लबाडाघरचे आवतान, जेवल्याशिवाय खरे नाही…!!; राष्ट्रमंचाच्या नेत्यांना मिळाला का अनुभवाचा झटका…!!


६ जनपथच्या राजकारणाला एकच मराठी म्हण लागू होते, “लबाडाघरचे आवतान, ते जेवल्याशिवाय खरे नसते”… आज राष्ट्रमंचाच्या नेत्यांना असेच न जेवता बाहेर पडावे लागले आहे. कारण त्यांनी लबाडाघरचे आवतान स्वीकारले होते… ही चूक ६ जनपथची नाही… चूक तिथले आवतान स्वीकारणाऱ्यांची आहे…!! sharad pawar made a mockery of Rashtra manch leaders


राजकीय व्यवहार सोडून जेव्हा राजकीय नेते तत्त्वज्ञानाच्या गोष्टी बोलू लागले ना तेव्हा समजावे, ते पराभूत झाले आहेत. त्यांची सत्तेच्या राजकारणातून गच्छंती झालेली आहे. शरद पवारांच्या दिल्लीतल्या ६ जनपथ या घरात झालेल्या राष्ट्रमंचाच्या बैठकीचे हे सार आहे आणि ते राष्ट्रमंचाचे संयोजक समाजवादी पक्षाचे नेते घनःश्याम तिवारी यांच्याच तोंडून बाहेर पडले आहे.

राष्ट्रमंचाच्या बैठकीचा अजेंडा राजकीय नव्हता. देशाला पर्यायी व्हिजन देण्यासाठी विचारविनिमय करण्यासाठी आम्ही एकत्र जमलो होतो, असे घनःश्याम तिवारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले तेव्हाच राष्ट्रमंचाचा ६ जनपथमध्ये अवसानघात झाला असल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रमंचाचे नेते मोठ्या आशेने तिसरा मोर्चा तयार करण्याची खलबते करण्यासाठी जमले होते. ६ जनपथच्या ५० वर्षांच्या राजकीय अनुभवाचे बोल ऐकायला मिळतील, राष्ट्रीय पातळीवर नेतृत्वाचा मोठा पर्याय तयार होईल, अशी हवा तयार करण्यात आल्यामुळे राष्ट्रमंचाच्या संस्थापकांच्या आणि नेत्यांच्या मनात आशा आणि अपेक्षा निर्माण झाली होती. पण त्यांना काय माहिती… ६ जनपथमध्ये अवसानघातकी राजकीय फितरत आहे ते…!!

कोणतेही राजकीय कार्य करण्यापूर्वी विशेषतः राष्ट्रीय पातळीवर कार्य सुरू करण्यापूर्वी मोठी हवा तयार करायची. त्याच्या मोठमोठ्या बातम्या छापून आणायच्या. त्यावर राजकीय तज्ञांची चर्चा घडवून आणून आपली लार्जर दॅन लाइफ प्रतिमा तयार करायची… आणि शेवटी अवसानघातकी माघार घ्यायची ही ६ जनपथची फार जुनी सवय आहे. ही सवय आज मोठ्या आशेने ६ जनपथमध्ये जमलेल्या नेत्यांच्या आणि विचारवंतांच्या अनुभवाला आली असणार.

पण अशी हवा निर्माण करायची आणि नंतर पिछेमूड करायचे हा खेळ नवा नाही. तो १९९१ मध्ये झाला होता. त्याचीच २०२१ मधली ही पुनरावृत्ती होती. फक्त त्यावेळी नरसिंह राव होते आणि आज मोदी – सोनिया आहेत.

बहुतेक ६ जनपथपासून चारच क्रमांक दूर असलेल्या घरातून एखादी राजकीय वाऱ्याची झुळूक आली असावी आणि ६ जनपथचे अवसान गळून गेले असावे. कारण मुंबईत सिल्वर ओकवर बसून राजकारण खेळणे निराळे आणि दिल्लीत १० जनपथच्या अलिकडे चार नंबरच्या घरात राहुन राजकारण करणे निराळे. त्याला खरी हिंमत लागते. १० जनपथवर मात करण्यासाठी killing instinct लागते. ते नरसिंह राव नावाच्या नेत्याकडे होते. त्याचाच तर नेमका ६ जनपथमध्ये अभाव आहे त्याला काय करायचे…??

म्हणून मग दुसऱ्याने स्थापन केलेल्या मंचाची स्वतःच्या घरात बैठक घ्यावी लागते आणि बैठक झाली की स्वतः किंवा खुद्द मंचाच्या स्थापनाकर्त्याने पत्रकार परिषद घेण्याऐवजी तिथे उपस्थित असणाऱ्या राज्यसभेच्या माजी खासदाराला पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी पाठवावे लागते.

या असल्या प्रकारातून मोदींसारख्या बलाढ्य नेत्यापुढे तर सोडाच पण राजकीय गलितगात्र झालेल्या काँग्रेसच्या नेतृत्वापुढे देखील फुसके आव्हान उभे राहू शकत नाही. ही मराठी माध्यमांच्या डोळ्यात सलत असली तरी वस्तुस्थिती आहे.

म्हणूनच ज्यांनी काल “दिल्लीत पॉवरफुल खेळी:”, “मोदींना जबरदस्त आव्हान” वगैरे हेडलाइनी चालविल्या होत्या ना, त्यांना आज सायंकाळनंतर छोट्या आणि सपक हेडिंगाच्या बातम्या चालवाव्या लागल्या. बैठकीपूर्वी ज्यांच्या शेपट्या वरवर फुरफुरत होत्या, त्या माध्यमांच्या शेपट्या बैठकीनंतर खाली पडलेल्या दिसल्या. “शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक संपली; काय झालं बैठकीत, माजिद मेमन म्हणतात…” वगैरे हेडलाईनीने बातम्या चालवाव्या लागल्या.

६ जनपथच्या राजकारणाला एकच मराठी म्हण लागू होते, “लबाडाघरचे आवतान, ते जेवल्याशिवाय खरे नसते”… आज राष्ट्रमंचाच्या नेत्यांना असेच न जेवता बाहेर पडावे लागले आहे. कारण त्यांनी लबाडाघरचे आवतान स्वीकारले होते… ही चूक ६ जनपथची नाही… चूक तिथले आवतान स्वीकारणाऱ्यांची आहे…!!

sharad pawar made a mockery of Rashtra manch leaders

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात