस्तूस्थिती आहे…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App